Wednesday, April 24, 2013

कुणास कांही सुचेल का?


मी नवीन कविता लिहिण्यास सुरूवात केली तेंव्हा खूप कविता माझ्या आप्तजनावरच केल्या; जसे मुलगी, नाती, आई, पत्नी, भाऊ वगैरे. नंतर आशा कविता लिहिण्यासाठी मागणी होऊ लागली तेंव्हा मनाशी ठरवले की आता हे पुरे केले पाहिजे. मी या कविता लिहून झाल्यानंतर माझ्यावृध्द आईला वाचून दाखवत असे आणि ती माझे तोंडभर कौतुक करायची. एकदा अशीच एक कविता वाचून दाखवल्यानंतर तिने मला सहजच प्रश्न केला. "तू इतक्या कविता नातेवाईकांवर लिहिल्यास; तुझ्यावर कुणी लिहील का?" या एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जसजसा विचार करू लागलो तसतसे नवीन प्रश्न निर्माण होऊ लागले. पहिला प्रश्न म्हणजे खरेच माझ्यात कोणी कविता लिहावी असे कांही आहे का? मग जीवनाचा आढावा. या विचार मंथनातून तयार झालेली ही वैयक्तिक स्वरूपाची ही रचना.

सर्वांवरती कविता रचल्या
मजवर कोणी रचेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

आषाढी कार्तिकीस क्षेत्री
पूर पाहुनी भक्त जनांचा
येथूनच मी पूजा केली
संचय केला पुण्यकणांचा
इथे वाहिल्या भावफुलांनी
विठ्ठल मूर्ती सजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

ग्रिष्म ऋतूचा सूर्य तापला
वसुंधराही करपुन गेली
उपासना सूर्याची करता
शुध्द मनाची हरपुन गेली
माध्यान्हीच्या आर्घ्य जलाने
सूर्य नभीचा भिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

कर्ज न घेता परत फेडणे
जीवनातले सार असे
देत राहिलो दोन्ही हाते
अजून बाकी फार असे
जीवन सरले देणे उरले
काळ जरासा थिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

विणत राहिलॉ गोफ जीवनी
बिन गाठींचा हौसेने
मुल्यांकन मी कधी न केले
नात्यांचे धन पैशाने
हीच भावना मनात माझ्या
पुढील जन्मी रुजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

पडो न खांद्यावरी कुणाच्या
ओझे यत्किंचितही माझे
दुबळ्या पायावरती चालत
गाठीन ध्येयाचे दरवाजे
चढाव चढता उतार समयी
देहयष्टी ही झिजेल का?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

तिरडी बांधुन आपल्यासाठी
तिरडीवरती मीच झोपलो
मरण येइना लवकर म्हणुनी
माझ्यावरती मीच कोपलो
श्राध्द न करण्या सांगितले तर
पुढील पिढीला रुचेल क?
धोपट मार्गी जीवन जगलो
कुणास कांही सुचेल का?

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Saturday, April 20, 2013

सात समंदर

( जब बेटा और बेटी दोनो विदेश चले गये तो हमारी- स्वयं और मेरी पत्नी- जिंदगीके एक मायून कतरेसे सौगात रही. उस समय मन मे जो विरह भावनाओंका तूफान उमड पडा, उसको शब्दांकित करनेका प्रयास किया था )

साथ घुटन और तनहाई का
अपने ही घरके अंदर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

फूल अकेला ना मन भाये
साथ खिले सारा हि चमन
आप्त जनों के इर्दगिर्द मे
खिले खिले हो सब के मन
खुद से हि डरता दिखता है
तनहाई मे शूर सिकंदर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

दूर गगन मे उड गये पंछी
आँगन लगता है अब सूना
बादल काले छाकर बतलाए
वीरानी का एक नमूना
बिना तारका आसमान मे
शोलाकुल लगता है चंदर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

हिमालय भी रो उठता है
छोडे जब हिम उसका साथ
आँसू उसके कैसे पोंछे?
कहाँ मिलेंगे काबिल हाथ?
लब काँपे आँसू भी छलके
समझा था खुद को कलंदर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

रिश्तों के धागों से बुना यह
वस्त्र बडा है मनभावन
जब भी ओढो तन पर अपने
मानो जैसे छाया सावन
अंधियारों के दौर मे मिला
तनहाई का साथ निरंतर
अपनोंने जब पार किये
लंबे चौडे सात समंदर

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Thursday, April 18, 2013

गीत आणि संगीत--सौंदर्य स्थळे-- भाग-३


या मालिकेत लिहिलेल्या दोन भागांचे रसिक वाचकांनी भरभरून स्वागत केले. त्यातून प्रेरणा घेऊन आज तिसरा भाग सादर करत आहे.
माझे बालपण एक अगदी लहान खेड्यात गेलेले आहे. गावात जेमतेल ७०/८० घरे असावीत. आमचे एकटेच ब्राह्मणाचे घर. गावात सोवळ्या ओवळ्याचा त्रास होतो म्हणून आम्ही आमच्या शेतातच एका कुडाच्या घरात रहात होतो. मला अनेक गोष्टीपैकी एक गोष्ट प्रकर्षाने आठवते म्हणजे एके दिवशी पहाटे मला जाग आली. बाहेर स्वच्छ चांदणं पडलेलं होतं. सर्वत्र निरव शांतता. हवा पण नव्हती. झाडे एखाद्या ध्यानस्थ ऋषीप्रमाणे शांत उभी होती. माझं वय तेंव्हा जेमतेम १०/११ वर्षाचं असावं. दुरून कोठून तरी अगदी हळूच कांहीतरी आवज आल्याचा भास होत होता. आवाज अतिशय मंजूळ होता. श्वास घेण्याच्या आवाजाने पण तो गायब होत होता. श्वास रोखला की तो अस्पष्टसा ऐकू येई. तो आवाज हळू हळू मोठा होऊ लागला आणि जवळ जवळ येतोय असे वाटू लागले. नंतर लक्षात आले की एक बैलगाडी जवळ जवळ येत आहे आणि तो आवाज बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घुंगुरांचा होता. घराशेजारच्या रस्त्यावरून बैलगाडी गेली. ती जशी जशी दूर गेली तसा आवाज मंद मंद होत गेला आणि शेवटी ऐकू येणे बंद झाले. हे इथे सांगायचे प्रयोजन म्हणजे त्या आवाजात मी उच्चप्रतीचे माधुर्य अनुभवले जे ६० वर्षानंतरही माझ्या स्मरणात आहे. मला त्या दिवशी संगीताची अनुभूती झाली. एक साधी घटना ह्रदयवर कायमची कोरली गेली. या लेखमालेच्या निमित्ताने मी माझ्या आठवांच्या जुन्या गावी पोंचलो आणि जरा वेळ हरवून गेलो.
संगीत हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. मग ते संगीत कोणत्याही प्रकारचे असू देत. एका मोठया शास्त्रीय गायकाला प्रश्न विचरला होता तो असा. "पंडीतजी, पाश्चात्य और हिंदुस्तानी संगीत मे क्या फर्क है?" पंडीतजीने फार समर्पक उत्तर दिले होते. ते म्हणाले "दोनों संगीत शैलियों मे सर से पाँव तक का फरक है." अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणाले "हिंदुस्तानी संगीत सुनते समय श्रोता सम के उपर सर हिलाकर दाद देते है. पाश्चात्य संगीत सुनते समय श्रोता ताल पर पैर हिलाते है." किती समर्पक उत्तर अहे ना? जिथे ताल आला तेथे संगीन आलेच.
हिंदी सिनेमात १९४९ साली एक शुभ शकून झाला. बरसात नावाचा एक पिक्चर रिलीज झाला. बरसात चे वैशिष्ट्य म्हणजे राज कपूरच्या आर.के. प्रॉडक्शन चा हा पहिलाच पिक्चर. शंकर-जय किशन यां जोडीने संगीतबध्द केलेला पहिलाच सिनेमा. शैलेंद्र या गीतकाराने प्रथमच  सिनेमा साठी गाणी लिहिली होती. यातील गाणी तुफान गाजली. लोक अक्षरशः वेडे झाले होते या गाण्यांवर. या सिनेमाने श्रोत्यांना संगिताच्या बरसातीत चिंब चिंब केले होते. नंतरच्या काळात आर.के., शंकर जयकिशन आणि शैलेंद्र या त्रिमूर्तीच्या संगिताचा महापूर कित्येक वर्षे चालू होता. संगिताची लयलूट चालू होती.
आज जे गाणे आपणापर्यंत पोहंचवायचे ठरवले आहे त्याचे गीतकार शैलेंद्रच आहेत आणि संगीतकार शंकर जयकिशन. शंकर-जयकिशन  या जोड्गोळीने एकाहून एक सरस गाणी दिली आहेत. लोक म्हणतात की या दोघांपैकी जयकिशन हे सरस होते. जयकिशन यांना इंग्रजी पिक्चर्स पहायचा खूप नाद होता. ते नेहमी मॉर्निग शोला जात असत. त्यातील एखादा म्युझिकचा तुकडा आवडला की लागलीच त्या वरून गाणे तयार होत असे. नंतर नंतर या दोघात बिनसले. कारण शंकर यांची मेहुणी "शारदा" या गायिकेवरून. तिचा आवाज सुमार होता म्हणून जयकेशन यांना ती नकोशी होती. वाचकांनी सूरज या सिनेमातील "तितली उडी" हे गाणे आठवावे म्हणजे तिच्या आवाजाचा पोत लक्षात येईल.
मी जुन्या संगिताचे गुणगाण गातो याचा अर्थ असा नव्हे की त्या काळी सर्व कांही अलबेलच होते. अपप्रवृत्तीही होत्याच होत्या.एक मजेशीर किस्सा सांगतो. त्या काळी फिल्मफेअर अवार्ड्स देण्याची वेगळी पध्दत होती. बेस्ट म्युझिकचे आवार्ड देताना रेकॉर्ड्स कोणत्या सिनेमाच्या जास्त विकल्या गेल्या हा निकष होता. रेकॉर्ड्स बनवणार्‍या दोनच कंपन्या होत्या. एक एच. एम.व्ही. आणि थोड्या प्रमाणात पॉलिडॉर. एकदा मुंबईत चौपाटीवर गणपती विसर्जन करताना कांही लोकांच्या पायाला विचित्र स्पर्ष जाणवला. खाली हात घालून पाहिले तेंव्हा एका हिंदी सिनेमाच्या गाण्याची एल.पी. होती. कुतुहल म्हणून शोध घेतला असता जवळ जवळ २००० एल.पीज. त्याच सिनेमाच्या सापडल्या. म्हणजे आवार्ड साठी कोणीतरी त्या रेकॉर्ड्स खरेदी करून खप जास्त आहे असे दाखवायचा प्रयत्न केलेला होता.असो.
आज निवडलेले गाणे "सीमा" या चित्रपटातले आहे. गायक मनाडे, संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार शैलेंद्र. चित्र्पटात काम केले आहे बलराज सहानी आणि नूतन यांनी. या लोकांबद्दल काय बोलावे? मन्नाडे यांनी रागदारी फिल्मी गाण्यात स्व्तःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. एका सिनेमात, बहुधा "बैजु बावरा" असावा, त्यांनी प्रत्यक्ष भीम्सेन जोशींबरोबर एक जुगलबंदी अगदी समर्थपणे गायली आहे, शंकर जयकिशन यांनी १९४९ च्या पहिल्याच बरसात चित्रपटापासून जवळ जवळ २५ वर्षे रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. बलराज साहनी यांचा चेहरा अतिशय बोलका होता अभिनयाच्या क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ते एकमेव नट त्या काळात होते. खूप लोकांना माहित नाही, ते विचारसरणीने कम्युनिस्ट होते. दो बिघा जमीन हा चित्रपट अल्पभूधारकाच्या जीवनावर होता. त्यात त्यांनी जीव ओतून काम केले होते. लोकांना अजूनही हकीकत हा चित्रपट आठवतो.
आता पुन्हा एकदा शंकर जयकिशन बद्दल थोडे. या दोघांनी भरपूर रागावर अधारीत गाणी कंपोज केली आहेत. त्यांनी दरबारी आणि भैरवी रगात बरीच गाणी दिली आहेत. आजचे गाणे दरबारी रागातले आहे. याच रागातील त्यांची दुसरी गाणी म्हणजे "झनक झनक तेरी बाजे पायलिया" आणि "राधिके तुने बन्सरि चुराई" ही होत. शंकर आणि जयकिशन यांच्यात कोण चांगली गाणी देतो यासाठी स्पर्धा असायची. या सिनेमात शंकरने "सुनो छोटिशी गुडिया की लंबी कहानी" हे अजरामर गीत बनवले तर जयकिशनने प्रत्युत्तर म्हणून "तू प्यारका सागर है" हे बनवले जे मी तुम्हाला आज ऐकवणार आहे.
या गाण्याच्या व्हिडियो मधे लक्ष देवून बलराज सहनी च्या चेहर्‍यावरील भाव बघा. अगदी स्थीर दत्तात्रयांच्या
 मूर्तीसमोर बसून हे भजन गायलेले आहे. देवावर नजर स्थीर असली तरी किती भाव व्यक्त होतात हे तुम्हीच अनुभवा. छोट्या मुलीच्या केसात हात फिरवणे, नंतर ती मुलगी बलराज सहानीच्या पायावर हात फिरवते सारे कांही इतके नैसर्गिक आणि मनाला स्पर्षणारे वाटते की आपण पण तल्लीन होऊन जातो. या गाण्याचे बोल आहेतः--

तू प्यार का सागर है
तेरी इक बूँद के प्यासे हम
लौटा जो दिया तुमने
चले जायेंगे जहां से हम
तू प्यार...

घायल मन का पागल पंछी उड़ने को बेक़रार
पंख हैं कोमल, आँख है धुँधली, जाना है सागर पार
अब तू ही इसे समझा, राह भूले थे कहाँ से हम
तू प्यार...

इधर झूम के गाये ज़िंदगी, उधर है मौत खड़ी
कोई क्या जाने कहाँ है सीमा, उलझन आन पड़ी
कानों में ज़रा कह दे, कि आएँ कौन दिशा से हम
तू प्यार...

चला मग. या गाण्याचा आनंद घेण्यासाठी क्लिक करा
http://www.youtube.com/watch?v=e2D-kjOMNF0
YouTube - Videos from this email




Saturday, April 13, 2013

लोक लाभले किती वेगळे !


दीन भुकेल्या रयतेचे हे भाग्य आगळे
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

कोण मूर्ख तो पोलिसवाला गाडी अडवी?
शिक्षा करण्या आमदार मग त्याला बडवी
भेद विसरले, नेता गण एकत्र येउनी
बडतर्फीच्या टाचेखाली इमान तुडवी
न्यायाचे का जिवंत असता प्रेत जाळले?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

अभद्र नेते ठाउक नाही अभंगवाणी
ताल सोडुनी बडबड करती, आले कानी
लघुशंकेला सर्व निघाले धरणामध्ये
तरी लोक का म्हणती पीण्या नाही पाणी?
अक्रोशाची  शांत शांत का अशी वादळे?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

काळ बदलला, आज अपेक्षा किती बदलल्या
रोटी, कपडा, मकान गरजा जुन्या जाहल्या
गाल्ली बोळांमध्ये देइन मुतार पोई
खैरातीच्या खास घोषणा घुमू लागल्या
मते मागती राजकारणी, आम्ही बावळे
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !

राजकारणी नको तिथेही वास तयांचा
देवांच्याही गळ्याभोवती फास तयांचा
असोत साई, विठ्ठल अथवा लंबोदरही
अग्रपुजेचा मान नेहमी खास तयांचा
ट्रस्टी होउन काबिज केली किती देउळे?
राज्य कराया लोक लाभले किती वेगळे !


निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Tuesday, April 2, 2013

जीवन

"जीवन" या विषयावर पाच मुक्तके

वृत्त-देवप्रिया:-


१)   आर्जवे केली तुझी अन् लाखदा चुचकारले
      पाहुनी तोरा तुझा मी कैकदा फटकारले
      कुंडली जमलीच नाही जीवना माझी तुझी
      साठवाया वेदना मी काळजा विस्तारले

२)   काढताना कुंचल्याने स्केच माझा हासरा
      सत्त्य दडवत घेतला मी कल्पनांचा आसरा
     ओढले तू त्या दिशेने फरपटाया लागलो
     जीवना होता कधी हातात माझ्या कासरा?

३)   वाद ना संवाद केला जीवनाशी मी कधी
     गुंतलो नाही कधीही मोहपाशी मी कधी
     वास्तवाशी नाळ तोडुन आवडीने पाहतो
     कल्पना विश्वात रमुनी स्वप्नराशी मी कधी

४)   मी तसा आहे कलंदर दु:ख ना शिवते मना
     कोण आहे आज माझे जीवना तू सांग ना !
     का भणंगाशी तरी घेतोस पंगा रे असा?
     जाणसी तू जिंकतो मी एकहाती सामना

वृत्त-व्योमगंगा:-

५)   रंग भरतो वेदनांचे मस्त रांगोळीत माझ्या
     दु:ख ओघळते फुलोनी नेटक्या ओळीत माझ्या
     लोक जगती भीत ज्याला तेच आलो मागण्या मी
     भीक मृत्त्यूची प्रभो तू टाक रे झोळीत माझ्या


निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com