Saturday, August 28, 2021

वादळ गेले, वळले नाही

 हात जोडुनी जा जा म्हणता

पाय रोवले, गेले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


माणसावरी संकट येते

पूर असो ढगफुटी असू द्या

दु:खाचा डोंगर कोसळतो

माय मरो वा बाप मरू द्या

यावरही कविता केलेल्या

कुणी वाचुनी थकले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


व्यासपिठावर बरीच गर्दी

आणि अल्पसे श्रोते असती

असेल तेथे कविसंमेलन

जिथे कवींची अमाप भरती

कविता वाचन ठीक, तरन्नुम

श्रोत्यांना आवडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


कविविश्वाची विचित्र पध्दत

पहिली सर पडते ना पडते

लगेच श्रावण कवितांची झड

सर्वदूर जोमात बरसते

कवितेसाठी विषय संपले

असे कधीही घडले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


सांगायाचे काय न ठावे

यमक जोडण्या धडपड नुसती

आर्या, वृत्तामधली कवणे

यांची झाली पडझड नुसती

दिवस चांगले काल कवींना

आज यूग ते उरले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही


श्लोक, आरत्या, स्तोत्रे सारी

काव्य प्रकारातून उपजले

म्हणताना ते उगा वाटते

देवांना ते सर्व भावले

कंटाळुन त्या कवणांना तो

पावत नसतो, कळले नाही

ऐकवतो मी कविता म्हणता

वादळ गेले, वळले नाही



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३


No comments:

Post a Comment