Saturday, August 28, 2021

शरसंधान---( वीक एंड लिखाण )

 


आठ वर्षांपूर्वी एके दिवशी माझा मोबाईल खणाणला. हॅलो म्हणता दुसर्‍या बाजूने माझा एक खूप जुना वर्गमित्र बोलत होता. आम्ही दोघे दहावीत ( तेंहा मॅट्रिक म्हणत असत ) एका वर्गात होतो. एकदा त्याने खाणाखुणा सांगत ओळख पटवली आणि गप्पा सुरू झाल्या. अगदी दिलखुलास! त्याने पुढाकार घेऊन त्या वर्षी दहावीत होते त्या मुलांचे एक गेट टुगेदर करायचे ठरवले होते. त्यासाठी फोन नंबर्स आणि पत्ते काढून तो संपर्क साधत होता. आम्ही सारे अंबाजोगाईच्या शाळेत होतो. मी त्याला प्रोत्साहन देऊन पुढे जाण्यास सांगितले. लागेल ती मदत द्यायचीही तयारी दाखवली. 

या नंतर जवळ जवळ एक महिन्याने त्याचा परत फोन आला. त्याने सांगितले की बत्तीस मित्रांनी यायची तयारी दर्शवली आहे. पण सर्वांना अंबाजोगाई गैरसोयीचे वाटत असल्याने आणि एवढ्या लोकांची बडदास्त ठेवणे शक्य नसल्याने, गेटटुगेदर एका मोठ्या शहरात ठरले. तारीखही ठरली होती. मी त्याला हिरवा कंदील दाखवला.

यथावकाश आम्ही सर्वजण एकत्र जमलो आणि यादोंके गलियारोंका सफर शुरू हुवा. कोण कोठे असते, काय करते, मुलं मुली काय करतात असे अनेक प्रश्न चर्चिले गेले. मधे मोकळ्या वेळात माझे खास असलेले चार मित्र भेटले. वेगळा ग्रुप करून गप्पा सुरू झाल्या. आम्ही पाच जणांनी असे ठरवले की हा कार्यक्रम झाल्यावर कुठे तरी आउटींगला जायचे एका रात्रीसाठी. आणि आम्ही निघालो. मित्रात जसे वातावरण असते तसेच होते. भरपूर गप्पा, थट्टा, मस्करी, वर्गातील मुलींच्या आठवणी वगैरे.

मला प्रथमच कळाले की त्या चौघातील दोघांना फेसबुकमुळे माहीत होते की मी कविता करतोय. आणि सगळ्यांनी माझी  छेड काढायला सुरुवात केली. त्यांनी  खोचक पण हसत विचारलेले प्रश्न असे:

१) निशा, तुला कविता करायची आवदसा कशी सुचली?

२) जगात आणि मराठीत एवढे कवि असताना तू धाडसच कसे केलेस त्यात भर टाकायची?

३) जगात कुठे भूकंप झाला तर लोक दु:खी होतात पण कवी मात्र संधी आहे असे समजून त्यावर कविता करत बसतात.

४) मुक्त्छंदातल्या कविता तर एखादे गद्य ओळी तोडून लिहिल्या सारखे असते. या वर मी सांगितले की माझ्या लयीत आणि वृत्तात असतात. असे सांगितल्यावर एकजण मोठ्याने म्हणाला की आपला निशिकांत अधुनिक मोरोपंत आहे बरे का!

५) आणि त्या चारोळ्या आणि हायकू? तू लिहितोस की नाही?

बरे हे सारे मित्र शाळेत असताना असे वाह्यात नव्हते. आम्ही शाळेच्या वाचनालयातून पुस्तके घेऊन वाचत असू आणि त्यावर चर्चा पण करत असू. मला वाटले ते माझी फिरकी घेत आहेत म्हणून मी दुर्लक्ष केले. आम्ही सर्वजण आपापल्या गावी परतलो. या कार्यक्रमामुळे आमच्यातील संपर्क वाढला. पण मनात सारखे येत होते की कवी आणि कवितांबद्दल इतके गैरसमज आहेत लोकात? माझे मन मित्रांचे मला चिडवणे सहजासहजी पचवायला तयार नव्हते. या विचार मंथनातून कविता तयार झाली जी थोडी खोचक, म्हंटलं तर विनोदी, थोडी आत्मचिंतन करायला लावणारी अशी झाली आहे. खरे तर हा माझ्या कवितेचा बाज नाही म्हणून पार्श्वभूमी सांगायचा हा प्रपंच.  या कवितेतून तसे पाहता मी (कवी) माझ्यावरच शरसंधान केलेले आहे.

मी एका ठिकाणी वाचलय की माणसाला स्वतःकडे तिर्‍हाईत नजरेने बघता आले पाहिजे. मी छोटासा कवि असूनही ही रचना याच भावनेतून लिहिली आहे. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. कविता पेश करतोय.


वादळ गेले, वळले नाही


हात जोडुनी जा जा म्हणता

पाय रोवले, गेले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


माणसावरी संकट येते

पूर असो ढगफुटी असू द्या

दु:खाचा डोंगर कोसळतो

माय मरो वा बाप मरू द्या

यावरही कविता केलेल्या

कुणी वाचुनी थकले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


व्यासपिठावर बरीच गर्दी

आणि अल्पसे श्रोते असती

असेल तेथे कविसंमेलन

जिथे कवींची अमाप भरती

कविता वाचन ठीक, तरन्नुम

श्रोत्यांना आवडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


कविविश्वाची विचित्र पध्दत

पहिली सर पडते ना पडते

लगेच श्रावण कवितांची झड

सर्वदूर जोमात बरसते

कवितेसाठी विषय संपले

असे कधीही घडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


सांगायाचे काय न ठावे

यमक जोडण्या धडपड नुसती

आर्या, वृत्तामधली कवणे

यांची झाली पडझड नुसती

दिवस चांगले काल कवींना

आज यूग ते उरले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


श्लोक, आरत्या, स्तोत्रे सारी

काव्य प्रकारातून उपजले

म्हणताना ते उगा वाटते

देवांना ते सर्व भावले

कंटाळुन त्या कवणांना तो

पावत नसतो, कळले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

वादळ गेले, वळले नाही

 हात जोडुनी जा जा म्हणता

पाय रोवले, गेले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


माणसावरी संकट येते

पूर असो ढगफुटी असू द्या

दु:खाचा डोंगर कोसळतो

माय मरो वा बाप मरू द्या

यावरही कविता केलेल्या

कुणी वाचुनी थकले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


व्यासपिठावर बरीच गर्दी

आणि अल्पसे श्रोते असती

असेल तेथे कविसंमेलन

जिथे कवींची अमाप भरती

कविता वाचन ठीक, तरन्नुम

श्रोत्यांना आवडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


कविविश्वाची विचित्र पध्दत

पहिली सर पडते ना पडते

लगेच श्रावण कवितांची झड

सर्वदूर जोमात बरसते

कवितेसाठी विषय संपले

असे कधीही घडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


सांगायाचे काय न ठावे

यमक जोडण्या धडपड नुसती

आर्या, वृत्तामधली कवणे

यांची झाली पडझड नुसती

दिवस चांगले काल कवींना

आज यूग ते उरले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


श्लोक, आरत्या, स्तोत्रे सारी

काव्य प्रकारातून उपजले

म्हणताना ते उगा वाटते

देवांना ते सर्व भावले

कंटाळुन त्या कवणांना तो

पावत नसतो, कळले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


Saturday, August 7, 2021

कवितेचा आशय---( वीक एंड लिखाण )


मला बर्‍याच वेळा अनुभव आला आहे की कविता काय लिहायची, कशी लिहायची, कधी लिहायची हे कधी कधी कवीच्या हातात नसते. माझ्या बर्‍याच कविता मला जशा हव्या होत्या तशा आकारल्या नाहीत.
सध्या सर्व समूहावर उपक्रम आणि स्पर्धांचे, विशेषतः व्हाट्स अ‍ॅपवर, पीक माजले आहे. प्रत्येक समूह असे उपक्रम राबवत असतातच. चारोळ्या, शेल चारोळी, ओळ देवून कविता, वृत्त देवून गझल, चित्र चारोळ्या किंवा कविता, एक ना दोन, कैक उपक्रम राबवले जातात. या खाली लिहिलेले लिखाण ठराविक वेळातच पोस्ट करावे लागते.
एकच प्लस मुद्दा असा आहे की लोकांना लिहिते करता येते. मी असे समूह पाहिलेत जेथे विषय दिला जातो. एक  कडवे चार ओळीचे असावे , दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक असावे असे अनेक नियम सांगून कविलोकांच्या मुसक्या बांधल्या जातात. मला आश्चर्य वाटते की अशा परिस्थितीत नैसर्गिक कविता होईल कशी? मग ओढून ताणून शब्द जुळवले जातात. अशा स्पर्धांमुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. एका समूहाच्या अ‍ॅड्मिनने मला फोन करून उपक्रमात कविता पाठवण्याची गळ घातली. मी जेंव्हा त्यांना नियमाविषयी बोललो तेंव्हा त्यांच्याकडे कांहीही स्पष्टीकरण नव्हते. जे लोक अशा कविता लिहितात त्यांचे मला कौतुक वाटते. कविता म्हणजे हॉटेलचे मेनू कार्ड नसते. जी ऑर्डर दिली ते पुरवले जाते. 
हे सर्व लिहायला कारणही तसेच आहे. आम्ही तीन वर्षापूर्वी एका अ‍ॅग्रो टूरिस्ट रिसॉर्ट्ला पिकनिकसाठी गेलो होतो. खूप छान ठिकाण होते. सर्व सोयी उत्तम होत्या. लोकांची गर्दी पण बर्‍यापैकी होती. दिवस खूप एंजॉय केला सर्वांनी.
दुपारचे जेवण झाल्यानंतर दाट झाडीखाली बाजा ( कॉट्स) टाकल्या होत्या. मी थोडा आडवा झालो. दाट झाड असून आणि मी सावलीत असूनही उन्हाची तिरीप तोंडावर येत होती. मनात विचार आला की सूर्य का असा मला डोकावून बघत आहे? कविमनच ते. लागलीच दोन ओळी आठवल्या ज्या मोबाईलमधे टाईप करून सेव्ह केल्या. मनात विचार आला की नंतर आरामशीर या पिकनिकवर एक छान कविता लिहावी. पुण्याला सारेजण परतलो. त्या ओळींबद्दल पार विसरून गेलो. जवळ जवळ दीड वर्षानंतर त्या ओळी बघण्यात आल्या आणि कविता लिहायची उर्मी आली. बसलो थाटात कविता लिहायला. मूळ कल्पना पिकनिकवर लिहायची होती. पण दुसरेच सुचत गेले. पूर्ण झालेली कविता एकदम भिन्न अंगकाठीची झाली. या आधी पण असे झालेले आहे. म्हणून म्हणतो की कवितेचा आशय आधीच ठरवता येत नाही. ऐनवेळी जे सुचेल तीच कविता/गझल असते. ती कविता खाली देतोय रसिकांच्या सेवेत.

सूर्य का मला शोधतो आहे?

अता कुठे सावली मिळाली, चैन भोगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?


रखरख वणवण सदैव असते पाचवीस पुजलेली
आयुष्याची घडी त्यामुळे सदैव विसकटलेली
लगाम घालत आकांक्षांना, मजेत जगतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जिथे संपतो रस्ता तिथुनी चालू प्रवास होतो
कसे जायचे ध्येय दिशेने, बांधत कयास असतो
अनवट वाटांवरती पाउल खुणा सोडतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

पहिल्या, शेवटच्या श्वासातिल अंतर असते जीवन
त्यात भेटतो कधी उन्हाळा कधी ओलसर श्रावण
दु:ख-वेदनांशी मैत्रीचा सराव करतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

जन्मच झाला मुळी मानवा! जगात रडता रडता
जरी कळाले दु:ख सोबती असेल बसता उठता
हात धुवोनी तरी सुखाच्या मागे पळतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?

परावलंबी सुखास हिणकस, भाव केवढा आला!
दु:ख नांदते जगी म्हणोनी जन्म सुखाचा झाला
पर्णफुटीला पानगळीचे फलीत म्हणतो आहे
फांद्या पानातुनी सूर्य का मला शोधतो आहे ?



निशिकांत देश्पांडे, पुणे. 
मो.क्र. ९८९०७ ९९०२३