Tuesday, May 21, 2013
गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-४
मी कधी कधी विचार करतो की आमची पिढी किती भाग्यवान आहे ! याची देही याची डोळा आम्हाला गांधी, नेहरू, सावरकर बाबा आमटे,, राज कपूर, बलराज सहानी, सचीन तेंडुलकर, सुनील गावसकर, लता मंगेशकर, आशा भोसले, तलत महमूद, मोहमद रफी, एकाहून एक ग्रेट संगीतकार अशा हजारो विभूती बघावयास आणि ऐकावयास मिळाल्या. या लोकांबद्दल शंभर वर्षानंतर जर सांगितले तर लोकांना खरे वाटणार नाही. त्यांना या सार्या दंत कथा वाटतील.
मी आज या मालिकेखाली जे गाणे निवडले आहे ते लता मंगेशकरने गायलेले आहे. मी आज माझ्या कुवतीनुसार लताजींबद्दल थोडे लिहिणार आहे. त्यांच्या बद्दल काय काय आणि किती लिहावे? नवीन पिढीला जुन्या कांही चांगल्या गोष्टी कळाव्यात म्हणून हा सारा प्रपंच.
मला जसे गाणे कळते तेंव्हा पासून मी लताजीना ऐकतोय. त्यांच्या मधूर गळ्याने सार्या देशाचे संगीताशी नाते जोडले. लोकांचा संगीत क्षेत्रात कान तयार केला. पूर्वी रेडिओ हे एकमेव गाणी ऐकण्याचे साधन होते. त्य्य पण विविध भारती आणि सिलोन ही महत्वाची स्टेशन्स. केंव्हाही रेडिओ लावला की १० गाण्यापैकी किमान ६ गाणि लताजींची असायची. अर्थात, हे सर्व यश आणि किमया सहजासहजी नाही घडली. त्याच्या मागे खडतर तपस्या, रियाज होते.
लताजीचा जन्म २८ एप्रील १९२९ साली इंदौर येथ झाला. घरात संगीताचे वातावरण होते. एक मजेशीर गोष्ट अशी की त्यांनी पहिले मराठी फिल्मी गाणे १९४२ साली (वयाच्या १३व्या वर्षी) मराठी फिल्म "किती हसाल" या सिनेमासाठी गायले होते. पण सिनेमात गाणे म्हणणे हा विचारच दिनानाथ मंगेशकरांना पटला नाही आणि त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. म्हणून हे गाणे त्या सिनेकातून काढून टाकले.
१९४७ साली त्या काळचे प्रसिध्द संगीतकार गुलाम हैदर (त्यांना सगळे आदराने मास्टरजी म्हणत असत) यांचा गाणे गाण्यासाठी निरोप आला. लताजी रेकॉर्डींग स्टुडिओ मधे रात्री पोहंचल्या. त्या वेळेस गायकाला ऑर्केस्ट्रा सोबत एकाच बैठकीत पूर्ण गाणे म्हणावे लागे. थोडीही चूक झाली की पुन्हा रिटेक! मास्टरजीना सर्व गाणी त्याच दिवशी पूर्ण करायची होती; कारण त्यांना दुसर्या दिवशी पाकिस्तानला जायचे होते. लताजींचा रेकॉर्डींग साठी नंबर सुर्योदयच्या वेळी आला. त्यांनी गयलेले गाणे होते "बेदर्द तेरे दर्द को".तो पर्यंत त्या एका बेंचवर कोपर्यात बसून होत्या. गाण्याचे रेकॉर्डिंग सकाळी ८.३० ला झाले. मास्टरजी त्यांच्या गाण्यावर जाम खुष होते.
गडबड असूनही मास्टरजी लताजींना घेऊन फिल्मिस्तान या कंपनीच्या मुखर्जीकडे गेले. ते निर्माण करत असलेल्या शहीद या चित्रपटाची गाणी लताजींना गाण्याची संधी देण्याची शिफारस केली. मुखर्जींनी तिला गाणे गावयास लावले. गाणे ऐकून त्यांनी आवाज खूप पातळ (thin) आहे या सबबीखाली प्रस्ताव धुडकावला. मास्टरजी त्यावेळी मुखर्जींना म्हणाले की आज आपण या पोरीला नकारताय. ऊद्या सर्व फिल्म इंडस्ट्री या मुलीचे स्वागत करील तेही रेड कार्पेट टाकून !. अन् झालेही तसेच! त्यांची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. एकाच वर्षात लताजींनी अंदाज, बरसात, बडी बहन, महल अशा यशस्वी चित्रपटात मातबर संगीतकारांबरोअब्र गाणी गायली.हा आवाका पाहून एके दिवशी मास्टरजीचा लताजींना फोन आला. मास्टरजी लताला म्हणाले "मैने जो कहा था पह सच निकला ना?" नंतर चार पाच महिन्यांनी पाकिस्तानहून नूरजहाँचा लताला फोन आला आणि म्हणाली "मास्टरजी को कॅन्सर हुआ है".
लताजींना खरा ब्रेक मिळाला तो महल या सिनेमातील " आयेगा आनेवाला आयेग" या गाण्यापासून. नंतरच्या काळात सर्व लिडींग संगीतकारांबरोबर त्यांनी गाणी गायली. या मधे शंकर-जयकिशन, एस.डी. बर्मन, नौशाद, हेमंतकुमार, सलील चौधरी आदींचा समावेश होता. शंकर जयकिशन यांच्यावर तर लताजींच्या आवाजाने जादूच केली होती.
लताजींनी जवळजवळ २० भाषेत गाणी गयली आहेत. त्यांनी किती गाणी गायली आहेत यावर बराच वाद आहे ज्याच्यावर येथे चर्चा करायची गरज नाही. त्यांना असंख्य सन्मान प्राप्त झालेले आहेत. नंतर त्यांनी नवीन संगीतकारांबरोबर गाणी गायला सुरुवात केली ज्या मधे आर.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, जयदेव, कल्याणजी आनंदजी आदींचा समावेश आहे.
१९६२ मधे भारताला चीन कडून लढाईत हार पत्करावी लागली होती. सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी विविध भारतीवर "जयमाला" हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी प्रसारीत होत असे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण एखादा सेलिब्रेटी करत असे. एक कार्यक्रम लक्ष्मिकांत-प्यारेला यांनी प्रक्षेपित केला होता. त्यात ते म्हणाले की लताजी हे या विश्वातले एक आश्चर्यच आहे. त्यांना एखाद्या गाण्याची धुन पियानोवर किंवा पेटीवर वाजून दाखवली की त्या लिहिलेल्या गाण्यावर कांही स्वरचिन्हे करतात. त्या जेंव्हा गाणे गातात तेंव्हा आम्ही सुचवलेल्या चाली पेक्षा खूप सुंदर हरकती घेऊन गाण्याचे सोने करतात. त्यांच्या गाण्याला कधीही रिटेक करावे लागत नाही
त्या अगदी सहजतेने गातात. ऐकायला सोपी वाटणारी गाणी इतरांना म्हणायला खूप अवघड असतात. वर्षानुवर्षे रियाज करूनही चाफा बोलेना या गाण्याची पहिली तान गळ्यातून काढणे जमत नाही; हा आहे त्यांचा महिमा !
अजून एक किस्सा येथे अवर्जून सांगावा वाटतोय. बडे गुलाम अली खाँ साहेब त्या काळचं रागदारी संगीतातलं एक बडं प्रस्थ होतं. खाँ साहेब साथीला संवादिनी किंवा सारंगी घेत नसत. फक्त चार तंबोर्याची साथ आणि ठेका धरण्यासाठी तबला. एकदा त्यांच्या गायनाचा कर्यक्रम एका शाळेच्या प्रांगणात होता. खाँसाहेबाचे गाणे अगदी रंगात आले होते. दर्दी श्रोतेही अगदी तल्लीन झाले होते. त्या मैदानाच्या भोवती कांही घरे होती. खाँसाहेब एकदम गाणे थांबऊन शांत झाले आणि साथीदारांनाही वाजवणे बंद करण्यास सांगितले आणि स्वतः डोळे मिटून बसले. लोकांना कळेना हे काय चालले आहे ते. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले " ये कमबख़्त कभी बे सुरी होतीही नही" त्या वेळेस एका घरात लतांनी गायलेले भाई भाई या चित्रपटातील "कदर जाने ना ओ कदर जाने ना मोरा बालम" हे रेडिओवर गाणे लागले होते, आणि त्यांचे हे उदगार त्या गाण्याला ऐकून होते. किती ग्रेट लता आणि दिलखुलास दाद देणारे खाँसाहेब पण!
असाच एक किस्सा अजून एका गाण्याचा. १९६२ च्या पराभवानंतर राष्ट्रभक्तीपर गीताची लाटच आली होती. कवी प्रदीपने लिहिलेले एक गीत सी. रामचंद्र यांनी संगीतबध्द केलं होतं. गीताचे बोल होते "ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँखमे भरलो पानी-जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी" हे गाणे लताजींनी लाल किल्ल्यावरून गायले होते. या गाण्याचा आशय आणि लताच्या आवाजातील आर्तता ऐकून पंडित नेहरू अक्षरशः रडले होते.
आशा महान लताजीने गायलेले एक गाणे चित्रपट सीमा, गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन, चित्रपट निर्मिती-१९५५. हे गाणे जयजयवंती या रागावर आधारीत आहे. गाण्याचे बोलअसे;-
मनमोहना बडे झूठे
हारकर हार नही माने
मनमोहना----
बने थे खिलाडी पिया
निकली अनाडी पिया
मोसे बेमानी करे
मुझसेही रूठे
मनमोहना-----
तुमरी ये बन्सी
बनी गला फांसी
तान सुना के मेरा
तनमन लूटे
मनमोहना-----
हे गाणे ऐकण्यासाठी क्लिक करा--http://www.youtube.com/watch?v=uXGMxTTB_Dg
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment