Tuesday, December 31, 2013

चला घ्यावया ऊंच भरारी


गतवर्षीच्या अंधाराला
संपवायची करू तयारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी

आम जनांनी गेल्या वर्षी
खूप भोगली दिवाळखोरी
राजकारंणी बबेमानांनी
केली चोरी अन् शिरजोरी
भस्मासुर हा भस्म कराया
एक पेटवू या चिनगारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी

तेच चेहरे तेच पुढारी
पिढीदरपिढी तीच घराणी
देशधनावर ताव मारती
कुणाचीच नसते निगरानी
प्रस्थापित लोकांस उखडण्या
घ्या तरुणांनो आज सुपारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी

हट्ट करू या नवीन साली
पार्दर्शिता रुजवायाचा
नकोत पडदे नि आडपडदे
निर्णय नसतो लपवायाचा
प्रकाश वाटा चालत राहू
हवे कशाला मार्ग भुयारी?
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी

चित्र उद्याचे कसे असावे?
आज आहे ते उद्या नसावे
इथे निरागस सर्व कळ्यांनी
ना चुरगळता मस्त फुलावे
दरवळात या तरुणाईच्या
जल्लोषाला मिळो भरारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी

रात्र असावी स्वप्न बघाया
दिन स्वप्नांना पूर्ण कराया
यत्न करोनी आपण अपुल्या
नशीब रेषा नव्या लिहाव्या
युध्द तुझे अन् जीतही तुझी
एल्गाराची फुंक तुतारी
नववर्षाच्या नव्या पहाटे
चला घ्यावया ऊंच भरारी


बदलासाठी तगमगणार्‍या सर्व तरूण आणि तरुणींना नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा.


निशिकांत देश्पांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, December 14, 2013

जरासा हर्ष झाला


मोरपंखी आठवांचा स्पर्श झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

ब्रह्मकमळासम तुझे येणे क्षणाचे
दरवळाने धुंदते अंगण मनाचे
साजरा हा सोहळा प्रतिवर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

ते तुझे असणे नि नसणे खंत नव्हती
आठवांची तर कधीही भ्रांत नव्हती
तुजमुळे या जीवनी जल्लोष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

शांत झालो आठवांच्या वादळाने
भागते तृष्णा कधी का मृगजळाने?
स्वप्न, वास्तव जीवनी संघर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

बरळतो माझ्या मनाला वाटते ते
बोलशी तू तोलुनी जे शोभते ते
मुखवटा फसवा तुझा, आदर्श झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

समिकरण मी मांडता नाना प्रकारे
बाब आली एक ध्यानी जीवना रे!
तिजविना मी शुन्य हा निष्कर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला


निशिकांत देशपांदे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

एकाकी मी सुखात आहे


चार दिवारी अन् उंबरठा
कैद भोगते निवांत आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

नजरेला नजरा भिडल्यावर
माझ्यामध्ये गुंतशील तू
देत मुद्रिका पाश रेशमी
विणून लिलया विसरशील तू
दुष्यंताच्या शंकुतलेची
भीती माझ्या मनात आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

सुखास लाथाडून पकडली
वाट तुजसवे वनवासाची
एकच आशा मनी ठेवली
श्रीरामा ! तव सहवासाची
पुरुषोत्तम तू ! पण का माझ्या
अग्निदिव्य प्राक्तनात आहे?
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

उजेडात मज कुठे न दिसतो
एक कोपरा भय नसलेला
आश्रमात सत्संग कशाचा?
बाबा दिसला वखवखलेला
नजरा  टाळत हिंस्त्र पशूंच्या
कुठे लपू? संभ्रमात आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

यौवनशोषण होता स्त्रीचे
तिला कलंकित का ठरवावे?
डाग समाजाच्या भाळी हा
सुजाण जनतेने समजावे
गुन्हेगार सोडून पीडिता
सजा कशाची भोगत आहे?
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे

पिढीदरपिढी हिरावलेले
हक्क घ्यायचे अता ठरवले
आदर्शांच्या गुंत्यामध्ये
होते वेडी काल हरवले
खड्ग घेउनी एल्गाराची
गरज भासते नितांत आहे
काळोख्या घरकुलात माझ्या
एकाकी मी सुखात आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, December 3, 2013

का आवडते बदाम राणी?


तरुण तेजपाल याचे गोव्यातील यौवनशोषणाचे प्रकरण बरेच गाजले. टीव्ही वर पण २४x७ हे दाखवले जात होते. एका दृष्यात तर तरुण आणि त्याच्या पत्नीला कार मधे बसताना दाखवले. सहाजीकच त्या बिचारीचा चेहरा पडला होता. तरुण आणि पिडित मुलगी यांच्या वयातील अंतर बघता खूप घृणा आली. उद्वेगातून खालील कविता जन्माला आली आहे. अशा रचनेत नेहमीचा कवितेचा पोत थोडा बदलतोच. वाचकांनी हे ध्यानात ठेवून ही रचना वाचावी.

फ्यूजन होता परक्या स्त्रीशी
भावतात का ओंगळ गाणी?
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

संकटातही देत साथ ती
प्रपंचामधे राबराबते
प्रेम एवढे ! वटपूजेला
सातजन्म ती साथ मागते
घरकी मुर्गी दाल बराबर
म्हणून का तिजशी बेमानी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

नका विचारू कोणाच्या तो
वळणावरती चालत आहे?
शोध सावजांचा घेण्याची
जुनी पुरानी आदत आहे
फुले हुंगणे, वडिलोपार्जित
गूण उतरलाय खानदानी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

मुलगी किंवा नात वयाने
मनी नांदतो चंचल पारा
विकृतीच ही ! कुठे मिळावा?
सावजास या जगी सहारा
धोका टाळुन जगावयाची
ससेहोलपट केविलवाणी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

आरक्षित हे  क्षेत्र नसावे
पुरषांसाठी असे वाटते
स्त्रीही आता मागे नाही
चित्र भयावह उरी दाटते
मादक राणी, गुलाम दिसता
शिंपित असते गुलाबपाणी
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, November 21, 2013

सजवुन गेला


बेसावध मी असताना
स्वप्नांना रुजवुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला

श्रावण त्याच्यासंगे का
तो श्रावण बनून येतो?
मी मेघाला हे पुसता
तो हसतो निघून जातो
ग्रिष्मात एकदा आला
अन् धो धो बरसुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला

मी दार किलकिले केले
त्याच्यासाठीच मनाचे
मज वेड लागले होते
सखयाच्या आगमनाचे
तो झोका प्राजक्ताचा
आला गंधाळुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला

मी चकोरकुळची कन्या
तो चंद्र, नभीचा स्वामी
दोघात कसे हे फुलले
विरहाचे नाते नामी
भेटीची, मावळताना
तो आस जागवुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला

या जुनाट भिंती, विटका
आयुष्याचा डोलारा
वाटते निघोनी जावे
यावे न इथे दोबारा
एकाच कटाक्षाने तो
रंगांना उधळुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला

मी व्यर्थ दु:ख का करते?
तो दूरदूर असल्याचे
अन् शल्य मनी जाणवते
जे हवे तेच नसल्याचे
अंतरी पाहता कळले
तो  मजला व्यापुन गेला
सुनसान विरानीलाही
माझ्या तो सजवुन गेला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Monday, November 18, 2013

एकएकटी नांदत होती

दारावरच्या पाटीवरती
दोन्ही नावे झळकत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

जवळ असोनी जवळिक नाही
असे कसे हे जीवन जगणे?
सुगंधास का फुलापासुनी
शक्य वाटते स्वतंत्र असणे?
अहंकार हा शत्रू असुनी
दोघेही गोंजारत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

आनंदाची नवीन व्याख्या
"दुसर्‍यावर कुरघोडी करणे"
"गं"ची बाधा दोघांनाही
अवघड होते प्रश्न मिटवणे
रेशिमगाठी सोडवण्याची
ना इच्छा ना फुरसत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

सणासुदीला घरचे जेवण
अशात केंव्हा शिजले नव्हते
ऑर्डर देउन मागवलेले
टेबलवरती सजले होते
करून आग्रह वाढायाची
विसरुन गेली पध्दत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

व्हाल्वोमधले शिष्ट प्रवासी
असेच त्यांचे जणू वागणे
अजून होता एक मुसाफिर
मूल पोटचे गोजिरवाणे
गुन्हा नसोनी मुलाभोवती
हेळ्सांड घोंघावत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती

गरीब होते जरी बालपण
माझे मजला होते प्यारे
प्रेमळ आई बाबाकडुनी
मला मिळाले लाख सितारे
त्यांच्या पंखातला उबारा
एकच माझी दौलत होती
पती नि पत्नी सदनिकेत त्या
एकएकटी नांदत होती


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



का ओहोटी दिसली नाही?

असून आवस आयुष्याची
भरती का ओसरली नाही?
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

पापणीत तुज साठवले पण
तरी ती सदा ओली असते
आठवणींशी कुजबुज करता
हळूहळू गाली ओघळते
स्पंदनातही हवीहवीशी
ऊब तुझी जाणवली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

पक्षी येती, जाती पण या,
आठवणी येतात फक्त का?
आठवणींची वर्दळ असुनी
मना वाटते रिक्तरिक्त का?
एक जमाना झाला माझ्या
कळी मनाची फुलली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

दिवस, रात्र मी ढकलत असतो
काळ असा हा कसा थांबला ?
तुझी वजावट झाल्यापासुन
प्रवासातला वेग खुंटला
तुझ्यात गाडी अशी अडकली !
पुन्हा कधी चौखुरली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

आनंदाने जगता जगता
आठवणींचे बीज पेरतो
माणसास या सुखी क्षणांचा
भविष्यात मग पाश काचतो
क्षणाक्षणाला गुदमर येथे
वाट मोकळी उरली नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?

आयुष्याच्या डायरीत या
कसे रकाने भरावयाचे?
घडण्याआधी लिहिण्याजोगे
वेध लागले सरावयाचे
पूर्ण फाटकी झोळी माझी
मिळून सारे, उरले नाही
आठवणींच्या सागरलाटा
का ओहोटी दिसली नाही?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, November 1, 2013

तू नसल्याचे मनी रितेपण


गझलेच्या मैफिलीत जेंव्हा
रंग लागतो भरावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

नंदनवनही कवेत होते
तुझ्या सोबती वावरताना
एक निराळी धुंदी होती
पडताना अन् सावरताना
सुवर्णक्षण जे कधी भोगले
तेच लागले रुतावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

अनुभवला स्पर्शात तुझ्या मी
कायापालट जीवनातला
शक्य जाहले अशक्य ते ते
ऋतू भेटला श्रावणातला
अक्षर ओळख नसून सुध्दा
गीत लागलो लिहावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

परीघ अपुल्या स्वप्नांचा तर
क्षितिजाच्या पण पल्याड होता
खाचा खळगे पदोपदी अन्
समोर मोठा पहाड होता
हात घाट्ट हातात असू दे
जमेल तितके चढावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

जीवन म्हणजे एक खण्डहर
वैभव जेथे कधी नांदले
आठवणींचा जुना खजाना
शुन्य आजच्या क्षणी राहिले
आयुष्याच्या जुनाट भिंती
रंग लागले उडावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला

शेवटचा हा पडाव आहे
सुरकुत्यासवे रहावयाचा
बघून मागे आठवणींना
देत उजाळा जगावयाचा
पुढील जन्मी प्रभात किरणे
पुन्हा लागतिल दिसावयाला
तू नसल्याचे मनी रितेपण
भरून येते छळावयाला


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail=== nishides1944@yahoo.com

Friday, October 25, 2013

उशीर झाला


दिला आवळा का नेत्याने?
उमजायाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

पाच पाच वर्षांनी येती
राजकारणी भीक मागण्या
जुन्या योजना पुन्हा नव्याने
सांगत आम्हा भुरळ घालण्या
विकास त्यांचा दैन्य आमुचे 
कळावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

कल्याणाच्या सर्व योजना
नाव जोडले नेहरू, गांधी
सावरकर, जयप्रकाश म्हणता
संतापाची येते आँधी
एक घराणे=प्रजातंत्र हे
पचावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

किती खर्चले? कितॉ चोरले?
दिलाच नाही हिशोब कोणी
मिटक्या मारत कुणी चाटले?
गरिबांच्या टाळूचे लोणी
षंढ प्रजेला यक्षप्रश्न हे
पडावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

श्राध्द कराया, भारत देशा !
राजकारणी सज्ज जाहले
डोंबकावळे पूर्वज त्यांचे
आत्मे गगनी फिरू लागले
अतृप्तीने पिंड कावळा
शिवावयाला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला

कवी, शायरांनो बस आता
तो अन् ती च्या रटाळ कविता
शोधा स्फुल्लिंगांची वस्ती
रान पेटवा क्रांतीकरिता
फुंकर मारा राख उडवण्या
धगधगायला उशीर झाला
कसा कोहळा लुटून नेला?
समजायाला उशीर झाला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, October 22, 2013

एक प्रतिक्षा ना सरणारी


शोध घ्यायच्या अधीच थकली
नजर बिचारी भिरभिरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

प्रीत काय हे कळण्याआधी
तिची जिवाला ओढ लागली
दंगा, मस्ती शाळेमध्ये
सहवासाची जोड लाभली
मनात रुजली हलके हलके
एक भावना शिरशिरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

काय हवे मज तिच्यापासुनी
मला कधी ना कळले होते
कधी भेटता, तिच्या दिशेने
डोळे हटकुन वळले होते
निमंत्रणाविन अजून येते
तिची आठवण दरवळणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

एक कोपरा तिने व्यापला
अंतरातला खास मखमली
सदा नांदते बहार तेथे
रूप खुलविते तिचे मलमली
वादळातही मनी तेवते
मंद ज्योत ती थरथरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

बघता बघता शाळा सरली
मार्ग आपले किती बदलले !
मला उशीरा कळून आले
जपावयाचे तेच हरवले
कायमची ही खंत मनाला
सांजसकाळी कुरतडणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी

अंतक्षणीही आयुष्याच्या
एक अधूरे स्वप्न असावे
एकच नाते, पोत रेशमी
काच जिवाला, तरी हसावे
नको पिंड, मज हवी शिदोरी
अंतःकरणी मोहरणारी
आयुष्याला पुरून उरली
एक प्रतिक्षा ना सरणारी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, October 18, 2013

तुझी आठवण सदैव येते


तुझ्यात नकळत किती गुंतले
तुला न होती खबरबातही
तुझी आठवण सदैव येते
हप्त्याचे दिन रात्र सातही

विरही अश्रू जगास दिसती
जखम वाहते अंतरातही
हास्य उमलते तुझ्या सोबती
रखरखणार्‍या उन्हाळ्यातही

आयुष्याच्या वळाणावरती
संग तुझा, हातात हातही
झपाटले प्रेमात तुझ्या रे !
तुझेच असते गात गीतही

तुफान, वादळ आले होते
संथ माझिया जीवनातही
दीपस्तंभ तू मला भेटता
नौका तरली सागरातही

नसेल जर का प्रेम प्राक्तनी
मैत्रीची चालेल साथही
तुला सावली सदैव देण्या
उभी खुशीने मी उन्हातही

नकोस समजू दुबळी मजला
तुला सोडले मुक्त यातही
कैद करू मी शकले असते
नजरकडांच्या काजळातही

बुलंद माझे किती इरादे !
भिजेन म्हणते मृगजळातही
धावत असते, पडते, उठते
अंकुरते मी कातळातही

प्रेमरोग हा असाच असतो
झिंग वाटते वेदनेतही
हिशोब कसला? काय गवसले
सर्व मिळवले हरवण्यातही


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Thursday, October 17, 2013

हजारो कालची स्वप्ने


तुझी होती न माझी ती
खरे तर आपुली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

तर्‍हा प्रेमातली न्यारी
न बोलावे न ऐकावे
सखीच्या डोळियांमधुनी
मनीचे भाव वाचावे
न जखमा ना कुठे खपल्या
न भळभळ वाहिली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

भविष्याची किती चित्रे
मनी रेखाटलेली ती
किती उर्मी जगायाची
उरी झंकारलेली ती
जशी सरली निशा, स्वप्ने
अधूरी राहिली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

जरी घरटे तसे छोटे
सुखाचे नांदणे होते
कधी नव्हती अमावास्या
बरसले चांदणे होते
तुझे नसणे जरासेही
मनाची काहिली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

वरोनी गाज अन् लाटा
तरी नाही कधी भ्यालो
दधीच्या बाह्य रूपाच्या
मुळाला मी जरा गेलो
सखीच्या मनतळावरती
सुखाची सावली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती

कहाणी आपुली लिहिण्या
नको कागद नको शाई
मनावर कोरले जे, ते
लिहाया का उगा घाई?
वजावटही तुझ्यासंगे
सजावट भासली होती
हजारो कालची स्वप्ने
मिळूनी पाहिली होती


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Monday, October 14, 2013

घेतले जडवून होते


लागले नव्हते मला पण
घेतले जडवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

ध्यास वेडा लागला अन्
जीवना आली उभारी
पंख नसुनी घेत होतो
ऊंच आकाशी भरारी
मुक्त उडताना तिच्याशी
घेतले जखडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

सांगता आले न तिजला
मी कधी सांगू न शकलो
बोलक्या डोळ्यात आम्ही
भाव वाचायास शिकलो
दार दोघांनी मनाचे
पाहिले उघडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

सदगुणी नव्हतो जरी मी
राहिलो परिघात एका
प्रेमरंगी रंगताना
भीत होतो एकमेका
मज तिने नजरेत अपुल्या
बांधले पकडून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

बेगडी दुनियेत सखये
वास्तवाला शोधताना
संभ्रमित झालो, फुले मी
कागदांची हुंगताना
चेहरे असली कमी अन्
खूपसे मढवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते

प्रेम विश्वासास आहे
नाव दुसरे ठेवलेले
हे न जर जमले कुणाला
विश्व त्याचे भंगलेले
संशयाचे भूत आम्ही
लावले उडवून होते
वेड माझ्या मी सखीचे
ठेवले दडवून होते


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, October 12, 2013

असे नेहमी वाटायाचे


प्रजक्ताच्या पायघड्यांवर
ठसे तुझ्या दिसता पायाचे
सुगंधात तू लपली असशिल
असे नेहमी वाटायाचे

सतेज कांती, रूप नशीले
मनी ठरवले वहावयाचे
माझ्यापासुन स्वतःस आता
तुलाच आहे जपावयाचे

वसंतासही वेड लागले
स्वप्न नव्याने फुलवायाचे
तुझ्या चेहर्‍यावरती म्हणतो
रंग हजारो उधळायाचे

मैफिलीतली शमा असोनी
सोड इरादे जळावयाचे
तुला शायरीमधून माझ्या
अजून आहे मिरवायाचे

असूनही नसल्यासमान का
ठरवलेस तू असावयाचे?
जरी चांदणे पांघरतो मी
कसे ओंजळी भरावयाचे?

खाचा, खळगे मला, मखमली
गवतावर तू चालायाचे
दूर पाहता तुला सुखी, मी
मनी खुशीने हुरळायाचे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, October 10, 2013

हवाहवासा गुदमर आहे


जन्मदिनाच्या लाख शुभेच्छा
ओझे झाले मणभर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे


अंधाराचा मी रहिवासी
किती कवडसे गडे धाडता?
ओबडधोबड व्यक्तित्वाला
अगणित पैलू तुम्ही पाडता
शब्द फुटेना व्यक्त व्हावया
ओठावरती थरथर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

शाई, कागद सज्ज लेखणी
माझ्यावर मी काय लिहावे?
माझी ओळख ,मलाच नसता
चित्र कसे मी रेखाटावे?
आत्मचरित्री पानोपानी
कृतज्ञतेचा वावर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

ऋणी तसा तुमचा पण आहे
गझला, कविता अन् शब्दांनो
खूप लाभल्या मित्र-मैत्रिणी
दूर पळा तुम्ही अब्दांनो
मुक्त कराने नशीब देता
अता कशाची मरमर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

किती घेतले, किती राहिले
श्वास कशाला हिशोब करता?
किती भेटले किती जोडले
मुजून घ्यावे जगता जगता
आठवणींना दरवळण्याचा
वाढदिवस हा अवसर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे

वठलेल्या वृक्षास अचानक
कशी पालवी फुटू लागली?
कोरडवाहू शेत असोनी
ओलाव्याची भूक भागली
संतुष्टीच्या सायंकाळी
पाठीशी लंबोदर आहे
आप्तेष्टांच्या संगतीतला
हवाहवासा गुदमर आहे


निशिकांत देशपांडे.मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Tuesday, October 8, 2013

इच्छापूर्ती


जुने ऐकुनी गोड तराने
आठवात रमली
कळले नाही कधी कशी ती
पावसात भिजली

श्रावणधारा कोसळताना
आस मनी रुजली
हळूच येइल मिठीत घेण्या
म्हणून ती सजली

भेटीमध्ये गुणगुणण्याचे
प्रेमगीत ठरवते
समोर येता सखा, गोंधळुन
भान तिचे हरवते

इश्श्य !, लाजणे बघून, त्याचा
एक चुके ठोका
कटाक्ष तिरपा तिचा, सख्याच्या
काळजास धोका

समोर येता साजन, होते
इच्छापूर्ती खरी
चिंब भिजविती मनास तिचिया
रोमांचांच्या सरी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---  nishides1944@yahoo.com

Friday, September 20, 2013

जगून घ्यावे सणाप्रमाणे



नकोस माझी करू काळजी
तुझ्या घडूदे मनाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

जरी लाभली संगत थोडी
पूर्णत्वाचा बहर पाहिला
प्रेम भावना उत्कट इतकी
रोमांचांचा सडा शिंपिला
आठव सारे जपून ठेविन
खोल अंतरी धनाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

सतेज कांती गौरकाय तू
प्रजक्ताची जणू पाकळी
यौवन इतके फुलून आले
ओझ्याने वाकली डहाळी
उन्हात तू सुकशील म्हणोनी
सूर्य झाकतो ढगाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

जरी खेळतो कवड्या घोळुन
जिंकतेस तू सदैव बाजी
विजयी हसणे तुझे बघाया
हार होउदे सदैव माझी
साठवेन तुज पापण्यात मी
सुवर्णाचिया कणाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

तुझीच चर्चा, तुझे नांदणे
झोतामध्य कायम असते
सभोवताली तुझ्या नेहमी
लुडबुड माझी दुय्यम असते
उभ्या पिकाच्या शेतामध्ये
डोलत राहिन तनाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे

तुझ्या भोवती हिरवळ, दरवळ
खडकावरती निवास माझा
स्वप्नांमध्ये तू येण्याने
मूड लागतो झकास माझा
झुळूक येता तुझ्या अंगणी
थरथरतो मी तृणाप्रमाणे
सर्व दिवस तू आयुष्याचे
जगून घ्यावे सणाप्रमाणे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, September 17, 2013

पोट


पोट हा दोन अक्षरी आणि तीन मात्रांचा शब्द तिन्ही लोक (भूलोक वगैरे) व्यापून उरला आहे. जसा देव अनादी आहे तसेच पोट पण अनादी काळापासून माणसांची, प्राण्यांची सोबत करत आहे. पोट या विषयावर असंख्य म्हणी.आणि मुहावरे आहेत. १) आधी पोटोबा मग विठोबा, २) कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, ३) हिंदी सिनेलातील दणकेबाज डाय्लॉग "पापी पेट का सवाल है". ४) हातावर पोट घेऊन निघणे वगैरे वगैरे. मला तर बर्‍याच वेळेस वाटते की पोटाचे महत्व लक्षात घेऊनच गणेशाला लंबोदर किंवा मोठ्या पोटाची देवता बनवले गेले असावे.
अशा या आकाराने लहान (कांही अपवाद सोडून) असणार्‍या पोटांनी महाकाय प्रश्न या जगात निर्माण केले आहेत. मी कधी कधी कल्पना करतो की, पोट नसते तर जग किती सरळ, साधे आणि समस्यारहीत झाले असते.
मी तुम्हाला या निमित्ताने पन्नास वर्षापूर्वीच्या माझ्या शाळकरी आयुष्यात घेऊन जाणार आहे.
एकदा आमच्या वर्गाची सहल गेली होती. त्या वेळेस बसेस नव्हत्या. म्हणून आमच्या गावाजवळच अंदाजे दोन किलोमिटर अंतरावर एक बारव (विहिरीचा एक प्रकार) होता. त्या बारवात तळापासून दोन फूट वर एक दगडी गायमूख होतं. त्या गायमुखातून एक छोटीशी पाण्याची धार नेहमी पडत असे. या ठिकाणास नागझरी असे म्हणत. बारवाभोवती दाट झाडी होती. ते एकमेव सहलीचे ठिकाण होते जवळ पास.तेथे सहल नेण्याचे ठरले. आमचे वर्ग-शिक्षक संस्कृत शिकवत असले तरीही मला ते खूप असुसंस्कृत वाटत असत.सर्व मुलांना प्रभातफेरीसारखे दोघादोघांच्या ओळीत उभे करून पायीपायी सहल निघाली. प्रत्येकाने आपापले डबे आणले होते. गुरुजी सहलीला पण छडी घेऊन यायचे विसरले नाहीत. सहलीत पण कडक शिस्त अपेक्षित होती.
आम्ही सारे पोहंचल्यावर गुरुजींच्या करड्या नजरेखाली खेळ सुरू झाले.सर्व मुलामुलींनी कबडी, शिवणापाणी, खो खो असे शारिरीक मैदानी खेळ खेळले आणि कडकडीत भूक लागल्यावर डबे काढून जेवण घेतले.नंतर सर्वांना गोल रिंगण करून बसवले. त्या वेळेसची मलामुलींची नावे देवदेवतावरूनच असायची. मुलीत सुधारणावादी नावे म्हणजे इंदू, ललिता, नंतर नंतर बेबी या नावाची पण टुम निघाली होती.मुलांमधे सुधाकर, प्रभाकर, बंडू, निशिकांत (अस्मादिक) अशी होती. त्या काळात मोना, सोना, चैताली, वृषाली (हे नाव सोपे करून बैलाली का ठेवत नाहीत असा प्रश्न मला नेहमी पडतो) अशी नावे नव्हती.
सर्वांना गोलाकार बसवून आमच्या गुरुजींनी मोठ्या आवाजात विचारले "यज्ञ झाला का?" आम्ही सगळेच आवाक झालो. एका विद्यार्थ्याने चूक केली आणि विचारले की सहलीत यज्ञ कसला गुरुजी? तेथेही गुरुजींनी त्याचा कान पिरगाळला आणिम्हणाले "गधड्या! डबे खायच्या आधी हात जोडून श्लोक म्हणून घेतला नाही का? त्या श्लोकाचा शेवट काय?" तो वेदनेने कळवळत म्हणाला "उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म" म्हणजे गुरुजींना विचारायचे होते की पोटभर जेवण झाले का?
गुरुजी नंतर अगदी तत्वज्ञान्याचा आव आणत म्हणाले की आज तुम्हा सर्वांना कल्पना शक्तीला ताण देणारा खेळ खेळायचाय. या खेळात सर्वांनी भाग घेतलाच पाहिजे. काय गं पार्वती! ऐकलस ना? आणि तो परकर जरा खाली कर आणि नीट बैस. पयाचे घोटे (ankles) दिसतायत तुझ्या. त्या काळी हे पण चालत नसे. गुरुजींनी विचारलं, मग आहात सारेजण तयार? आम्ही एका सुरात "हॉ' म्हणालो आणि विचारले कोणता खेळ गुरुजी. ते म्हणाले माणसाला जर पोट नसते तर काय झाले असते? कल्पना करून सांगा एकएकजण. सर्वांना विचार करायला पाच मिनिटे देतोय. सगळेजण मनातल्या मनात अकलेचे तारे तोडायला लागला. मुलांनी दिलेली उत्तरे अशी:--
१)   सदाशिव--देवाला नैवेद्य मिळाला नसता कारण "आधी पोटोबा मग विठोबा"
२)   कुसूम---माझी मैत्रीण पार्वती खूप खुश राहिली असती.आता कुणाचे चांगले पाहिले की लागलीच तिच्या "पोटात दुखत" असतं
३)   जगन्नाथ---जगातल्र पाप खूपच कमी झाले असते कारण "कोणाच्या पोटावर पाय देण्याचे" पाप करताच आले नसते.
४)   दिगंबर---पोट नसते तर गुरुजी लहान लहान गुन्ह्यांसाठी लागलीच कडक शिक्षा झाल्या असत्या कारण "अपराध पोटी घालणे" शक्यच झाले नसते.
५)   मंगला--- गुरुजी! गुरुजी! पोट नसते तर मी जन्मलेच नसते. पोटाशिवाय आई "पोटिशी" (गरोदर) राहिलीच नसती. अन् ती दादाला उठता बसता म्हणत असते "मोठा झाल्यावर आमचे पांग फेड. नऊ महिने तुझा भार मी पोटात वाहिला आहे". हे वाक्य तिच्या बोलण्यात आलेच नसते.
६)   सुमन--- आमच्या शजारच्या काकू ढोंगी नसत्या झाल्या. माझी आई नेहमी म्हणते की त्या काकूवर विश्वास ठेऊ नकोस. त्यांचे नेहमी "पोटात एक आणि ओठात एक" असते.
७)   विठ्ठल--- आम्ही परवा जत्रेत टुरींग टाकीज मधे सिनेमा पाहिला. त्यातील मजाच गेली असती. या सिनेमात सोहराब मोदी ८/१० वेळेस म्हणतो "पापी पेटका सवाल है".या वाक्यावर दरवेळेस तो टाळ्या घेऊन जातो.
८)   द्वारका---पोक्त बाईच्या थाटात आम्हा बायकांवरचा एक आरोप कमी झाला असता. आम्हा स्त्रियांना पुरुष नेहमी हिणवतात की "बायकांच्या पोटात कांहीच रहात नाही" म्हणून.
९)मारुती---   गुरुजी! आपल्या गावात सर्व किराणा दुकाने महाराष्ट्रीयन लिकांचीच झाली असती. मारवाडी लोक हातात लोटा घेऊन पोट भरायला राजस्थान सोडून पूर्ण जगात पसरलेच नसते.
१०)  बालाजी--- एक अभंग कमी लिहिला आणि गायला गेला असता. "पोटा पुरतं देई ईट्टला, लई नाही लई नाही मागणं"
११)  लक्षमण--- या जगात लाचखोरी झालीच नसती कारण लाच खायला पोट पण पाहिजे ना!
१२)   कल्याण---गुरुजी, मुंबईचा समुद्र प्रदूषीत झालाच नसता. गुरुजी हे ऐकून वैतागले.तो पुढे म्हणाला की पोट नाही तर खाणं पिणं नाही म्हणजेच मल विसर्ग नाही. म्हणून ड्रेनेजचे पाणी समुद्रात सोडलेच गेले नसते
१३)दिगंबर---   हा एक गंभीर प्रकृतीचा मुलगा. तो म्हणाला आपण लोक गरज असल्याशिवाय कामच करत नाहीत. पोट नसते तर काम न करता एखाद्या दगडाप्रमाणे लोक कोठेही पडून राहिले असते.
१३)   चिंतामण--- पोट नसतं तर गुरुजी लोक साधे सरळ झाले असते. त्यांना अप्पलपोटी होताच आले नसते.

एव्हाना अंधार पडू लागला होता.पुन्हा लाईनमधे उभे करून परतीचा प्रवास झाला. एवढी चर्चा होऊनही घरी पोटपूजा करून झोपी गेलो.जाग आल्यानंतर कळले की लिखाणाच्या निमित्ताने आठवांच्या गल्लीबोळातून छानसा फेरफटका झाला.


निशिकांत देहपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

 

Wednesday, September 11, 2013

डोळ्यांमधुनी थेंब बरसले


धूळ झटकली नाही कोणी
फोटोचेही श्वास अडकले
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

श्राध्द कशाचे? संधी होती
सगे सोयरे भेटायाची
गप्पा, टप्पा कधी मस्करी
असेच कांही करावयाची
मूड पाहुनी, भटजींनीही
विधी दहा मिनिटात उरकले
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

मला सदगती नकोच होती
घराभोवती घुटमळतो मी
मेल्यावरही घरात कोणी
बिमार पडता तळमळतो मी
ज्यांच्यासाठी जगलो मेलो
तेच मला का आज विसरले?
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

खोली माझी अन् पत्नीची
बंद ठेवल्याने अंधारी
प्रेमामध्ये अंध उभयता
धृतराष्ट्राची ती गांधारी
आठवणींचे लख्ख चांदणे
काळोख्या अंतरी झिरपले
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

भिंतीवरच्या खिळ्यासही पण
भार असावा माझा झाला
एकेदिवशी वरून पडलो
जरा हवेचा झोका आला
चित्र फेकले कचर्‍यामध्ये
भिंग फ्रेमचे जसे तडकले
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले

स्मृतीभ्रंश कर देवा माझा
नकोत आठव नको वेदना
सहन कराया शक्ती नुरली
मको कुणाची मला सांत्वना
हिशोब सारा व्यर्थ वाटतो
काय हरवले? काय गवसले?
श्राध्दादिवशी आत्म्याच्याही
डोळ्यांमधुनी थेंब बरसले


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, September 6, 2013

अपुल्यात नुरला झंकार आता


संवाद गेला हरवून कोठे?
तडजोड करण्या, होकार आता
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

कित्येक वर्षे आली नि गेली
पण कोपरा हा फुललाच नाही
पानाफुलांचा मोसम कसा हा?
वस्तीत माझ्या आलाच नाही
फुलपाखरांच्या गंधाळणार्‍या
स्वप्नांस कसला आकार आता?
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

हृदयात नांदे किती ग्रिष्म वेडा !
सुकल्यात सार्‍या ओल्या कपारी
शोधीत छाया निघता मिळाला
वैशाख वणवा, रखरख दुपारी
पीण्यास मृगजळ लाभो जरासे
इतकीच आशा, आधार आता
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

मतभेद कसले? तूफान होते
समजून घेणे जमलेच नाही
नाण्यास दोन्ही असतात बाजू
का हे मनाला गमलेच नाही?
अपुलेच वादळ, तुटलेय घरटे
कोणी करावी तक्रार आता ?
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

छोटेच घरटे नांदावयाला
राहून जवळी आहे दुरावा
शरिरास मिळतो प्रतिसाद पण का
वाटे जिव्हाळा थोडा असावा?
गुदमर असोनी जगतोय आपण
प्रेमात असतो व्यवहार आता
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता

आत्ताच ठरवू जन्मात पुढच्या
"मी पण" जरासे सोडून पाहू
चल एकमेकासाठी जरासे
जगायचे चित्र खुलवून पाहू
डोळ्यास दिसते रंगीबिरंगी
स्वप्नातले मज घरदार आता
तुटल्यात तारा अंतरमनीच्या
अपुल्यात नुरला झंकार आता


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Saturday, August 31, 2013

रुपिया गीरा रे !

इस रचनकी पहली दो पंक्तियाँ मेरे एक फेसबुक फ्रेंडके वाल पर मिली जिससे प्रेरित होकर यह रचना बनी. इसको गुनगुनानेके लिए हिंदी फिल्म गाना "झुमका गीरा रे बरेली के बाजार मे" की धुन खयाल मे रखे.

रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे
रुपिया गीरा रुपिया, गीरा रुपिया  गीरा हाय हाय हाय
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

दिवालिया खाता है लेकिन अर्थ शास्त्र यह कैसा?
अन्न सुरक्षा कायदा किया जेबमे नही पैसा
दुनिया जाने निर्णय होते है किसके आधिकार मे!
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

घूसखोरोंकी टोलीके है मनमोहन अलिबाबा
स्वित्झरलंड है इन लोगोंका मक्का कभी है काबा
अहम फाइलें गायब है की जाती इस सरकार मे
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

गद्दीपर बैठे जो भी है प्यादे सब बेचारे
इंतजार होता है कब मिल जाये उन्हे इशारे
हांजीवालोंकी चलती है दिल्ली के दरबार मे
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

मनमोहनसींग, चिदंबरम की सोच है कैसी प्यारे
अमीर और गरिबोंके बींच मे बढी हुई है दरारे
ये दोनो भी फेल हुये है अपनेही किरदार मे
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे

आम आदमी गरीब रहना मकसद उनका कैसा?
जब भी चाहो चुनाव जीतो जरा फेंक कर पैसा
पिढी दरपिढी सत्ता क्यों है गिने चुने परिवार मे?
रुपिया गीरा रे मंदीके इस बाजार मे


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, August 28, 2013

तृप्त मनाने जावे म्हणतो


दार किलकिले ठेव जरासे
झुळूक होउन यावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

आळस देवू नकोस सखये
रेंगाळाया सूर्य लागला
खट्याळ बघतो खिडकीमधुनी
आशिक त्याच्यातील जागला
प्रभात किरणे होउन मीही
तुला कधी स्पर्शावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

काय लोक म्हणतील, काळजी
करणारांनी किती करावी ?
भेट राहिली दूर, यावया
स्वप्नी, धडधड उरी नसावी
लाज कशाची? गाज होउनी
प्रेमगीत मी गावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

शमा सखे तू मैफोलीतली
मंद तेवुनी रंग भरावे
मी परवाना, मिठी मारण्या
तुझ्याभोवती धुंद फिरावे
जळण्याआधी कवेत तुझिया
हळूच झंकारावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

उधार स्वप्ने सदैव अपुली
नगदीमध्ये विरहवेदना
ये आता बदलूत कायदा
जगावयाचा, जरा ऐक ना!
हातामध्ये हात धरोनी
क्षितिजावर नांदावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो

नकोस घालू प्रदक्षिणा तू
माझ्यासाठी वडाभोवती
देव कृपेची आस कशाला?
प्रेमबळावर बनू सोबती
तू माझ्या अन् मीही तुझिया
रंगी चल रंगावे म्हणतो
साठवून तुज पापण्यात मी
तृप्त मनाने जावे म्हणतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Monday, August 26, 2013

लखलख तारा एक निखळला

(डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्त्येनंतर लिहिलेली कविता.)


उजेडावरी वार कराया
अंधाराने हात उचलला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

श्रध्दा अंध नसावी म्हणणे
कशामुळे हा गुन्हा ठरावा?
प्रबोधनाविन समाज भोळा
शोषणातुनी कसा सुटावा?
आग्रह धरला तोच कायदा
मेल्यावरती पास करवला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

तर्काधिष्ठित पारख करुनी
नकारले कित्येक प्रथांना
जागर झाला सुरू जनांचा
छेद देउनी दंतकथांना
स्वार्थ बाधला ज्या भोदूंचा
पोटशूळ भलताच भडकला
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

विचार क्रांती कशी घडावी?
परंपरांचे प्रिय इशारे
राखेखाली दबून गेली
कुठे न दिसती सुप्त निखारे
अधीच मुठभर, एक त्यातला
कसा कुणी स्फुल्लिंग विझवला?
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला

पुरे जाहली स्मशान शांती
अता जरा पेटून उठावे
कुठे हरवली नैतिकतेची
जुनी वादळे कुणास ठावे?
तिमिर दिशेने हजार वाटा
प्रकाश रस्ता कुठे हरवला?
हाय! नभीचा पुन्हा एकदा
लखलख तारा एक निखळला


निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Thursday, August 22, 2013

तत्व एवढे पाळत असतो

आयुष्याचे कडू कारले
साखरेत मी घोळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

प्रसन्न वदने प्रसन्न होसी
असे ऐकले त्याच क्षणाला
स्वार्थ गुंतला तुझ्यात अंबे
ओढ लागली तुझी मनाला
तुझा उदो अन् रोज जोगवा
पोट जाळण्या मागत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

वांझोटे मन तरी कशाने
प्रसव वेदना सुरू जाहल्या?
हवे हवे ते घडावयाच्या
मनात उर्मी उठू लागल्या
नकोच मृगजळ, नको निराशा
स्वप्नी रमणे टाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

वयस्क आहे वृक्ष तरी पण
अंतरात तो वठला नाही
शुष्क काळ हा, दूर पाखरे
तरी कधी तो रडला नाही
वसंत येता नटण्यासाठी
पिकली पाने गाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

निर्जन आहे विश्व केवढे !
आसपास ना वस्ती दिसते
खिन्न व्हावया वेळ कुणाला?
मनात सळसळ मस्ती असते
कधी एकटा जगलो नाही
आठवणींशी खेळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो

देवच जाणे शब्दफुलांचा
सडा अंगणी कोण शिंपितो ?
कविता लिहिण्या, फुले वेचुनी
सांज सकाळी शब्द गुंफितो
वैषम्याचे मेघ दाटता
कविता, गझला चाळत असतो
जे मिळते ते गोड मानणे
तत्व एवढे पाळत असतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, August 18, 2013

वीट आला

शल्य होउन टोचणार्‍या
वेदनांचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

नोकरी बहुमुल्य ठरते
दोन वेळा पोट भरण्या
शेतकी पदवीधरांना
लाज वाटे शेत कसण्या
लाट शहरी धाडणार्‍या
शिक्षणाचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

जीवना करतो टवाळी
चेहर्‍यावर थुंकतो मी
चाल हात्तीसारखा तू
ये! तुझ्यावर भुंकतो मी
उन्मत्त आणि माजलेल्या
चालण्याचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

चित्र रेखाटीत असतो
मृगजाळाच्याही तळ्याचे
भोवताली रंग भरतो
केशरांच्या मी मळ्याचे
स्वप्ननगरी गाव माझे
वास्तवाचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

होत असते व्हायचे ते
व्यर्थ त्रागा हा कशाला?
झोपणे तर भाग आहे
साप असताही उशाला
संकटी हसण्यास शिकलो
आसवांचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला

का असे वाटून गेले?
जीवनाला अर्थ आहे
अर्थ शोधायास निघणे
हे खरे तर व्यर्थ आहे
अर्थ, व्यर्थातून निर्मित
गोंधळाचा वीट आला
एक फरपट जाहलेल्या
जीवनाचा वीट आला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०८ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Sunday, August 11, 2013

परंपरा मी पाळत आहे


पडतो मी अन् उठतोही मी
जीव तोडुनी चालत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

मी रस्त्याचा, रस्ता माझा
वाट कशी ही ना सरणारी
वळणावरती फिरून बघता
दुपार असते रखरखणारी
जीवनातले  स्वगत एकटा
मी माझ्याशी बोलत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

परसबागच्या प्राजक्ताने
मला पाहिले उर्जितकाळी
वठला तोही माझ्यासोबत
दु:ख उगाळी सांज सकाळी
मनात तो माझ्या, मी त्यांच्या
आस उद्याची रुजवत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

कितीक आले कितीक गेले
आता उरलो मीच एकटा
विलक्षण अशा कुटुंबातला
वडीलधारा मीच धाकटा
दोष द्यावया कुणीच नाही
माझ्याशी मी भांडत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

गांडिव पेलुन प्रत्त्यंचा मी
काल ताणली आत्मबलाने
झालो दुर्बल, वयस्क जगतो
नशिबाच्या मी कलाकलाने
व्यर्थ!, तरी मी इतिहासाची
सुवर्ण पाने चाळत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो

थकलेल्या गात्रांनो ऐका
वेदनेतही बघेन दरवळ
जाण असू द्या, मनात माझ्या
नांदत आहे अजून हिरवळ
वसंतातल्या कवितांना मी
शब्दफुलांनी सजवत असतो
एकलपणची प्राक्तनातली
पंरपरा मी पाळत असतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Monday, August 5, 2013

वेदनातही दरवळ (मैत्रीदिनाच्या निमित्ताने)


वाळवंटात हिरवळ
वेदनातही दरवळ

आठवांचा पारवा
ग्रिष्मात पण गारवा

कवडसा अंधारात
उजेड घरा दारात

चंदनाचे झिझणे
अहं विसरून जगणे

भोवतालची दलदल
भासते जणू मखमल

पानगळीचे शैशव
पर्णफुटीचे वैभव

मायेतला उबारा
दु:खा नाही थारा

जगण्या देई गरिमा
मैत्रीचा हा महिमा

सर्वांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा.

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, July 17, 2013

अंतरी झंकारले


श्रावणाच्या चाहुलीने
मी जरा रेंगाळले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले

वाट बघणे श्रावणाची
छंद मी जोपासला
आर्ततेला तुजमुळे रे
अर्थ नवखा लाभला
चित्र फुलणार्‍या कळीचे
आज मी रेखाटले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले

धडधडीचे काय सांगू !
चैन का पडते जिवा?
दार उघडे, सांज झाली
लावला लामण दिवा
नेमका ढळला पदर अन्
आत तू ! भांबावले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले

आणतो श्रावण तुला का
श्रावणा तू आणसी?
तू सख्या येताच होते
कंच हिरवी मानसी
श्रावणाच्या अन् सख्याच्या
सोबती गंधाळले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले

रात्र अंधारात लपली
वाट काटेरी तरी
मी तुझ्या बाहूत आले
झेलल्या श्रावण सरी
मेघमल्हारास ठावे
मी किती रोमांचले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले

फक्त तू दरसाल येशी
एकदा का श्रावणा?
का असा सोडून जाशी?
सांग ना तू साजना !
मी तुझ्या विरहात जखमी
रे ! किती रक्ताळले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, July 3, 2013

रुसतेस अशी का?


दिले स्थान ह्रदयात तुला मी
तरी खिन्न बसतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

आयुष्याच्या लक्तरास मी
शब्दांमधुनी मांडत असतो
लेखणीतुनी घळघळणार्‍या
आसवास मी सांडत असतो
कसे चांगले रम्य लिहू मी?
उदास तू दिसतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

इतिहासाच्या पानावरती
लिहिली होती प्रेमळ गाणी
सुवर्ण क्षण ते कधीच सरले
वर्तमान बस एक विरानी
स्वप्न वसंताचे कविते तू
व्यर्थ मनी बघतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

चंद्र, चांदणे, रोमांचाने
तुझा चेहरा मीच सजवला
एक जमाना होता जेंव्हा
तरुणाई गुणगुणली तुजला
वादळ येता जीवनात तू
ज्योतीसम विझतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

कधी गझल तर कधी रुबाई
अभंग होउन सोबतीस तू
जणू प्रेयसी शतजन्मीची
अशीच कविते वागलीस तू
श्वास अता थोडेसे उरले
जावयास निघतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?

मी नश्वर पण चिरंजीव तू
तरी आपुले नाते जमले
तुझ्यामुळे तर जीवनास हे
इंद्रधनूचे रंग लाभले
हसून दे मज निरोप कविते
अंतक्षणी रडतेस अशी का?
तूच श्वास अन् ध्यास मनीचा
कविते तू रुसतेस अशी का?


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, June 27, 2013

गोड जिवाला छंद लागला


तू गेल्याने आयुष्याला
आठवणींचा गंध लागला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

अंधाराची माझी वस्ती
किती काजवे शोधशोधले!
सुर्योदय अन् चंद्रोदयही
कधीच नव्हते भाळी लिहिले
क्षणैक तू येउन गेल्याने
दीप मनीचा मंद तेवला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

छबी कुणाची कधीच नव्हती
चित्र तुझेही कल्पनेतले
रंग भराया तरी लागलो
मनोमनीच्या कुंचल्यातले
शुन्यामध्येही बघताना
जीव कसा बेधुंद जाहला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

आयुष्याच्या कातरवेळी
मला वाटते मजेत जगलो
आसपास तू नसून सुध्दा
सदैव तुझिया सवे नांदलो
तुझाच दरवळ, तुझीच धुंदी
सदैव मी मधुगंध चाखला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला

नसेल जमले या जन्मी पण
पुढील जन्मी भेटू आपण
आस उद्याची हीच प्रेरणा
चित्र नवे रेखाटू आपण
प्रतिक्षेतही आयुष्याने
क्षणोक्षणी आनंद भोगला
वाट सखीची पहावयाचा
गोड जिवाला छंद लागला


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, June 25, 2013

विकास केला नवतंत्राचा

सलाम त्यांना ज्यांनी कोणी विकास केला नवतंत्राचा
अमिरिकेने शोध लावला चोर पकडणार्‍या यत्रांचा

भारतातल्या सरकारावर जनरेट्याचा दबाव आला
या यत्रांची आयात व्हावी असा शेवटी ठराव झाला

गरजा अपुल्या ध्यानी घेउन बदल खूपसे उचित केले
यंत्र पुरवठा करणार्‍यांना कॅबिनेटने सूचित केले

शासनकर्ते गठबंधन या यंत्राच्या कक्षेत नसावे
विरोधकांना खिंडीमध्य गाठण्यास हे तंत्र असावे

दूर असाव्या यंत्रापासुन सार्‍या नेत्यांच्या औलादी
काय वाकडे कुणी करावे? संरक्षण ज्यांना पोलादी

कक्षेच्या बाहेर असावे कोलगेट, स्पेक्ट्ररम घोटाळे
जर यंत्राने साहस केले जाम कराया डिजिटल टाळे

स्विसबँकेच्या व्यवहाराशी असेल ज्यांचे ज्यांचे खाते
चोर कसे ते? दिल्लीमध्ये "अर्थपूर्ण" सर्वांशी नाते

संपत्तीला वेगवेगळे रंग द्यायची प्रथा नसावी
काळे धन पांढरे कराया यंत्रांमध्य सोय असावी

पोट जाळण्या भुरट्या चोर्‍या करणार्‍यांची मान कसावी
करबुडव्या या आम जनांना यंत्राद्वारे जरब बसावी

भाव "ठरवले" निविदा नव्हत्या, मुल्यांची ही दिवाळखोरी
चोर पकडणार्‍या यंत्रांची खरीदताना झाली चोरी


निशिकांत देशपांडे. मो. के. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com




Monday, June 24, 2013

फूल हे आले कसे?


वृक्ष असुनी पिंपळाचा
फूल हे आले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

मी व्यथा माझ्या मनीची
मांडतो ना मांडली
वेदना अन् घाव भळभळ
हीच माझी कुंडली
प्रेम शिडकाव्यात माझे
अंग हे न्हाले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

मी जरी छातीस होते
माझिया धरले पुढे
वार का पाठीत केले
आपुल्यांनी एवढे?
आज ते पाठीवरोनी
हात का फिरले असे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

सूर माझा हरवलेला
आज आहे लागला
मैफिलीला तूच सखये
ये अता खुलवायला
चाहुलीने फक्त तुझिया
रंग हे भरले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?

हात हाती तू दिला अन्
वाटते जग खास हे
कैक दु:खे वेदना पण
तुजमुळे मधुमास हे
आज कळले स्वप्न गंधित
एवढे फुलले कसे?
जे कुणी नव्हतेच माझे
सोयरे झाले कसे?


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com





Friday, June 21, 2013

झाली संध्याकाळ


चोंच उघडुनी वाट पहाते
पक्षिणिचे ते बाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

बाळा चारा खाऊ घाली
खूप खूप मायेने
पाठीवरुनी हात मखमली
फिरवी ती प्रेमाने
कुशीत निजता बाळ वाटते
येवू नये सकाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

बाळाच्या खोड्या दंग्यांनी
घरटे गजबजलेले
तिला आवडे बाळ नेहमी
कानी कुजबुजलेले
कौतुक जेंव्हा बाळ खेळते
सोडुन सारा ताळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

पंख पसरुनी कसे उडावे
तिने शिकविले त्याला
आकाशाचे स्वप्न लागले
अता पडू बाळाला
उरात धडधड प्रश्न भयानक
तुटेल का ही नाळ?
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

एके दिवशी चारा घेउन
अशीच ती परतता
घरट्यामध्ये तिने पाहिली
खूप निरव शंतता
भिरभिरत्या नजरने शोधी,
मनी रक्तबंबाळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ

स्वतंत्र होउन बाळ उडाले
हीच जुनी ती कथा
आईच्या प्राक्तनात असते
कुरतडणारी व्यथा
एकलपणचे शल्य उरी अन्
मावळतीचा काळ
भूक लागली माय न आली
झाली संध्याकाळ


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Tuesday, June 18, 2013

माया जडली


मला नेमके काय जाहले?
काय कळेना किमया घडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली ?

विश्व जाहले गाव चिमुकले
फेसबुकाची तिथे चावडी
किती निरर्थक गपागोष्टी !
चर्चा कुठली नसे वावडी
संगणकाला चिकटुन असतो
झोप हरवली, अक्कल सडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली?

तो आहे का ती आहे ती ?
नसून माहित चॅटिंग करतो
प्रोफाइल तो फेक असूद्या
रोमँटिक गप्पात हरवतो
आभासाला सत्त्य मानणे
हीच बिमारी जगास नडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली ?

कॉपी, पेस्टिंग, डाउनलोडिंग
असेच कांही बोलत असतो
नको नको त्या विषयासाठी
गुगल सर्च मी मारत बसतो
नकोच मदिरा, संगणकाची
नशा केवढी आहे चढली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली

वेळोवेळी फेसबुकावर
फोटो माझा बदलत असतो
वाहवा!, लाइक्स किती मिळाले
पुन्हा पुन्हा मी मोजत असतो
खूप प्रसिध्दी मला लाभली
भूल ही मना आहे पडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली

व्यसनमुक्त मी होण्यासाठी
आश्रमात बाबांच्या गेलो
केली तेथे ध्यानधारणा
इलाज होता परतुन आलो
जुनीच ओळख पुन्हा मिळाली
खोल मनी जी होती दडली
बिनचेहर्‍याच्या फेसबुकावर
अशी कशी ही माया जडली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com



Monday, June 17, 2013

पाउस आला


धरेस हिरवा शालू देण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

ओला उत्सव सुरू जाहला, तन मन भिजले
रोमांचाने गवताचे पाते थरथरले
मनामनातिल प्रीत फुलवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

तरुणाईच्या मनी जागली प्रीत नव्याने
धुंद होउनी ओठी येती नवे तराने
मल्हाराचा सूर छेडण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

खळखळणार्‍या ओढ्यांनाही प्यास लागली
मिठीत घ्यावे सरितेने ही आस जागली
भिजलेल्यांना पुन्हा भिजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

खूप दिसानी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरती
हास्य पाहिले सचैल जेंव्हा भिजली धरती
नवी उभारी मनी रुजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला

रंग उडोनी चारी भिंती भकास माझ्या
रागरंगही वस्तीमधला उदास माझ्या
नवीन स्वप्ने मनी रुजवण्या पाउस आला
माती ओली गंधित करण्या पाउस आला


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yqhoo.com

Saturday, June 15, 2013

सोड चाकोरीत जगणे


व्हायचे ते होउ दे, ये
लाघावी घेऊन हसणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

लोक म्हणती काय? याची
सर्वदा भीती मनाला
वागतो, जगतो कसे? का
काळजी सार्‍या जगाला?
तोडुनी परीघास आता
तू शिकावे बंड करणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

चार भींतीचे कशाला
तोकडे घरटे असावे?
चल रहाया दूर गगनी
पार क्षितिजाच्या बघावे
घे भरारी पंख पसरुन
शक्य आहे उंच उडणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

वागणे अपुले, उद्याच्या
नीव आहे संस्कृतीची
गवगवा रूढी प्रथांचा,
जन्मभूमी विकृतीची
बंद कर आता तरी तू
आतल्या आतून कुढणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

सागराच्या उंच लाटा,
गाज आवडते मनाला
गुंफिले कवितेत सारे
वाटते जे या क्षणाला
सूर दे रचनेस माझ्या
सोड रुदनाचीच कवणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे

मी भविष्याच्या दिशेने
टाकले पाऊल आहे
गारवा अन् ताजगीची
लागली चाहूल आहे
होउनी बेबंद दोघे
अनुभवू अपुल्यात नसणे
दे झुगारुन बंधनांना
सोड चाकोरीत जगणे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Wednesday, June 12, 2013

थोपवावे मी कसे?


पार्श्वभूमी:-- आजकाल जीवनाची शैली बदलली आहे. या बदलांचा जीवनावर होणार्‍या परिणामाचा परामर्श घेणे कधी कधी गरजेचे वाटते. आपली आर्थिक परिस्थिती, वैयक्तीक महत्वाकांक्षा, विभक्त कुटुंबपध्दतीत नवरा बायको या दोघांनाही नोकरी करण्याची गरज या गोष्टी मध्यम वर्गीयांच्या जीवनावर खूप परिणाम करत आहे. आपल्या मुलाचे चांगले पालनपोषण व्हावे म्हणून एक मूल कुटुंबशैली आता बर्‍यापैकी स्थीर झाली आहे. हे सर्व होणे अपरिहार्य आहे. पण या बदलाचे अनेक पैलू आहेत.
वर्किंग कपल्सच्या मुलांवर याचा परिणाम होतो आहे. आईला इच्छ असूनही मुलांना वेळ देणे जमत नाही. पण मुलांच्या वाट्याला उपेक्षा येते हे कुणाच्या ध्यानात येत नाही. मी कल्पना केली की अशा एखाद्या मुलाला अशी व्यथा सांगावयाची असेल तर तो काय सांगेल? त्याच्या मनात खदखदणार्‍या भावना असतीलच. हा मुलांचा आक्रंद या रचनेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझा कोणाचीही टिका करण्याचा हेतू नाही. बघा प्रयत्न यशस्वी झाला अहे का ते!

पेटलेल्या काहुराला
शांतवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

पाळणाघर विश्व माझे
माय करते नोकरी
ऊब मायेची न तेथे
दु:ख सलते अंतरी
गात अंगाई स्वतःला
झोपवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

खेळणी भरपूर आहे
खेळतो मी एकटा
ना मला ताई न दादा
मीच मोठा, धाकटा
काचणार्‍या वेदनांना
जोजवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

अक्षरे गिरवून घेण्या
माय ना बाबा घरी
शिक्षणाचे तीन तेरा
मी रित्या कलशापरी
चित्र भावी जीवनाचे
रंगवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

कोक देते, चिप्स देते
ती घरी आल्यावरी
वेळ फिरवायास नसतो
हातही पाठीवरी
तृप्ततेचे स्वप्न नेत्री
जागवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

जन्म पुढचा द्यायचा तर
दे मला गरिबा घरी
हक्क आईचा मिळावा
ऐक माझे श्रीहरी
दु:ख तुज सोडून इतरा
दाखवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Friday, June 7, 2013

अंधाराशी लढता लढता


कळोखाचा विजय जाहला
घडूनये ते घडता घडता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

किती अमीषे आली गेली
मोह कधी ना मनास शिवला
ओली सूखी जशी मिळाली
त्यात सुखाचा शोध घेतला
सर्व सुमंगल शुचित्व दिसते
वळून मागे बघता बघता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

देवपुजा मी कधी न केली
जरी अंतरी देव मानतो
मंदिरात मूर्ती अन् ईश्वर
कष्टाच्या घामात पाहतो
व्यस्त केवढा ! पोटाची मी
रोज चाकरी करता करता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

निसर्ग, धरती, हिरवळ माझी
आकाशाचा मला चांदवा
झोपडीत मी जरी राहतो
मला कशाची नसे वानवा
वेदनेतही आनंदाशी
नाळ जोडली जगता जगता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

सत्व परिक्षा आयुष्या का
पदोपदी घेतलीस माझी ?
जरी जाहलो गलितगात्र मी
तरी नावडे हांजी हांजी
मान झुकविणे स्वभाव नाही
कणा ताठ रे मरता मरता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता

रडलो, हसलो, पडलो, उठलो
करायची ना मला शिकायत
जरी जाहला पुनर्जन्म, मी
करेन नवखी पुन्हा बगावत(*)
हसेन दाउन जगा वाकुल्या
चितेवरी मी चढता चढता
कोनाड्यातिल दिवटी विझली
अंधाराशी लढता लढता


(*) बगावत=बंडखोरी


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Sunday, June 2, 2013

सुरेल गाऊ नवे तराने


चार पाउले ये तू पुढती
मीही येतो तुझ्या दिशेने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने

सुरुवातीचे धुंद धुंद ते
दिवस कधी अन् कसे हरवले?
आपण अपुल्या खेळामध्ये
फासे उलटे कसे फिरवले?
हार जीत हा विषय संपवू
दोघे जिंकू क्रमाक्रमाने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने

नाते असते चार क्षणांचे
दवबिंदूंचे अन् गवताचे
एक दुज्याला बनून पूरक
ठरवतात ते जगावयाचे
तेच भाव अन् तोच तजेला
पुन्हा अनुभवू नव्या दमाने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने

वळणावरती आयुष्याच्या
हातामध्ये हात असावा
अवघड वाटा पार कराया
साथ असावी, नको दुरावा
संवादाचे सूत्र धरोनी
जगू मोकळे खुल्या दिलाने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने

स्वप्न उद्याचे आज रंगवू
दोघे मिळुनी एक मताने
तुझ्या सोबती अवघड नाही
सखे गाठणे स्वर्ग सुताने
द्वंद्व नको ! ये सुरू करू या
नवीन मैफिल द्वंद्वगिताने
झाले गेले विसरुन सारे
सुरेल गाऊ नवे तराने


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Friday, May 31, 2013

शिवार


शिवार माझा खूप तापला
वाट ढगांची बघतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

असेच झाले गतवर्षीही
वांझोटे नभ आले गेले
वाया गेले बी-बियाणही
डोक्यावरती कर्ज वाढले
बघून मालक फासावरती
शिवार माझा रडतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

आभ्यासुन शेती शास्त्राला
पदवीधर का करी चाकरी?
शेत कसाया लाज वाटते
हवाय बर्गर नको भाकरी
शिक्षण पध्दत अशी कशी ही?
शिवार माझा पुसतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

एकच मार्गी वाट कशी ही
खेड्यामधुनी शहरी जाते?
परत यावया कुणी न राजी
भूमातेशी तुटते नाते
खिन्न अंतरी शिवार झाला
एकटाच भळभळतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

उंच उंच त्या इमल्यांमध्ये
किती बांधले कबुतरखाने?
कुठे हरवली आमराई अन्
कुठे हरवले कोकिळ गाणे?
शिवार शहराच्या बगलेतिल
प्रश्न जगाला करतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे

भूमाता मी जरी जगाची
स्त्री मातेसम दु:ख भोगते
सोडुन गेली मुले तरी मी
त्यांच्यासाठी देव पूजिते
जा बाळांनो हवे तिथे जा
शिवार आवंढा गिळतो आहे
आज ना उद्या सजेन हिरवा
आस धरोनी जगतो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1944@yahoo.com

Sunday, May 26, 2013

हा एक काळ आहे



आयुष्य सांज झाली
सरली सकाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

होतो कधी तिच्या मी
प्रेमात रंगलेला
मी एकटाच आता
प्याल्यात झिंगलेला
चढता नशा उमगते
जगणे रटाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

माझ्याच इशार्‍यांची
त्यांना असे प्रतिक्षा
झालेत थोर, माझी
करतात ते समिक्षा
होतो जहाल केंव्हा
आता मवाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

जोमात कधी चढलो
मी ऊंच ऊंच शिखरे
उठण्यास तेच गुडघे
करतात आज नखरे
उद्वेग वेदनांचा
आता सुकाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

डौलात राज्य मीही
सिंहासमान केले
तख्ता अता पलटला
तह मी गुमान केले
गात्रात त्राण नाही
नुसते आयाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

म्हणतो जरा शिकावे
सापासमान जगणे
टाकून कात नवखे
तारुण्य प्राप्त करणे
श्रावण सरी हरवल्या
नुसते ढगाळ आहे
तो एक काळ होता
हा एक काळ आहे

वृध्दत्व निर्मुनी तू
का वाटलेस देवा?
आयुष्य दे कसेही
चाखेन जणू मेवा
तू दूर, तुला का रे
माझा विटाळ आहे?
तो एक काळ होता
हा एक काळ आहे


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Tuesday, May 21, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-४


मी कधी कधी विचार करतो की आमची पिढी किती भाग्यवान आहे ! याची देही याची डोळा आम्हाला गांधी, नेहरू, सावरकर बाबा आमटे,, राज कपूर, बलराज सहानी, सचीन तेंडुलकर, सुनील गावसकर, लता मंगेशकर, आशा भोसले, तलत महमूद, मोहमद रफी, एकाहून एक ग्रेट संगीतकार  अशा हजारो विभूती बघावयास आणि ऐकावयास मिळाल्या. या लोकांबद्दल शंभर वर्षानंतर जर सांगितले तर लोकांना खरे वाटणार नाही. त्यांना या सार्‍या दंत कथा वाटतील.
मी आज या मालिकेखाली जे गाणे निवडले आहे ते लता मंगेशकरने गायलेले आहे. मी आज माझ्या कुवतीनुसार लताजींबद्दल थोडे लिहिणार आहे. त्यांच्या बद्दल काय काय आणि किती लिहावे? नवीन पिढीला जुन्या कांही चांगल्या गोष्टी कळाव्यात म्हणून हा सारा प्रपंच.
मला जसे गाणे कळते तेंव्हा पासून मी लताजीना ऐकतोय. त्यांच्या मधूर गळ्याने सार्‍या देशाचे संगीताशी नाते जोडले. लोकांचा संगीत क्षेत्रात कान तयार केला. पूर्वी रेडिओ हे एकमेव गाणी ऐकण्याचे साधन होते. त्य्य पण विविध भारती आणि सिलोन ही महत्वाची स्टेशन्स. केंव्हाही रेडिओ लावला की १० गाण्यापैकी किमान ६ गाणि लताजींची असायची. अर्थात, हे सर्व यश आणि किमया सहजासहजी नाही घडली. त्याच्या मागे खडतर तपस्या, रियाज होते.
लताजीचा जन्म २८ एप्रील १९२९ साली इंदौर येथ झाला. घरात संगीताचे वातावरण होते. एक मजेशीर गोष्ट अशी की त्यांनी पहिले मराठी फिल्मी गाणे १९४२ साली (वयाच्या १३व्या वर्षी) मराठी फिल्म "किती हसाल" या सिनेमासाठी गायले होते. पण सिनेमात गाणे म्हणणे हा विचारच दिनानाथ मंगेशकरांना पटला नाही आणि त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. म्हणून हे गाणे त्या सिनेकातून काढून टाकले.
१९४७ साली त्या काळचे प्रसिध्द संगीतकार गुलाम हैदर (त्यांना सगळे आदराने मास्टरजी म्हणत असत) यांचा गाणे गाण्यासाठी निरोप आला. लताजी रेकॉर्डींग स्टुडिओ मधे रात्री पोहंचल्या. त्या वेळेस गायकाला ऑर्केस्ट्रा सोबत एकाच बैठकीत पूर्ण गाणे म्हणावे लागे. थोडीही चूक झाली की पुन्हा रिटेक! मास्टरजीना सर्व गाणी त्याच दिवशी पूर्ण करायची होती; कारण त्यांना दुसर्‍या दिवशी पाकिस्तानला जायचे होते. लताजींचा रेकॉर्डींग साठी नंबर सुर्योदयच्या वेळी आला.  त्यांनी गयलेले गाणे होते "बेदर्द तेरे दर्द को".तो पर्यंत त्या एका बेंचवर कोपर्‍यात बसून होत्या. गाण्याचे रेकॉर्डिंग सकाळी ८.३० ला झाले. मास्टरजी त्यांच्या गाण्यावर जाम खुष होते.
गडबड असूनही मास्टरजी लताजींना घेऊन फिल्मिस्तान या कंपनीच्या मुखर्जीकडे  गेले. ते निर्माण करत असलेल्या शहीद या चित्रपटाची गाणी लताजींना गाण्याची संधी देण्याची शिफारस केली. मुखर्जींनी तिला गाणे गावयास लावले. गाणे ऐकून त्यांनी आवाज खूप पातळ (thin) आहे या सबबीखाली प्रस्ताव धुडकावला. मास्टरजी त्यावेळी मुखर्जींना म्हणाले की आज आपण या पोरीला नकारताय. ऊद्या सर्व फिल्म इंडस्ट्री या मुलीचे स्वागत करील तेही रेड कार्पेट टाकून !. अन् झालेही तसेच! त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. एकाच वर्षात लताजींनी अंदाज, बरसात, बडी बहन, महल अशा यशस्वी चित्रपटात मातबर संगीतकारांबरोअब्र गाणी गायली.हा आवाका पाहून एके दिवशी मास्टरजीचा लताजींना फोन आला. मास्टरजी लताला म्हणाले "मैने जो कहा था पह सच निकला ना?" नंतर चार पाच महिन्यांनी पाकिस्तानहून नूरजहाँचा लताला फोन आला आणि म्हणाली "मास्टरजी को कॅन्सर हुआ है".
लताजींना खरा ब्रेक मिळाला तो महल या सिनेमातील " आयेगा आनेवाला आयेग" या गाण्यापासून. नंतरच्या काळात सर्व लिडींग संगीतकारांबरोबर त्यांनी गाणी गायली. या मधे शंकर-जयकिशन, एस.डी. बर्मन, नौशाद, हेमंतकुमार, सलील चौधरी आदींचा समावेश होता. शंकर जयकिशन यांच्यावर तर लताजींच्या आवाजाने जादूच केली होती.
लताजींनी जवळजवळ २० भाषेत गाणी गयली आहेत. त्यांनी किती गाणी गायली आहेत यावर बराच वाद आहे ज्याच्यावर येथे चर्चा करायची गरज नाही. त्यांना असंख्य सन्मान प्राप्त झालेले आहेत. नंतर त्यांनी नवीन संगीतकारांबरोबर गाणी गायला सुरुवात केली ज्या मधे आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, जयदेव, कल्याणजी आनंदजी आदींचा समावेश आहे.
१९६२ मधे भारताला चीन कडून लढाईत हार पत्करावी लागली होती. सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी विविध भारतीवर "जयमाला" हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी प्रसारीत होत असे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण एखादा सेलिब्रेटी करत असे. एक कार्यक्रम लक्ष्मिकांत-प्यारेला यांनी प्रक्षेपित केला होता. त्यात ते म्हणाले की लताजी हे या विश्वातले एक आश्चर्यच आहे. त्यांना एखाद्या गाण्याची धुन पियानोवर किंवा पेटीवर वाजून दाखवली की त्या लिहिलेल्या गाण्यावर कांही स्वरचिन्हे करतात. त्या जेंव्हा गाणे गातात तेंव्हा आम्ही सुचवलेल्या चाली पेक्षा खूप सुंदर हरकती घेऊन गाण्याचे सोने करतात. त्यांच्या गाण्याला कधीही रिटेक करावे लागत नाही
त्या अगदी सहजतेने गातात. ऐकायला सोपी वाटणारी गाणी इतरांना म्हणायला खूप अवघड असतात. वर्षानुवर्षे रियाज करूनही चाफा बोलेना या गाण्याची पहिली तान गळ्यातून काढणे जमत नाही; हा आहे त्यांचा महिमा !
अजून एक किस्सा येथे अवर्जून सांगावा वाटतोय. बडे गुलाम अली खाँ साहेब त्या काळचं रागदारी संगीतातलं एक बडं प्रस्थ होतं. खाँ साहेब साथीला संवादिनी किंवा सारंगी घेत नसत. फक्त चार तंबोर्‍याची साथ आणि ठेका धरण्यासाठी तबला. एकदा त्यांच्या गायनाचा कर्यक्रम एका शाळेच्या प्रांगणात होता. खाँसाहेबाचे गाणे अगदी रंगात आले होते. दर्दी श्रोतेही अगदी तल्लीन झाले होते. त्या मैदानाच्या भोवती कांही घरे होती. खाँसाहेब एकदम गाणे थांबऊन शांत झाले आणि साथीदारांनाही वाजवणे बंद करण्यास सांगितले आणि स्वतः डोळे मिटून बसले. लोकांना कळेना हे काय चालले आहे ते. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले " ये कमबख़्त कभी बे सुरी होतीही नही" त्या वेळेस एका घरात लतांनी गायलेले भाई भाई या चित्रपटातील "कदर जाने ना ओ कदर जाने ना मोरा बालम" हे रेडिओवर गाणे लागले होते, आणि त्यांचे हे उदगार त्या गाण्याला ऐकून होते. किती ग्रेट लता आणि दिलखुलास दाद देणारे खाँसाहेब पण!
असाच एक किस्सा अजून एका गाण्याचा. १९६२ च्या पराभवानंतर राष्ट्रभक्तीपर गीताची लाटच आली होती. कवी प्रदीपने लिहिलेले एक गीत सी. रामचंद्र यांनी संगीतबध्द केलं होतं. गीताचे बोल होते "ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँखमे भरलो पानी-जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी" हे गाणे लताजींनी लाल किल्ल्यावरून गायले होते. या गाण्याचा आशय आणि लताच्या आवाजातील आर्तता ऐकून पंडित नेहरू अक्षरशः रडले होते.
आशा महान लताजीने गायलेले एक गाणे चित्रपट सीमा, गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट निर्मिती-१९५५. हे गाणे जयजयवंती या रागावर आधारीत आहे. गाण्याचे बोलअसे;-
मनमोहना बडे झूठे
हारकर हार नही माने
मनमोहना----

बने थे खिलाडी पिया
निकली अनाडी पिया
मोसे बेमानी करे
मुझसेही रूठे
मनमोहना-----

तुमरी ये बन्सी
बनी गला फांसी
तान सुना के मेरा
तनमन लूटे
मनमोहना-----
हे गाणे ऐकण्यासाठी क्लिक करा--http://www.youtube.com/watch?v=uXGMxTTB_Dg

Saturday, May 18, 2013

मला वाटते परत फिरावे


हिरवळ गंधित ओली माती
कसे बालपण मी विसरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

एक सदनिका विकत घेतली
तेच वाटते अमाप वैभव
वाडा, अंगण कसे कळावे?
खुराड्यातले ज्यांचे शैशव
अंगणातल्या प्राजक्ताच्या
गंधाला श्वासात भरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

खिडक्या दारांना पडदे अन्
आडपडदेही मनात नव्हते
सार्‍यांसाठी गर्द सावली
कुठलेही घर उन्हात नव्हाते
टीव्हीवरच्या मालिकांतले
मुळीच नव्हते कधी दुरावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

लुगडे घेता वहिनीसाठी
नणंद त्याची घडी मोडते
चापुन चोपुन नेसुन होता
सर्वांच्या ती पाया पडते
विभक्त इथल्या कुटुंबात हे
दृष्य कधी अन् कसे दिसावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

लेक सासरी जाण्या निघता
रंक असो वा रावाची ती
आईबाबांची  नावापुरती
लेक खरे तर गावाची ती
आभाळमाया इथे पाहिली
प्रेम किती अन् कसे करावे
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे

खेड्यामधल्या तरुणाईला
भुरळ घालती शहरी वारे
नसे संस्कृती, विकृतीच ही
लुभावणारे मृगजळ सारे
थांबव देवा श्वास अता तू
काय करणे जगी उरावे?
शहरीकरणी श्वास कोंडला
मना वाटते परत फिरावे


वयस्क लोकांना आठवेल की जुन्या काळी घरात एखाद्या स्त्रीला लुगडे (साडी) घेतली तर कुटुंबातली दुसरी स्त्री ती साडी प्रथम नेसायची. नंतर धुवून ती साडी जिच्यासाठी आणली अहे ती स्त्री नेसायची. या पध्दतीला घडी मोडणे असे म्हणत असत.


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Monday, May 13, 2013

प्रेम करावे म्हणतो


सारी स्वप्ने पूर्ण जाहली
तरी जगावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

पूर्णविरामाची ना पडली
गाठ कधी माझ्याशी
प्रवाह खळखळ, दोस्ती केली
मी खाचा खळग्यांशी
अपूर्णतेला पूर्णत्वाचे
वेड असावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

जसा चेहरा तसा दावला
स्पष्टपणे मज त्याने
दोष पाहुनी प्रयत्न केला
सुधारण्या जोमाने
निर्भिड त्या आरशास आता
सत्कारावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

अश्वमेध जाहला करोनी
उंच तरी मन उडते
दहा दिशांचे कर्तृत्वाला
क्षेत्र अपूरे पडते
दिशा आकरावी शोधाया
त्वरे निघावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

नमते घेउन समझोत्याने
जीवन सारे जगलो
विद्रोहाची उर्मी येता
बेफिकिरीने हसलो
निर्भय होउन जीवनास मी
ललकारावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो

देह जाहला जीर्ण तरीही
मला न त्याची चिंता
तूच जाणसी कसा वागलो
दयाघना भगवंता
पुन्हा फुलाया नवीन जन्मी
आज मरावे म्हणतो
नवस्वप्नांच्या हिंदोळ्यावर
प्रेम करावे म्हणतो


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Thursday, May 9, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-४


माझा आवडता गायक तलत मममूद याच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने---

लखनौ मधे एका सनातनी (ऑर्थोडॉक्स) मुसलमान कुटुंबात २४ फेब्रुवारी, १९२४ रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्या वेळी कुणाला स्वप्नातही वाटले नसावे की देशातील एका भावी गायकाचा जन्म झाला आहे. खरेच भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे आज पर्यंत कोणालाही कळलेले नाही. हे जन्मलेले व पहिले श्वास घेत असलेले बाळ म्हणजेच नंतरच्या काळचा प्रसिध्द गायक तलत महमूद होय.
तलतने अगदी लहान वयातच आपली संगीतातील रुची दाखऊन दिली. गाणे ऐकण्याचा, विशेशतः रागदारी संगीत -खूप नाद होता. रात्रभर जागून तो संगीताच्या मैफिली ऐकत असे. संगीत त्याला जीव की प्राण वाटत होते. आणी हा शौक वाढतच गेला. त्याचे कुटुंब सनातनी असल्यामुळे घरात संगीताला विरोध होता. संगीत हे मुस्लीम समाजात अन-इस्लामिक मानले जाते. हा केवढा विरोधाभास आहे पहा! रागदारी संगीताच्या क्षेत्रात दिग्गज गायक आणि उस्ताद मुस्लीम आहेत. पण असे मानले जाते की संगीत इस्लाम विरोधी आहे. असो.
घरातील विरोधाला तोंड देत देत तलतने संगीत शिकण्यास सुरुवात केली. Maris College of Music म्हणजे आताचे भातखंडे संगीत महाविद्यालय, येथील पं. भट यांच्याकडे १९३० मधे संगीताचे धडे घेण्यास सुरू केले. या नंतर तलतला अ‍ॅक्टिंग मधे पण रुची निर्माण झाली आणि त्या दिशेने त्याने पावले उचलण्यास सुरुवात केली. संगीत आणि अ‍ॅक्टिंग हे दोन छंद जोपासणे घरच्यांना मंजूर नव्हते. शेवटी तलतला घर आणि अ‍ॅक्टिंग या पैकी एकाची निवड करणे भाग पडले आणि त्याने आपला छंद जोपासयाचा निर्णय घेतला आणि घराला रामराम ठोकला. लखनौ सोडून कलकत्ता जवळ केले.
वयाच्या सोळाव्या वर्षी तलतने गझल गायक म्हणून १९३९ साली आपले संगीतातले करिअर सुरू केले..प्रसिध्द शायर दाग, मीर, जीगर इत्त्यादीच्या गझला रेडियो लखनौ वर गात असे. त्याच्या आवाजाचा पोत कांही काळातच रसिकांच्या आणि संगीतकारांच्या नजरेत भरला. यामुळेच की काय १९४१ मधे HMV या प्रसिध्द रेकॉर्ड कंपनीने त्यांना पहिल्या गाण्याचे निमंत्रण देऊन करारबध्द केले. तलतला. दहा वर्षाच्या खडतर तपस्येनंतर आणि नाव कमवल्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याला पुन्हा घरात स्विकारले.
तलतला खरा ब्रेक मिळाला तो त्याच्या पहिल्या गैरफिल्मी गझल "तसवीर तेरा दिल मेरा बहला न सकेगी" मुळे. या गझलेस अमाप प्रसिध्दी मिळाली. आता तलत फक्त लखनौ आणि कलकत्त्याचा न राहता पूर्ण देशाचा झाला. शेवटी तलतने करिअरसाठी १९४९ मधे आपले बोर्‍याबिस्तर मुंबईला हलवले.
जुन्या काळी एकच व्यक्ती अ‍ॅक्टिंग आणि गात असेल तर त्याला खूप स्कोप होता. या मुळेच के. एल. सहगल, किशोर कुमार, अशोक कुमार (हादरलात! होय, अशोक कुमारनेही गाणी गायली आहेत), सुरैया, नूरजहाँ हे त्या काळी प्रसिध्द होते. असेच तलतचेही घडले. त्याने पण अ‍ॅक्टिंग केली तीही एक नाही दोन नाही तब्बल १६ फिल्म्स मधे! त्याच्या बरोबर काम केलेल्या नट्या म्हणजे कानन बाला. भारतीदेवी, शामा, नादिरा, सुरैया, शशिकला, माला सिन्हा, नूतन वगैरे वैगरे.
तलतचा गायनाच कालखंड १९३९ ते १९८६. त्याने श्रोत्यांच्या मनावर अक्षरशः राज्य केले. त्या काळात केत्येक देशात त्याचे कार्यक्रम खच्चून भरलेल्या सभागृहात झाले. त्याला इंग्लंडच्या रॉयल अल्बर्ट हॉल मधे लाइव्ह कार्यक्रम करायचा मान मिळाला. विदेशात त्याच्या कार्यक्रमाला लोक अधीच रांग लावून ताटकळत बसत असत. तलत म्हणजे दर्द, तलत म्हणजे मखमली आवाज, तलत म्हणजे रसिकांच्या दिलाचा राजा अशी त्याची ख्याती होती. अत्त्यंत हळुवार, मनमिळाऊ होता तो. दिलीप कुमार त्याला perfect gentleman म्हणत असे. जसा रेशमी आवाज तसाच रेशमी कोणताही पीळ नसणारा स्वभाव. त्याचे एकही गाणे असे नाही की ऐकणार्‍याच्या ह्रदयाला भिडत नाही. अशा गुणी कलाकाराचा भारत सरकारने १९९२ मधे पद्म भूषण हा किताब देवून सत्कार केला.
पण १९६० च्य सुमारास हलकी फुलकी आणि रॉक अँड रोल टाईप गाणी यायला सुरुवात झाली आणि तलत मागे पडला. मागणी तसा पुरवठा या न्यायाने संगीतकारही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले. हा काळ फार कठीण असतो कलाकारांसाठी. हे घडणे अपरिहार्य असले तरीही तगमग होतेच ना! पिढी बदलली . सचिनदेव बर्मन यांनी त्यांच्या गाण्यांचे सोने करून घेतले तलतच्या गळ्या द्वारे. पण राहुलदेव बर्मनने तलतला घेणे शक्यच नव्हते. त्याच्या संगीताचा पोतच वेगळा होता.
तलतने अगदी कमी म्हणजे एकूण ८०० च्या जवळपास गाणी गायली. आशा या गुणी गायकाने आजच्याच दिवशी म्हणजे ०९.०५. १९९८ ला शेवटचा श्वास घेतला आणि पैगंबरवासी झाला. अ‍ॅक सुरेख वाटचाल संपली. एक हळुवार मोरपीस अल्लाह कडे गेलं. काळ हा सर्वात क्रूर असतो. त्याला कुणाचाही मुलाहिजा नसतो. कधी कधी मनात अशक्य असे प्रश्न येतात. तलत सारखे अनेक कलाकार र जेंव्हा आपापल्या कारकिर्दीच्या परमोच्च बिंदूवर असतात तेंव्हाच काळाच्या घड्याळाचे काटे का बरे थांबत नाहीत? का ही माणसे मनाला असा चटका लाऊन जातात! एक गोष्ट बरी आहे की असे गुणी लोक अपल्या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्य भोवती मृत्त्यूनंतरही दरवळत असतात.
आज माझ्या या मालिकेअंतर्गत मी ज्या गाण्याची निवड केली आहे ते देख कबिरा रोया या १९५७ सालच्या चित्रपटातील आहे.संगीतकार मदनमोहन दी ग्रेट आणि गीतकार राजेंद्र कृष्ण हे आहेत. गायक अर्थातच तलत महमूद मी या गाण्या बद्दल कांही लिहीत नाही कारण लेखण खूप प्रदीर्घ झालं आहे. तुम्हीच ते ऐकून ठरवा कसे आहे ते!. या गाण्याचे बोल खाली देत आहे.
हम से आया ना गया, तुम से बुलाया ना गया
फासला प्यार में दोनों से मिटाया ना गया

वो घड़ी याद हैं, जब तुम से मुलाकात हुई
एक इशारा हुआ, दो हाथ बढ़े, बात हुई
देखते, देखते दिन ढल गया और रात हुई
वो समां आज तलक़ दिल से भूलाया ना गया

क्या खबर थी, के मिले हैं तो बिछड़ने के लिए
किस्मते अपनी बनाई हैं, बिगड़ने के लिए
प्यार का बाग़ लगाया था, उजड़ने के लिए
इस तरह उजड़ा के फिर हम से बसाया ना गया

याद रह जाती हैं और वक्त गुजर जाता हैं
फूल खिलता ही हैं, और खिल के बिखर जाता हैं
सब चले जाते हैं, कब दर्द-ए-जिगर जाता हैं
दाग जो तूने दिया, दिल से मिटाया ना गया
हे गाणे ऐकाण्यासाठी क्लिक कराhttp://www.youtube.com/watch?v=0FdShtk9FYA

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail---nishides1044@yahoo.com

Tuesday, May 7, 2013

मला लागते उचकी गं !



कॉम्प्यूटरग्रस्त आणि फेसबुक वेड्यांसाठी (ज्यात माझा समावेश आहे) एक आगळी वेगळी रचना

आठवणीच्या ऑप्शनवरती
नकोस मारू टिचकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

सहजासहजी मैत्री झाली
फेसबुकवरी तुझ्यासवे
जीव तुझ्यावर जडून गेला
पडू लागले स्वप्न नवे
झाली चॅटिंग मधाळ इतकी
तू न वाटसी परकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

कळून आले प्रोफाइल तो
बोगस होता तुझा तरी
मना पटेना झूठ बरसतिल
श्रावणातल्या कशा सरी ?
घेतलीस तू उगाच माझी
क्रूर अशी का फिरकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

पुरे जाहले मृगजळ आता
नकोत भेटी गाठी गं
फॉरमॅटिंग मी माझे केले
तुला विसरण्यासाठी गं
तरी व्हायरस तुझा असा का
मनात घेतो फिरकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

फुले, कळ्या अन् बाग बघाया
शोध घेतला गुगलवरी
चित्र पाहिले लोभसवाणे
सभोवती दुष्काळ जरी
बागेश्रीची हसरी धुन का
आज जाहली रडकी गं ?
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

व्हर्च्यूअल या जगात आहे
अभासी आकाश निळे
अ‍ॅक्च्यूअल कंगाल असोनी
श्रीमंतीचा स्वाद मिळे
अमीर आहे जो तो येथे
खिशात नसता दिडकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !

शब्द जुळवतो, कविता करतो
शांत शांत मी जगावया
दोस्त सांगती पोस्ट कराव्या
फेसबुकवरी दिसावया
संगणकाच्या नावानेही
मनात भरते धडकी गं !
कॉम्प्यूटर मी जसा उघडतो
मला लागते उचकी गं !


निशिकांत देशपांडे मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Wednesday, April 24, 2013

कुणास कांही सुचेल का?


मी नवीन कविता लिहिण्यास सुरूवात केली तेंव्हा खूप कविता माझ्या आप्तजनावरच केल्या; जसे मुलगी, नाती, आई, पत्नी, भाऊ वगैरे. नंतर आशा कविता लिहिण्यासाठी मागणी होऊ लागली तेंव्हा मनाशी ठरवले की आता हे पुरे केले पाहिजे. मी या कविता लिहून झाल्यानंतर माझ्यावृध्द आईला वाचून दाखवत असे आणि ती माझे तोंडभर कौतुक करायची. एकदा अशीच एक कविता वाचून दाखवल्यानंतर तिने मला सहजच प्रश्न केला. "तू इतक्या कविता नातेवाईकांवर लिहिल्यास; तुझ्यावर कुणी लिहील का?" या एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जसजसा विचार करू लागलो तसतसे नवीन प्रश्न निर्माण होऊ लागले. पहिला प्रश्न म्हणजे खरेच माझ्यात कोणी कविता लिहावी असे कांही आहे का? मग जीवनाचा आढावा. या विचार मंथनातून तयार झालेली ही वैयक्तिक स्वरूपाची ही रचना.

सर्वांवरती कविता रचल्या
मजवर कोणी रचेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

आषाढी कार्तिकीस क्षेत्री
पूर पाहुनी भक्त जनांचा
येथूनच मी पूजा केली
संचय केला पुण्यकणांचा
इथे वाहिल्या भावफुलांनी
विठ्ठल मूर्ती सजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

ग्रिष्म ऋतूचा सूर्य तापला
वसुंधराही करपुन गेली
उपासना सूर्याची करता
शुध्द मनाची हरपुन गेली
माध्यान्हीच्या आर्घ्य जलाने
सूर्य नभीचा भिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

कर्ज न घेता परत फेडणे
जीवनातले सार असे
देत राहिलो दोन्ही हाते
अजून बाकी फार असे
जीवन सरले देणे उरले
काळ जरासा थिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

विणत राहिलॉ गोफ जीवनी
बिन गाठींचा हौसेने
मुल्यांकन मी कधी न केले
नात्यांचे धन पैशाने
हीच भावना मनात माझ्या
पुढील जन्मी रुजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

पडो न खांद्यावरी कुणाच्या
ओझे यत्किंचितही माझे
दुबळ्या पायावरती चालत
गाठीन ध्येयाचे दरवाजे
चढाव चढता उतार समयी
देहयष्टी ही झिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

तिरडी बांधुन आपल्यासाठी
तिरडीवरती मीच झोपलो
मरण येइना लवकर म्हणुनी
माझ्यावरती मीच कोपलो
श्राध्द न करण्या सांगितले तर
पुढील पिढीला रुचेल क?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, April 20, 2013

सात समंदर

( जब बेटा और बेटी दोनो विदेश चले गये तो हमारी- स्वयं और मेरी पत्नी- जिंदगीके एक मायून कतरेसे सौगात रही. उस समय मन मे जो विरह भावनाओंका तूफान उमड पडा, उसको शब्दांकित करनेका प्रयास किया था )

साथ घुटन और तनहाई का
अपने ही घरके अंदर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

फूल अकेला ना मन भाये
साथ खिले सारा हि चमन
आप्त जनों के इर्दगिर्द मे
खिले खिले हो सब के मन
खुद से हि डरता दिखता है
तनहाई मे शूर सिकंदर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

दूर गगन मे उड गये पंछी
आँगन लगता है अब सूना
बादल काले छाकर बतलाए
वीरानी का एक नमूना
बिना तारका आसमान मे
शोलाकुल लगता है चंदर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

हिमालय भी रो उठता है
छोडे जब हिम उसका साथ
आँसू उसके कैसे पोंछे?
कहाँ मिलेंगे काबिल हाथ?
लब काँपे आँसू भी छलके
समझा था खुद को कलंदर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

रिश्तों के धागों से बुना यह
वस्त्र बडा है मनभावन
जब भी ओढो तन पर अपने
मानो जैसे छाया सावन
अंधियारों के दौर मे मिला
तनहाई का साथ निरंतर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Thursday, April 18, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-३


या मालिकेत लिहिलेल्या दोन भागांचे रसिक वाचकांनी भरभरून स्वागत केले. त्यातून प्रेरणा घेऊन आज तिसरा भाग सादर करत आहे.
माझे बालपण एक अगदी लहान खेड्यात गेलेले आहे. गावात जेमतेल ७०/८० घरे असावीत. आमचे एकटेच ब्राह्मणाचे घर. गावात सोवळ्या ओवळ्याचा त्रास होतो म्हणून आम्ही आमच्या शेतातच एका कुडाच्या घरात रहात होतो. मला अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट प्रकर्षाने आठवते म्हणजे एके दिवशी पहाटे मला जाग आली. बाहेर स्वच्छ चांदणं पडलेलं होतं. सर्वत्र निरव शांतता. हवा पण नव्हती. झाडे एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे शांत उभी होती. माझं वय तेंव्हा जेमतेम १०/११ वर्षाचं असावं. दुरून कोठून तरी अगदी हळूच कांहीतरी आवज आल्याचा भास होत होता. आवाज अतिशय मंजूळ होता. श्वास घेण्याच्या आवाजाने पण तो गायब होत होता. श्वास रोखला की तो अस्पष्टसा ऐकू येई. तो आवाज हळू हळू मोठा होऊ लागला आणि जवळ जवळ येतोय असे वाटू लागले. नंतर लक्षात आले की एक बैलगाडी जवळ जवळ येत आहे आणि तो आवाज बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगुरांचा होता. घराशेजारच्या रस्त्यावरून बैलगाडी गेली. ती जशी जशी दूर गेली तसा आवाज मंद मंद होत गेला आणि शेवटी ऐकू येणे बंद झाले. हे इथे सांगायचे प्रयोजन म्हणजे त्या आवाजात मी उच्चप्रतीचे माधुर्य अनुभवले जे ६० वर्षानंतरही माझ्या स्मरणात आहे. मला त्या दिवशी संगीताची अनुभूती झाली. एक साधी घटना ह्रदयवर कायमची कोरली गेली. या लेखमालेच्या निमित्ताने मी माझ्या आठवांच्या जुन्या गावी पोंचलो आणि जरा वेळ हरवून गेलो.
संगीत हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. मग ते संगीत कोणत्याही प्रकारचे असू देत. एका मोठया शास्त्रीय गायकाला प्रश्न विचरला होता तो असा. "पंडीतजी, पाश्चात्य और हिंदुस्तानी संगीत मे क्या फर्क है?" पंडीतजीने फार समर्पक उत्तर दिले होते. ते म्हणाले "दोनों संगीत शैलियों मे सर से पाँव तक का फरक है." अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणाले "हिंदुस्तानी संगीत सुनते समय श्रोता सम के उपर सर हिलाकर दाद देते है. पाश्चात्य संगीत सुनते समय श्रोता ताल पर पैर हिलाते है." किती समर्पक उत्तर अहे ना? जिथे ताल आला तेथे संगीन आलेच.
हिंदी सिनेमात १९४९ साली एक शुभ शकून झाला. बरसात नावाचा एक पिक्चर रिलीज झाला. बरसात चे वैशिष्ट्य म्हणजे राज कपूरच्या आर.के. प्रॉडक्शन चा हा पहिलाच पिक्चर. शंकर-जय किशन यां जोडीने संगीतबध्द केलेला पहिलाच सिनेमा. शैलेंद्र या गीतकाराने प्रथमच  सिनेमा साठी गाणी लिहिली होती. यातील गाणी तुफान गाजली. लोक अक्षरशः वेडे झाले होते या गाण्यांवर. या सिनेमाने श्रोत्यांना संगिताच्या बरसातीत चिंब चिंब केले होते. नंतरच्या काळात आर.के., शंकर जयकिशन आणि शैलेंद्र या त्रिमूर्तीच्या संगिताचा महापूर कित्येक वर्षे चालू होता. संगिताची लयलूट चालू होती.
आज जे गाणे आपणापर्यंत पोहंचवायचे ठरवले आहे त्याचे गीतकार शैलेंद्रच आहेत आणि संगीतकार शंकर जयकिशन. शंकर-जयकिशन  या जोड्गोळीने एकाहून एक सरस गाणी दिली आहेत. लोक म्हणतात की या दोघांपैकी जयकिशन हे सरस होते. जयकिशन यांना इंग्रजी पिक्चर्स पहायचा खूप नाद होता. ते नेहमी मॉर्निग शोला जात असत. त्यातील एखादा म्युझिकचा तुकडा आवडला की लागलीच त्या वरून गाणे तयार होत असे. नंतर नंतर या दोघात बिनसले. कारण शंकर यांची मेहुणी "शारदा" या गायिकेवरून. तिचा आवाज सुमार होता म्हणून जयकेशन यांना ती नकोशी होती. वाचकांनी सूरज या सिनेमातील "तितली उडी" हे गाणे आठवावे म्हणजे तिच्या आवाजाचा पोत लक्षात येईल.
मी जुन्या संगिताचे गुणगाण गातो याचा अर्थ असा नव्हे की त्या काळी सर्व कांही अलबेलच होते. अपप्रवृत्तीही होत्याच होत्या.एक मजेशीर किस्सा सांगतो. त्या काळी फिल्मफेअर अवार्ड्स देण्याची वेगळी पध्दत होती. बेस्ट म्युझिकचे आवार्ड देताना रेकॉर्ड्स कोणत्या सिनेमाच्या जास्त विकल्या गेल्या हा निकष होता. रेकॉर्ड्स बनवणार्‍या दोनच कंपन्या होत्या. एक एच. एम.व्ही. आणि थोड्या प्रमाणात पॉलिडॉर. एकदा मुंबईत चौपाटीवर गणपती विसर्जन करताना कांही लोकांच्या पायाला विचित्र स्पर्ष जाणवला. खाली हात घालून पाहिले तेंव्हा एका हिंदी सिनेमाच्या गाण्याची एल.पी. होती. कुतुहल म्हणून शोध घेतला असता जवळ जवळ २००० एल.पीज. त्याच सिनेमाच्या सापडल्या. म्हणजे आवार्ड साठी कोणीतरी त्या रेकॉर्ड्स खरेदी करून खप जास्त आहे असे दाखवायचा प्रयत्न केलेला होता.असो.
आज निवडलेले गाणे "सीमा" या चित्रपटातले आहे. गायक मनाडे, संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र. चित्र्पटात काम केले आहे बलराज सहानी आणि नूतन यांनी. या लोकांबद्दल काय बोलावे? मन्नाडे यांनी रागदारी फिल्मी गाण्यात स्व्तःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. एका सिनेमात, बहुधा "बैजु बावरा" असावा, त्यांनी प्रत्यक्ष भीम्सेन जोशींबरोबर एक जुगलबंदी अगदी समर्थपणे गायली आहे, शंकर जयकिशन यांनी १९४९ च्या पहिल्याच बरसात चित्रपटापासून जवळ जवळ २५ वर्षे रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. बलराज साहनी यांचा चेहरा अतिशय बोलका होता अभिनयाच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ते एकमेव नट त्या काळात होते. खूप लोकांना माहित नाही, ते विचारसरणीने कम्युनिस्ट होते. दो बिघा जमीन हा चित्रपट अल्पभूधारकाच्या जीवनावर होता. त्यात त्यांनी जीव ओतून काम केले होते. लोकांना अजूनही हकीकत हा चित्रपट आठवतो.
आता पुन्हा एकदा शंकर जयकिशन बद्दल थोडे. या दोघांनी भरपूर रागावर अधारीत गाणी कंपोज केली आहेत. त्यांनी दरबारी आणि भैरवी रगात बरीच गाणी दिली आहेत. आजचे गाणे दरबारी रागातले आहे. याच रागातील त्यांची दुसरी गाणी म्हणजे "झनक झनक तेरी बाजे पायलिया" आणि "राधिके तुने बन्सरि चुराई" ही होत. शंकर आणि जयकिशन यांच्यात कोण चांगली गाणी देतो यासाठी स्पर्धा असायची. या सिनेमात शंकरने "सुनो छोटिशी गुडिया की लंबी कहानी" हे अजरामर गीत बनवले तर जयकिशनने प्रत्युत्तर म्हणून "तू प्यारका सागर है" हे बनवले जे मी तुम्हाला आज ऐकवणार आहे.
या गाण्याच्या व्हिडियो मधे लक्ष देवून बलराज सहनी च्या चेहर्‍यावरील भाव बघा. अगदी स्थीर दत्तात्रयांच्या
 मूर्तीसमोर बसून हे भजन गायलेले आहे. देवावर नजर स्थीर असली तरी किती भाव व्यक्त होतात हे तुम्हीच अनुभवा. छोट्या मुलीच्या केसात हात फिरवणे, नंतर ती मुलगी बलराज सहानीच्या पायावर हात फिरवते सारे कांही इतके नैसर्गिक आणि मनाला स्पर्षणारे वाटते की आपण पण तल्लीन होऊन जातो. या गाण्याचे बोल आहेतः--

तू प्यार का सागर है
तेरी इक बूँद के प्यासे हम
लौटा जो दिया तुमने
चले जायेंगे जहां से हम
तू प्यार...

घायल मन का पागल पंछी उड़ने को बेक़रार
पंख हैं कोमल, आँख है धुँधली, जाना है सागर पार
अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहाँ से हम
तू प्यार...

इधर झूम के गाये ज़िंदगी, उधर है मौत खड़ी
कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी
कानों में ज़रा कह दे, कि आएँ कौन दिशा से हम
तू प्यार...

चला मग. या गाण्याचा आनंद घेण्यासाठी क्लिक करा
http://www.youtube.com/watch?v=e2D-kjOMNF0
YouTube - Videos from this email




Saturday, April 13, 2013

लोक लाभले किती वेगळे !


दीन भुकेल्या रयतेचे हे भाग्य आगळे
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

कोण मूर्ख तो पोलिसवाला गाडी अडवी?
शिक्षा करण्या आमदार मग त्याला बडवी
भेद विसरले, नेता गण एकत्र येउनी
बडतर्फीच्या टाचेखाली इमान तुडवी
न्यायाचे का जिवंत असता प्रेत जाळले?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

अभद्र नेते ठाउक नाही अभंगवाणी
ताल सोडुनी बडबड करती, आले कानी
लघुशंकेला सर्व निघाले धरणामध्ये
तरी लोक का म्हणती पीण्या नाही पाणी?
अक्रोशाची  शांत शांत का अशी वादळे?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

काळ बदलला, आज अपेक्षा किती बदलल्या
रोटी, कपडा, मकान गरजा जुन्या जाहल्या
गाल्ली बोळांमध्ये देइन मुतार पोई
खैरातीच्या खास घोषणा घुमू लागल्या
मते मागती राजकारणी, आम्ही बावळे
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

राजकारणी नको तिथेही वास तयांचा
देवांच्याही गळ्याभोवती फास तयांचा
असोत साई, विठ्ठल अथवा लंबोदरही
अग्रपुजेचा मान नेहमी खास तयांचा
ट्रस्टी होउन काबिज केली किती देउळे?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Tuesday, April 2, 2013

जीवन

"जीवन" या विषयावर पाच मुक्तके

वृत्त-देवप्रिया:-


१)   आर्जवे केली तुझी अन् लाखदा चुचकारले
      पाहुनी तोरा तुझा मी कैकदा फटकारले
      कुंडली जमलीच नाही जीवना माझी तुझी
      साठवाया वेदना मी काळजा विस्तारले

२)   काढताना कुंचल्याने स्केच माझा हासरा
      सत्त्य दडवत घेतला मी कल्पनांचा आसरा
     ओढले तू त्या दिशेने फरपटाया लागलो
     जीवना होता कधी हातात माझ्या कासरा?

३)   वाद ना संवाद केला जीवनाशी मी कधी
     गुंतलो नाही कधीही मोहपाशी मी कधी
     वास्तवाशी नाळ तोडुन आवडीने पाहतो
     कल्पना विश्वात रमुनी स्वप्नराशी मी कधी

४)   मी तसा आहे कलंदर दु:ख ना शिवते मना
     कोण आहे आज माझे जीवना तू सांग ना !
     का भणंगाशी तरी घेतोस पंगा रे असा?
     जाणसी तू जिंकतो मी एकहाती सामना

वृत्त-व्योमगंगा:-

५)   रंग भरतो वेदनांचे मस्त रांगोळीत माझ्या
     दु:ख ओघळते फुलोनी नेटक्या ओळीत माझ्या
     लोक जगती भीत ज्याला तेच आलो मागण्या मी
     भीक मृत्त्यूची प्रभो तू टाक रे झोळीत माझ्या


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Thursday, March 28, 2013

बिनकामाचे जुने पुराने


काळाच्या ओघात जाहले
अस्त हजारो राहघराणे
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

कोठीवरती वर्दळ आहे
आज, परंतू कोणासाठी?
नव्या पिढीतिल तारुण्याला
मजनू येती लुटण्यासाठी
हमिदाबाई वृध्द भळभळे
आठव्णींच्या चित्काराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

नवीन रेषा, परीघ नवखा
नवी भूमिती जीवन झाले
जुनीच पत्नी नवी प्रेयसी
असे खूपदा त्रिकोण झाले
हीच कहाणी व्यापत आहे
इतिहासाचे कैक रकाने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

आज मितीच्या धुंद नव्यांनो
मनी एवढी जाण असू द्या
सुपातल्यांनो जात्यामध्ये
उद्या जायचे ध्यान असू द्या
दु:ख उद्याचे नकात विसरू
मस्त आजच्या सत्काराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

सतार वाजे दिडदा दिडदा
कुणी छेडले जुन्या सुरांना ?
झंकाराने जुन्या सुरांच्या
नाद लाभला नव्या स्वरांना
जरी वाटतो नवीन लहजा
जुनेच गाती सर्व तराने
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने

जुने नवे हे दोन किनारे
भेद कशाला? एकच सरिता
जुना जुना तो प्राण सोडला
जन्म नव्याने घेण्याकरिता
बंद जाहला तरी गुदमरे
श्वास चितेवर किती धुराने?
नवे कालचे आज जाहले
बिनकामाचे जुने पुराने


निशिकां देशपांडे मो.क्र.  ९८९०७ ९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

Sunday, March 24, 2013

(भाग-३) मराठी भाषादिनाच्या निमित्ताने


मराठी भाषादिनाच्या निमित्ताने समूहावर मला जे प्रश्न विचारले होते त्यांना प्रतिसाद मी दोन भागात दिला होता. कांही अपरिहार्य कारणाने कांही प्रश्नांना प्रतिसाद देवू शकलो नाही त्या बद्द्ल दिलगिरी व्यक्त करतो.
आज मी महेन्द्रने चारोळ्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाबद्दल थोडी चर्चा करतो. खरे तर महेंद्र स्वतःच उत्कृष्ट चारोळ्या लिहितो हे मला माहीत आहे. मी त्यच्या चारोळ्या लक्ष देवून वाचत असतो.
मी स्वतः चारोळ्या लिहीत नाही. पण चारोळ्या वाचतो. त्यातून माझ्या निदर्शनास जे आले ते येथ सांगत आहे.
कवितेप्रमाणे चारोळ्याचे कांही नियम असल्याचे मला माहीत नाही; आणि माझ्या वाचण्यातही आले नाहीत. पण ही रचना नाव सुचवते त्या प्रमाणे चार ओळींचीच असते. या मर्यादेमुळे थोडक्यात प्रभावीपणे सांगण्याची कसरत करावी लागते. यात कविच्या प्रतिभेचा कस लागतो. जरी आजकाल चारोळ्या उदंड झाल्याचे बोलले जात असले तरी; सुरेख चारोळ्या लिहिणे तसे अवघडच असते.
मी ज्या चारोळ्या वाचल्या आहेत त्यावरून मी चारोळ्या खालील प्रकारात विभागतो.
१)  अशा चारोळ्या ज्यांच्या चारही ओळीत यमक असते
२)  अशा चारोळ्या ज्यांच्या दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते.
३)  अशा चारोळ्या ज्याच्या पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते
४)  आशा चारोळ्या ज्यात यमक नसतेच.
या व्यतिरिक्त खालील प्रकार पण आहेत.
अ)  कांही चारोळ्या गजलेच्या वृत्तात असतात. त्यांच्या पहिल्या, दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असते. अशा चारोळ्यांना "मुक्तक" असे म्हणतात.उदाहरणा दाखल मी रचलेली दोन मुक्तके देत आहे.
१)  देत जा जखमा मला तू वेदनांचेही झरे
    भळभळू दे अन् पडू दे लाख हृदयाला चरे
    झेलता तव घाव ताजे विसरतो मी त्या जुन्या
    वेदनांना, अन् मनाला वाटते थोडे बरे>>>>>>>( देवप्रिया वृत्त )

२)  जी मनी बसली कधीची ती घरी आलीच नाही
    जी घरी आली रहाया ती मनी बसलीच नाही
    लावला मी मुखवटा अन् जिंदगी तडजोड बनली
    झाकली भळभळ अशी की ती कुणा दिसलीच नाही>>>>>>( व्योमगंगा वृत्त )

ब)  गजलेच्य वृत्तातील ( वरील प्रमाणे ) चारोळी जर उर्दूत लिहिली तर त्याला "कतआ" म्हणतात.

क)  रुबाई हा एक काव्य प्रकार आहे जो फक्त चार ओळींचा असतो. रुबाई हा काव्य प्रकार फार्सीत ऊमर खय्याम याने लोकप्रिय केला. रुबाईचे अनेकवचन रुबाइयात असे आहे. रुबाईचे अपले ५४ वृत्त आहेत. यातच रुबाई लिहावी लागते. खाली  डॉ. शेख इकबाल मिन्ने यांची एक रुबाई उदाहरणा दाखल देत आहे.

दु:खद माझे जीवन सारे जगलो
हरलो सारे मात्र नव्याने लढलो
डोक्यावर आकाश कितीदा पडले
मात्र लपोनी भीत कधी ना बसलो >>>>>( वृत्त-मिहिर )

रुबाईच्या संदर्भात अजून बरेच नियम आहेत पण त्या क्लिष्ट क्षेत्रात जाण्याचे सध्या प्रयोजन नाही.
 नियमात अडकून बसण्यापेक्षा चारोळ्या भरपूर वाचव्यात आणि तंत्र आत्मसात करावे. मी श्री. चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्यांचे वाचन आणि मनन करण्याचे  सर्वांना सुचवेन.चारोळ्या गजलांप्रमाणे वाचकांच्या हृदयास भिडायला हव्यात. काय सांगायचे आहे ही प्रस्तावना पहिल्या तीन ओळीत आणि प्रभावी शेवट (क्लायमॅक्स) शेवटच्या ओळीत असा यावा की वाचकाने लागलीच दाद दिली पाहिजे.
सर्व चारोळी रचनाकारांना माझ्य हार्दिक शुभेच्छा.


  

Saturday, March 23, 2013

यादों का खजाना है


अपनों से गिला शिकवा
कभी हमने न जाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

वाक़िफ हूं खूब तुझ से
तनहाई मत डराना
सदियों से साथ तेरा
तू ही मेरा तराना
अंदर उदास फिर भी
खुद को ही रिझाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

गर्दिश मे है सितारे
किसकी दुवा नही है
आँखें है सुर्ख मेरी
मय को छुआ नही है
गायब है नींद फिर भी
सपनों को सजाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

शबनम की ओस से भी
पहचान कहाँ मेरी?
असवन की चली आँधी
आहट जो सुनी तेरी
दिल की लगी को फिर भी
अश्कोंसे बुझाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

साकी के संग पीना
क्या दिन वो सुहाने थे !
पीने के दौर सारे
मिलने के बहाने थे
साकी नही है फिर भी
आँखों से पी जाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है

मुष्किल है समझ पाना
मुझको हिसाब तेरा
क्या हाल बन गया है
परवरदिगार मेरा?
बेबाक मै हूं फिर भी
कफ़न  तो सिलाना है
मिल जुल न सके फिर भी
यादों का खजाना है


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com


Friday, March 22, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग १


परवाच माझ्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्र्क्रिया झाली. एक १५ मार्च आणि दुसरी १९ मार्चला झाली. गेले ८/१० दिवस डोळ्यावर काळा चष्मा लाऊन, खिडक्याचे पडदे बंद करून अंधारात वेळ घालवतोय हल्ली. अंधाराशी हितगूज करत काळोखाशी बघता बघता दोस्ती पण झाली ! वेळ घालवण्यासाठी सर्व प्रकारचे संगीत- गाणी, गजला, रागदारी, भावगिते वगैरे वगैरे ऐकले. आणि हे करताना मला बरेच कांही गवसले. अंधारात मला खरेच नवा प्रकाश मिळाला.
आपण गाणी ऐकताना नॉर्मली धुन; चाल आणि संगीत ऐकतो आणी गाण्याच्या शब्दांकडे फार कमी लक्ष असते. मी सर्व गाणी शब्दांकडे (काव्याकडे) लक्ष देवून ऐकली आणि मला वेगळाच अनुभव मिळाला. म्हणुनच मी म्हणालो की अंधारात मला प्रकाश गवसला. वेगवेगळ्या कवींनी, शायरांनी किती सुरेख शब्द सुनियोजित पध्दतीने वापरले आहेत हे बघून थक्कच झालो. एके दिवशी पूर्ण दिवस गाणी ऐकल्यानंतर या वेदनेच्या काळातही मला खालील ओळी सुचल्या या संबंधातात


काल काव्याचा मनाला स्पर्ष झाला
वेदनांनाही जरासा हर्ष झाला

काळजाला काल मी देऊन बसलो
कोंदणे हृदयात मी रुजवून बसलो

शब्द पाचूंचीच ती बरसात होती
मी भुकेला भेटली खैरात होती

अशा मनाच्या चिंब अवस्थेत विचार केला की माझा हा अनुभव इतरांशी शेअर करावा. मी प्रथम हिंदी सिनेलातील गीत आणि संगीताबद्दल बोलणार आहे. जुन्या काळची गाणी आणि संगीत अतिशय उच्च दर्जांची होती. हा एक मोठा खजाना आहे याची आपणास जाण असावयास हवी. अतिशय अर्थपूर्ण रचना, प्रसंगास पोषक असे संगीत, सुमधूर चाली आणि आजही ती गाणी ऐकून त्यात तल्लीन होणे या खुब्या आहेत.
मी आज जे गीत निवडले आहे ते १९५९ साली निर्मित सुजाता या चित्रपटामधील आहे. गायक-तलत महमूद, गीतकार. मजरूह सुल्तानपुरी, आणि संगीतकार-सचिनदेव बर्मन, दि ग्रेट.
तलत महमूदचा आवाज हा अतिशय हळूवार, मखमली पोताचा होता. दर्दभरे गीत गावे ते तलत महमूदनेच ही त्यांची त्या काळी ख्याती होती. त्यांचे गाणे ऐकताना हृदयावरून मोरपीस फिरवल्यागत वाटायचे. सचिनदेव बर्मन यांच्या संगीताबद्दल काय बोलावे. सगळेच अल्टिमेट असायचे. या गीतातील बासरीचे पीसेस ऐका. किती हळूवार आहेत याचा अनुभव घ्या. हे गीत खालील प्रमाणे आहेत.

जलते है जिनके लिए तेरी आँखों के दिये
ढूंड लाया हूं वही गीत मै तेरे लिए

दर्द बन के जो मेरे दिल मे रहा ढल ना सका
जादू बन के तेरी आँखों मे रुका, चल ना सका
आज लाया हूं वही गीत मै तेरे लिए

दिल मे रख लेना इसे हाथोंसे ये छूटे न कहीं
गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं
गुनगुनाउंगा येही गीत मै तेरे लिये

जब तक ना ये तेरे रस के भरे होटों से मिले
यूं ही आवारा फिरेगा यह तेरी जुल्फों के तले
गाये जाउंगा येही गीत मै तेरे लिए
प्रत्येक कडवे किती प्रेमळ भावात ओथंबलेले आहे ! जो गीतकार "गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं"
असे स्वतःच्या गीताबद्दल लिहितो त्याने गीत लिहिताना किती काळजी घेतली असेल. पूर्ण गाणे वाचून त्याची ही ओळ किती सार्थ वाटते !
आता थोडे पिक्चरायजेशन बद्दल. हा व्हिडियो पाहताना सर्वांना एकदम वेलकम चेंज वाटेल. डोळ्यांना, कानाला आणि डोक्याला सूदींग वाटेल. सध्याच्या गाण्याचे पिक्चरायजेशन म्हण्जे ५०/६० मुलामुलींचा घोळका मागे कुत्रे लागल्याप्रमाणे पळत असतो. वाचक रसिकांना थोड्या चांगल्या विश्वात नेण्यासाठी खाली या गाण्याची व्हिडियो लिंक देत आहे. क्लिक करून डोळे झाकून शांतपणे ऐका आपणास स्वर्गसुखाचा अनुभव येवून समाधी लागेल
http://www.youtube.com/watch?v=YwxHIkL_b7k

मी एक प्रयोग म्हणून हे लिखाण केले आहे. आपणास कसे वाटले या बद्दल जरूर मतप्रदर्शन करा म्हणजे मला पुढील दिशा मिळेल




Wednesday, March 20, 2013

काय वेगळे जगून केले?


भार जाहलो धरेस मी हे
किती उशीरा कळून आले?
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

जसा जन्मलो वाढत गेल्या
सातत्त्याने माझ्या गरजा
शोध सुखाचा घेत राहिलो
करीत आलो रोज बेरजा
माझ्यातच मी गुरफटलेला
असेच जीवन सरून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

छाया देण्या ऊन झेलती
इतरांसाठी झाडे जगती
मंदमंदसा उजेड देण्या
तेवत असते सदैव पणती
परमार्थाचे विचार येण्या-
अधी मनातुन पळून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

आदर्शाची किती वानवा !
सारे दिसती भरकटलेले
मार्ग दावण्या कुणीच नाही
काळे गोरे बरबटलेले
इमानदारी अन् शुचितेचे
बुरखे सुध्दा गळून गेले
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

सरणावर भाजावी पोळी
टाळूवरचे खावे लोणी
हेच सूत्र जगण्याचे झाले
अपुले नसते खरेच कोणी
जग हे स्वार्थी इथे कुणी का
कोणासाठी झुरून मेले?
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?

धरतीवरची माती व्हावे
जगास चारा देण्यासाठी
लाख असू दे सर्प भोवती
व्हावे चंदन झिजण्यासाठी
नकोच देवा जन्म मानवी
पशू अर्जवे करून गेली
श्वास घेतले श्वास सोडले
काय वेगळे जगून केले?


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Thursday, March 14, 2013

माझी पहिली विदेश वारी

माझा मुलगा आणि सून आमेरिकेत बोस्टन येथे रहात होते. मुलगा सारखे बोस्टनला येण्याविषयी आग्रह करत होता. मी त्या वेळी नोकरीवर असल्याने रजा नाही या सबबीखाली टाळत होतो.एका शनिवारी फोन खणाणला.
फोनवर मुलगा बोलत होता. नेहमीचे बोलून झाल्यावर त्याने बाँबशेलच टाकला. म्हणाला तुमचे आणि आईचे मुंबई ते न्यूयॉर्क विमानाचे तिकिट कुरियरने पाठवले आहे. अमूक अमू़क तारखेचे आहे आणि बांधाबांध सुरू करा. प्रवास नक्की ठरला याचे मुख्य कारण म्हणजे प्रवासाच्या खर्चिक बाबीची काळजी मुलाने घेतली होती. नाही तरी मध्यवर्गातील महाराष्ट्रीयन माणसाने दरडोई ४५,००० रुपायाचे तिकिट काढून प्रवास करणे म्हणजे कपिलाशष्टीचा योगच! दुसरे महत्वाचे गोड कारण म्हणजे आम्ही दोघेही आजी आजोबा होणार होतो. तेंव्हा नाही म्हणून टाळायचा आता  प्रश्नच नव्हता.
प्रवासाचा ( मुंबई--बोस्टन व्हाया लंडन ) दिवस निश्चित झाला आणि घरातले वातावरणच बदलून गेले. सोबत काय काय घ्यायचे? मुलांना काय काय आवडते? सुनेचे बाळंतपण म्हणजे डिंकाच्या लाडूचे सामान, बाळंत झाल्यावर सुनेला रोज आळिवाची खीर आशा नाना विषयावर चर्चेच्या फैरी झडू लागल्या. वर "श्री गणेशायनमः" असे लिहून खरेदीच्या याद्या बनू लागल्या.
फोनवर संभाषण झाल्यानंतर चारच दिवसानी फेडेक्स या आमेरिकन पोस्टल कंपनीचा एक जाडजूड लिफाफा आला ज्यात दोन तिकिटे, व्हिसा मीळवण्यासाठी अवश्यक ती कागदपत्रे आणि प्रवासाच्या अथ पासून इती पर्यंत दिलेल्या सविस्तर सुचना होत्या. मला वाटते आमचा प्रवास हा साध्याच पण कधी न अनुभवलेल्या गोष्टी बघण्यामुळेच अविस्मरणीय झाला. आता हेच बघा ना ! आपणाला पाठवलेले पत्र देशातल्या देशात ८ ते १५ दिवसांनी पोहंचणे यात कांही गैर वाटत नाही. पण बोस्टनहून पाठवलेला लिफाफा चार दिवसात हाती पडला. येथूनच मनात अमेरिकेचे कौतुक वाटायला सुरू झाले.
तिकिटावरील सर्व सुचना (अगदी बारीक अक्षरातल्या) दहा वेळेस तरी मी वाचल्या असतील. ओघाने ओघाने ध्यानात आले की दरडोई दोन बॅगा आणि प्रत्येक बॅगेतील सामानाचे कमाल वजन ३२ किलो पेक्षा जास्त नसावे असे ध्यानात आले. आणि त्या अनुषंगाने खरेदीला सुरुवात झाली. १५ दिवस चर्चा आणि खरेदी हेच अव्याहपणे
 चालू होते.
आणि प्रवासाचा दिवस येऊन ठेपला.आम्ही मुंबईला सहारा इंटर नॅशनल विमानतळावर पोहंचलो. मनात एक सुप्त भिती होती.कारण आमची ही पहिलीच "खेप" (वारी) होती देशाटन करण्याची.
प्रवास एअर इंडीयानेच होता. प्रथम चेक इन काउंटरवर गेलो. वजनदार सामान तेथे हवाली केले.बॅग्ज भरताना आम्ही तरकाट्याने (स्प्रिंग बॅलन्स) प्रत्येक बॅगचे वजन करून कमाल मर्यादेत आहे याची खात्री करून घेतली . काऊंटरवर एका बॅगचे वजन ३२ ऐवजी ३० किलो भरले. मी आणि माझी पत्नी दोघांच्याही  मनात आले की अरे रे! अजून थोडे सामान घेता आले असते. इमायग्रेशन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून डिपार्चर लाउंज मधे थांबून थोड्या वेळातच आम्ही विमानात बसलो.
बहुतांश विमान प्रवासी  भारतीय होते.त्यांचे एकंदरीत वागणे, वेशभूषा, जीवनाचा प्रत्येक क्षण एंजॉय करण्याची वृत्ती बघून वाटत नव्हते की भारत एक गरीब देश आहे. ते विश्वच वेगळे होते. विमानाने झेप घेतली आणि आम्ही दोघांनीही डोळे मिटले. परक्या जगात सुखरूप प्रवास व्हावा म्हणून मनात अथर्वशिर्षाचे पठण करत  देवाचा धावा केला.
पहिला प्रवास हिथ्रो विमानतळ, लंडन हा साडेआठ तासाचा होता.तेथे उतरून आम्हाला वेगळ्या धावपट्टीवर जाऊन दुसरे विमान लंडन- न्यूयॉर्क पकडायचे होते. कोणत्या धावपट्टीवर विमानात बसायचे ते मुलाने कळवले होते. हे विमानतळ प्रचंड मोठे आहे.पहिल्या टर्मिनलवरून शेवटच्या टर्मिनलवर जाण्यासाठी रेल्वेने जावे लागते.आमची धावपट्टी त्या मानाने जवळ होती. आम्ही चालत गेलो. प्रत्येक ठिकाणी इंडीकेशन बोर्ड्स इतके स्पष्ट होते की आम्ही वीस मिनिटे चालल्यानंतर हव्या त्या धावपट्टीवर पोहंचून चेक-इन केले.पुढील विमानास अडीच तासाचा वेळ होता.थंडी कडाक्याची असूनही मी विमानतळाबाहेर फेरफटका मारला. त्यात प्रकर्षाने ध्यानात आलेल्या गोष्टी खालील प्रमाणे होत्या.
---अतिशय रूंद रस्त्यावर मी पाथवे वरून चालत होतो.कोठेही पथारीवाला दिसला नाही.
---सार्वजनीक रस्ता असूनही कोठेही घाण नव्हती.
---एकाही कोपर्‍यात कणीही थुकलेले दिसले नाही
---परिसरात कोठेही कुण्या दादाच्या किंवा भाऊच्या वाढदिवसाचे किळसवाणे फ्लेक्स दिसले नाहीत.
---"शादीके पहले या शादीके बाद"असे गुप्तरोग आणि लैंगिक समस्येवर इलाज करणार्‍या दवाखान्याच्या जाहिराती दिसल्या नाहीत.
I WAS MISSING MY INDIA COMPLETELY.
पुन्हा पुढील प्रवास सुरू झाला. न्यूयॉर्क विमानतळावर मुलगा आला होता.त्याच्या सोबत कारने बोस्टनला पोहंचलो आणि प्रवासाची नवलाई संपली.
यथावकाश एका नातीचे आम्ही आजी आजोबा झालो.नव्या बाळात सर्वच रंगून गेले.कशी गंमत असते नाही! बाळ जन्मले की पूर्ण कुटुंब त्याच्या भोवती फिरत असते. ते सर्वांच्या जगण्याचे केंद्रबिंदू बनते. आमचेही तेच झाले.ते दिवस आम्हासाठी स्वर्गसुखाचे ठरले.कसे उडून गेले कळलेच नाही. व्हीसाची मुदत संपत आली आणि परतीच्या प्रवासाचे वेध लागले. येताना खूप उत्साह, कुतुहल, उर्जा होती. परतताना नेमकं उलट घडत होतं.
मरगळ, मरगळ आणि फक्त मरगळ ! चिमुरड्या नातीत जीव एवढा अडकला होता की डोळे पुन्हा पुन्हा ओलावत होते.शेवटी विमानतळावर हुंदका आवरत मुलगा, सूनबाई आणि नातीला टाटा केला. निघायच्या आदल्या रात्री मनाची सारखी घालमेल होत होती.रात्रभर झोप नव्हती.  त्या रात्री नातीच्या विरहाचे दु:ख सांगणारी एक रचना झरणीतून ओघळली ती अशी :--

एकही नसता नभ आकाशी वीज कशी ही कडकडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

निद्राधिन तो गोंडस चेहरा जणू चंद्रमा वसे घरी
संगमरमरी रूप लाडके आनंदाच्या पडती सरी
शांत स्पंदने असता छाती आज अशी का धडधडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

तुझ्यामुळे ना कळले आम्हा दिवस कसे गेले उडुनी
सुख संसारी पीत राहिलो अमृत आम्ही सदैव बुडुनी
चाहुल येता तव विरहाची स्वप्ने सारी गडगडली
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

फुलांपासुनी सौरभ आणि चंद्रा पासुन शीतलता
वसंत ऋतुच्या पासुन होतिल दूर कधी का तरूलता?
सुंदर गाणे सोडुन जिंव्हा विरह गीत का बडबडली?
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

कस्तुरी मृग असताना सदनी धूंद राहिलो सुगंध पिउनी
दूर रहावे कसे तिजविना जीवन गेले सुन्न होउनी
सवय असूनी एकांताची मनोभावना चिडचिडली
ओली होउन एक पापणी आज अचानक फडफडली

परतीच्या प्रवासाची सांगता विरह भावनेमुळे एका वेगळ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली.