Wednesday, December 2, 2015

अताशा रमलो आहे---

पार्श्वभूमी---फेसबुकवर बरेच लोक टिका करतात. आजकाल अशी फॅशन झाली आहे. माझ्या मनात या संबंधात एक विचार आला. जर कुणाच्या हातात आगपेटी असेल तर काडी ओढून देवासमोर समईत ज्योत पेटवता येते. आणि कुणी काडी ओढून एखाद्याच्या घराला आगही लाऊ शकते. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर कसा करायचा हे ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. फेसबुकवर चांगले आणि वाईट दोन्हीही आहे. आपण कसा उपयोग करायचा हे आपणच ठरवायचे असते.हा विचार करताना ध्यानात आले की नवोदित कवी आणि लेखकांना फेसबुक एक वरदान आहे. अतिशय उपयोगी माध्यम उपलब्ध आहे. या विचारातून सुचलेली ही कविता. )

होरपळीच्या वास्तवात मी हरलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

दिल्या वेदना ज्यांनी, सारे अपुले होते
खरे कोणते नाते नव्हते, घपले होते
काटेरी झुडुपात आजवर जगलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

एका क्लिकवर माझी सारी मित्र मंडळी
संवादाला तत्पर असते, वेळ अवेळी
सारे माझे मी सार्‍यांचा बनलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

वाढदिनाच्या लाख शुभेच्छा, हॅलो हॅलो
पुष्पगुच्छ पाहुनी अंतरी मी सुखावलो
संगणकावरच्या मित्रांनो! भिजलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

बाड घेउनी कविता, गझलांचे मी फिरतो
प्रतिष्ठितांच्या जगात माझे कोण वाचतो?
फेसबुकवरी दाद किती! मोहरलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

वाङमय चोरी पेस्ट करूनी होऊ शकते
खुशी, चोरण्यायोग्य कुणाला काव्य वाटते !
लुबाडला गेल्यावरतीही हसलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे

एकमेव हा मंच नवोदित कवीजनांना
जिथे कारवाँ सदैव दिसतो वावरताना
टिका टिप्पणी वाचुन येथ शिकलो आहे
आभासी विश्वात अताशा रमलो आहे


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com








No comments:

Post a Comment