Thursday, September 23, 2021

मोठ्यांच्या छोट्या आशय गहन गोष्टी--- ( वीक एंड लिखाण. )

 

आज एक खूप जुनी आठवण आली. अशा आठवणी का आणि कशा येतात हे एक गूढच आहे. खरे तर अगम्यच! आणि मी त्या काळात रमून गेलो. ही गोष्ट सर्वांशी शेअर करायची तिव्र ईच्छा झाली; म्हणून हा प्रपंच.जवळ जवळ २५ व्॑र्षापूर्वी मी बीबीसी न्यूज चॅनलवर एक इंटरव्यू ऐकत होतो. हा इंटरव्यू ईंग्रजीतून जवळ जवळ ४५ मिनिटे चालू होता. प्रश्न विचारणारा पत्रकार भारतीयच होता आणि प्रश्नांची शांतपणे समर्पक उत्तरे देत होते बाबा आमटे! बाबांच्या आश्रमातल्या एका खोलीत प्रश्नोत्तरे चालू होती. बाबांची अगदी छोटेखानी खोली. खोलीत कमीतकमी सामान. त्या खोलीतील साधेपणा नजरेत भरण्याजोगा होता. बाबा एका बाजेवर पहुडले होते आणि शांतपणे विविध प्रश्नांना उत्तरे देत होते. अर्थातच सर्व प्रश्न हे बाबांचा आश्रम आणि त्यांच्या कार्याबद्दलच होते. बाबांची सरळ उत्तर द्यायची शैली पाहून पत्रकार भारावून गेल्याचे त्याच्या चेहर्यावरून दिसत होते. पत्रकारांनी आरडा ओरडा करत प्रश्न विचारण्याची त्यावेळी प्रथा नव्हती. बाबा बाजेवर निजून उत्तरे देत होते कारण बाबावर .थोड्या दिवसापूर्वीच कांही गुंडांनी हल्ला केला होता आणि झालेल्या दुखपतीमुळे बाबांना बसता येत नव्हते.या साक्षात्काराचा समारोप करताना पत्रकाराने शेवटचा प्रश्न विचारला की "बाबा आपणास अत्त्यूच्च समाधान देणारा आणि नेहमी स्मरणात रहाणारा एक प्रसंग सांगायचा असेल तर आपण काय सांगाल?" बाबांनी या प्रश्नाला दिलेले उत्तर ऐकून मी भाराऊनच गेलो. त्या उत्तरातून त्यांची आपल्या कर्याबद्दल वादातीत निष्ठा स्पष्ट दिसत होती. अशी माणसेच खरी राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांनी दिलेले उत्तर असे होते:-"एका खेड्यात एका पाटलाच्या १४ वर्षाच्या मुलीला कुष्ट रोग झाला. पाटलाचा अर्थातच गावातच नव्हे तर पंचक्रोशीत दबदबा होता. त्या कुटुंबाचा मानमरातब पण खूप होता. घरात कुणाला कुष्टरोग होणे ही अपमानास्पद बाब समजली जाई. म्हणून ही बातमी दडवण्यात आली. मुलीला पदोपदी घरातील लोक घालून पाडून बोलत. असेच २/३ वर्षे गेली आणि कुष्टरोग जास्तच वाढला. मुलीत नैराश्य आले. एकेदिवशी ती शेतात गेली आणि जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारली. तिला वाचवण्यात आले. ही बातमी मला कळताच मी त्या गावाला गेलो आणि त्या पाटलांना भेटलो. त्यांना समजाऊन सांगितले की कुष्टरोग इलाज केल्यास बरा होऊ शकतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी त्यांना म्हणालो की तुमच्या मुलीला मी माझ्या आश्रमात घेऊन जातो आणि तेथे तिच्यावर उपचार करतो. घरची ब्याद जातेय या विचाराने त्यांनी लगेच होकार दिला; आणि मी मुलीला आश्रमात घेऊन आलो.मुलगी खूप भ्यालेली आणि बुजलेली होती सुरुवातीला. कुणात मिसळत पण नव्हती. मी मुद्दाम तिला अधीच दोन मुली असलेल्या खोलीत ठेवले जेणेकरून तिचे मन रमेल. तिच्यावर हलकी फुलकी कामेही सोपवली. कांही शेतातली, कांही स्वयंपाकघरातली. हळू हळू मुलगी आश्रमातल्या वातावरणात रमायला लागली. तिची वागणूक पण सामान्य मुलीसारखी झाली.एकदा आश्रमात मी फेरफटका मारत असता त्या मुलीच्या खोलीपासून जात होतो. सहज मी खिडकीतून तिच्या खोलीत डोकावलो आणि अक्षरशः आचंबितच झालो. ती मुलगी आरशासमोर उभी राहून लिपस्टिक लावत होती आपल्या ओठाला. दोन वर्षापूर्वी नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्त्येचा प्रयत्न करणारी मुलगी आज सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक लावत होती. जीवनाबद्दलचा दृष्टीकोन एकदम सकारात्मक झाला होता. जगण्याची दुर्दम्य आशा तिच्यात जागली होती. हा प्रसंग मला अत्त्युच्च आनंद देणारा आणि चिरकाल ध्यानात राहणारा आहे असे मला वाटते."बाबांना अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यापैकी एखादी घटना सांगितली असती तरीही चालले असते. पण त्यांचा खरा आनंद त्यांच्या कामात होता ना की पुरस्कारात. हे उत्तर ऐकून मी शहारलो होतो हे मला आजही आठवतय. असे लोक चालते बोलते देवच असतात. हा वरील प्रसंग लिहिताना मला खालील चार ओळी सुचल्या..भेटवार्ता ऐकताना काय किमया जाहली!कूळदैवत बदलले मी, तूच बाबा माउलीपाठ देवाने फिरवली त्या अभाग्यांना तुझीहे धरेच्या ईश्वरा! लाभो तुझी रे सावली
ता.क. कुष्ठरोगाबद्दलचे एक प्रसिध्द वाक्य--ज्यांचे अवयव बधीर होतात ते कुष्ठरोगी असतात आणि ज्यांची मने बधीर असतात ते महारोगी असतात.


निशिकांत देशपांडे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३


No comments:

Post a Comment