Friday, December 25, 2015

नौशाद--सिनेसंगितातील उत्तुंग व्यक्तीमत्व


गझला, कविता लिहीत लिहीत कांही स्फूट लिखाण करावे असा विचार बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनात घोळत होता. प्रसंगोचित विषय आज मिळाला. बघू हा प्रकार किती जमतो ते.
२६-१२-१९१९ रोजी एका सनातनी मुस्लीम घरात लखनौ येथे एका मुलाचा जन्म झाला. या बाळाचे पाय कोणालाही तेंव्हा पाळण्यात दिसले नाहीत. कुणालाही कल्पना नव्हती की हे मूल पुढे जाऊन भारताच्या सिनेसंगीत सृष्टीचा अफाट उंचीचा संगीत दिग्दर्शक नौशाद असेल. लखनौ शहराची ख्याती पारंपारिक हिंदुस्तानी संगीत क्षेत्रात सर्वश्रूत आहे. संगीताचे वेड  असलेले लोक या नगरीत शेकड्याने होते आणि आहेत. नौशादला लहान पासून संगिताचे वेड होते. नौशाद यांनी संगिताचे प्राथमिक शिक्षण उस्ताद घुरबत अली, उस्ताद युसुफ अली, आणि उस्ताद बब्बन साहेब यांच्याकडे घेतले. त्यांची संगितातील रुची दिवसेंदिवस वाढत गेली. त्यांना अक्षरशः वेडच लागले संगिताचे. संगीत त्यांचा श्वास बनले.
तो जमाना मूक हिंदी चित्रपटांचा होता. लखनौमधे एक आगळा वेगळा प्रयोग केला जायचा. तबला, हार्मोनियम, सतार आणि व्हायोलीन वाजवाणारे कलाकार आधी हा मूक पट पहात असत. नंतर प्रसंगानुसार म्युझिकचे पीसेस ठरवत असत. सिनेमा सुरू झाला की हे कलाकार सिनेमाच्या पडद्यासमोर बसून म्युझिक वाजवत असत. लोकांनी हा प्रकार आवडल्यामुळे अगदी डोक्यावर घेतला आणि खूप यशस्वी झाला. या टीम मधे नौशाद यांचा सहभाग महत्वाचा असे. अशी त्यांची संगिताची वाटचाल सुरू झाली.
त्यांचे वडील वाहीद अली जे त्या काळात मुन्सिफ (कोर्टातील क्लर्क) होते त्यांना नौशाद यांचे संगिताचे वेड रुचेना. सनातनी विचारसरणीनुसार इस्लाम मधे संगीत निषिध्द मानले जाते. संगीत अंगिकारणे हराम समजले जाते. एकेदिवशी वाहीदा अली यांनी नौशाद यांना बोलाऊन खडसावले आणि त्यांना इशारा दिला की संगीतच जर तुझे ध्येय असेल तर तुला घर सोडावे लागेल.
नौशाद यांनी घर सोडले आणि नशीब काढण्यासाठी थेट मुंबई गाठली. हा काळ त्यांना खूप कठीण गेला. धडपड आणि फक्त धडपड! कांही दिवस त्यांनी रस्त्यावर झोपून पण काढला. हळू हळू जम बसत गेला मेहनत रंग आणू लागली.
स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची पहिली फिल्म होती "प्रेमनगर" जी १९४० मधे रिलीज झाली. पण त्यांना खरा ब्रेक मिळाला तो १९४४ मधे रिलीज झालेल्या "रतन" या फिल्ममुळे. या सिनेमातिल गाणी खूप गाजली.
अजून एक मजेशीर किस्सा असा की, नौशाद यांचे लग्न त्यांच्या वडिलांनी ठरवले. लग्नासाठी नौशाद लखनौ गेल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना तंबी दिली की मुलीकडे अथवा कोणालाही सांगू नकोस की तू संगीतकार आहेस म्हणून! त्यांनी घराण्याची अब्रू राखण्यासाठी सर्वांना सांगितले होते की मुलगा मुंबईला शिवणकाम (टेलरिंग) करतोय म्हणून. नौशाद यांचे दुर्दैव असे की वरातीत बँडवाले रतनची प्रसिध्द झालेली गाणी वाजवत होती; लोक बेभान होऊन नाचत होते. पण नौशाद यांना तोंड उघडायची परवानगी नव्हती. आहे की नाही मजेदार गोष्ट!
नौशाद यांची गाणी लोकसंगीत किंवा रागदारीवर अधारीत असत. त्यांनी जवळ जवळ १०० फिल्म्सना म्युझिक दिले. या माणसाने १९४२ ते १९६० या काळात सिनेफिल्म जगावर आणि रसिकांच्या मनावर राज्य केले. नौशाद कधीही दुय्यम दर्जाचे संगीतकार नव्हते. त्यावेळी पिक्चर्स संगिताच्या जोरावर चालत असत. आजच्या जमान्यात पिक्चर्स एक दोन आठवडे चालातात आणि १०० कोटींच्यावर धंदा करतात. त्यावेळी पिक्चर्स खूप दिवस चालायचे. एकाच चित्रपट गृहात पिक्चर २५ आठवडे चालला की सिल्व्हर ज्युबिली, ५० आठवडे चालला की गोल्डन ज्युबिली, आणि ६० आठवडे चालला की डायमंड ज्युबिली म्हणत. नौशादने संगीत दिलेले तब्बल ३५ सिल्व्हर, १२ गोल्डन आणि ३ डायमंड ज्युबिलीजचे रेकॉर्ड यश संपादन केले.
नौशादने सर्व गायक आणि गायिकांना गाणी दिली. सर्व गीतकारांनाही वापरले. फक्त किशोरकुमार हा एक असा गायक होता ज्याचा आवाज त्याने वापरला नाही. अगदी बोटावर मोजण्या इतपत गाणी असतीलही कदाचित; जी मला माहीत नाहीत.
नौशादच्या नावाने बर्‍याच गोष्टी प्रथम केल्याच्या नोंदी आहेत. त्या पैकी कांही मोजक्याच गोष्टी खाली माहितीस्तव देतो.
१) मदर ईंडिया (१९५७) ही पहिली मूव्ही जिला ऑस्कर नॉमिनेशन प्राप्त झाले होते.
२) बैजूबावरा मधील गाणी खूपच गाजली. ही रागावर आधारीत गाणी बनवण्यासाठी त्यांनी प्रसिध्द रागदारी गायक उस्ताद अमीरखान यांची सल्लागार म्हणून मदत घेतली.
३) दिग्गज रागदारी गायक अमीरखान आणि डी.व्ही.पालूसकर यांनी नौशादच्या दिग्दर्शनाखाली प्रथमच सिनेमात गाणे गायले. गाणे--आज गावत मन मेरो झूमके
४) नौशाद यांनी "आन" (१९५३) या सिनेमातील गाण्याला प्रथमच १०० पिसेसचा ऑर्केस्ट्रा वापरला.
५) मुगल-ए-आजम (१९६०)  या सिनेमातील गाणे "है मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्यासाठी १०० .लोकांचा कोरस प्रथमच वापरला गेला.
६) मुगल-ए-आजम याच सिनेमातील अजून एक घटना अजब आहे. प्यार किया तो डरना का या गाण्याच्या कांही भागात एको (प्रतिध्वनी) इफेक्ट आणण्यासाठी एका पुर्ण ग्लेझ्ड टाईल्स असलेल्या बंद बाथरुम मधे लता मंगेशकडून हे गाणे गाऊन घेतले होते.
७) मेरे महेबूब या सिनेमातील टायटल साँगसाठी फक्त सहा वाद्यांचा वापर करण्यात आला.
या अष्टपैलू संगीतकाराला अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील दोन महत्वाचे असे:- १--दादासाहेब फाळके अवार्ड-१९८२ आणि २--पद्म भूषण--१९९२.


नौशाद यांना सहा मुली आणि तीन मुले होती. त्यांच्या एका मुलाने -रहमान नौशाद- दोन पिक्चर्स निर्माण केले होते. १) माय फ्रेंड (१९७४) आणि २) तेरी पायल मेरे गीत (१९८४). या दोन्ही फिल्म्सना नौशाद यांनी संगीत दिले.
१९६० नंतर हिंदी सिनेसंगीतात बदलाचे वारे वाहू लागले. पाश्चात्य संगीताचा प्रभाव प्रकर्षाने जाणवू लागला. फिल्म निर्माते नव्या संगीतकाराच्या मागे धाऊ लागले. नौशाद ज्यांना एकेकाळी जमान्याने /लोकांनी डोक्यावर  घेतले होते, आता दुर्लक्षिले जाऊ लागले. अशा या गुणी आणि स्वत:चा ठसा ठेवणार्‍या संगीतकाराने ०५-०५-२००६ रोजी शेवटचा श्वास घेतला आणि पैगंबरवासी झाले. त्यांना जुहू, मुंबई येथील दफनभूमीत दफन करण्यात आले.
मला नेहमी एक वाटत आले आहे. कलेच्या क्षेत्रात, मग ते संगीत असो की खेळ असो की नाटक असो की नृत्य असो धर्म, जाती, पंथ किंवा सरहदीना पण कुठलेही  स्थान नसते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे बैजू बावरा मधील एक गाणे. "मन तरपत हरी दर्शन को आज" गीतकार-शकील बदायुनी, गायक-मोहम्मद रफी, आणि संगीतकार-नौशाद. हे तिघेही मुसलमान असून या गाण्यातून भक्तिरस अक्षरशः ओथंबत आहे. हे गाणे ऐकून कोणताही हिंदू नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. हे गाणे ऐकून आपण या लेखाची समाप्ती करू या.
हे गाणे ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=OyLdgQinxpY


निशिकांत देशपांडे. मो,क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment