कुठे हरवल्या माझ्या कविता?---एक ऑनलाईन मैत्रिण. नेहमी तिच्याशी बोलताना म्हणायची की तिला भटाराखान्यात कामाला जायचे आहे. कधी मुदपाकखाना हा शब्द पण ती वापरत असे. तिच्या बोलण्यातून, तिच्या काव्यछंदाचे घरात कौतुक होत नसावे असे वाटले.उलट तिची प्रतारणाच होत असावी. तिचा गुदमर आणि होत असलेली कुचंबणा चित्रित करायचा प्रयत्न केलाय या कवितेतून.
भटारखान्यातली मुग्धिका
बोलत होती आपुल्यासवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे
वाचायाची सूर लाउनी
अपुल्या अन् इतरांच्या कविता
रोमांचांना पांघरून ती
खळखळायची बनून सरिता
तल्लिन होवुन रंगुन जाई
कवितेमधल्या भावनांसवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे
कामे उरकुन थकल्यावरती
दरवळणार्या शांत अंगणी
डोळे मिटुनी आत शोधते
उत्तररात्री एक चांदणी
खुदकन हसते मनात दिसता
शब्द धनांचे कैक काजवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे
कविता माझी रचून होता
त्याला मी वाचून दावली
संपण्याआधी मला म्हणाला
जेवण दे ना! भूक लागली
राबराबणे असे निरंतर
जगले नाही कौतुकासवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे
बंडखोर मी बनेन आता
सरस्वती मा कृपा असू दे
एकच निश्चय, लिहावयाचा
साथ जगाची असू नसू दे
नभांगणी माझ्या काव्यांचे
जगा दिसू दे लाख चांदवे
कुठे हरवल्या माझ्या कविता?
शब्द न सुचती चारही नवे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment