Thursday, September 23, 2021

मोठ्यांच्या छोट्या आशय गहन गोष्टी--- ( वीक एंड लिखाण. )

 

आज एक खूप जुनी आठवण आली. अशा आठवणी का आणि कशा येतात हे एक गूढच आहे. खरे तर अगम्यच! आणि मी त्या काळात रमून गेलो. ही गोष्ट सर्वांशी शेअर करायची तिव्र ईच्छा झाली; म्हणून हा प्रपंच.जवळ जवळ २५ व्॑र्षापूर्वी मी बीबीसी न्यूज चॅनलवर एक इंटरव्यू ऐकत होतो. हा इंटरव्यू ईंग्रजीतून जवळ जवळ ४५ मिनिटे चालू होता. प्रश्न विचारणारा पत्रकार भारतीयच होता आणि प्रश्नांची शांतपणे समर्पक उत्तरे देत होते बाबा आमटे! बाबांच्या आश्रमातल्या एका खोलीत प्रश्नोत्तरे चालू होती. बाबांची अगदी छोटेखानी खोली. खोलीत कमीतकमी सामान. त्या खोलीतील साधेपणा नजरेत भरण्याजोगा होता. बाबा एका बाजेवर पहुडले होते आणि शांतपणे विविध प्रश्नांना उत्तरे देत होते. अर्थातच सर्व प्रश्न हे बाबांचा आश्रम आणि त्यांच्या कार्याबद्दलच होते. बाबांची सरळ उत्तर द्यायची शैली पाहून पत्रकार भारावून गेल्याचे त्याच्या चेहर्यावरून दिसत होते. पत्रकारांनी आरडा ओरडा करत प्रश्न विचारण्याची त्यावेळी प्रथा नव्हती. बाबा बाजेवर निजून उत्तरे देत होते कारण बाबावर .थोड्या दिवसापूर्वीच कांही गुंडांनी हल्ला केला होता आणि झालेल्या दुखपतीमुळे बाबांना बसता येत नव्हते.या साक्षात्काराचा समारोप करताना पत्रकाराने शेवटचा प्रश्न विचारला की "बाबा आपणास अत्त्यूच्च समाधान देणारा आणि नेहमी स्मरणात रहाणारा एक प्रसंग सांगायचा असेल तर आपण काय सांगाल?" बाबांनी या प्रश्नाला दिलेले उत्तर ऐकून मी भाराऊनच गेलो. त्या उत्तरातून त्यांची आपल्या कर्याबद्दल वादातीत निष्ठा स्पष्ट दिसत होती. अशी माणसेच खरी राष्ट्राची संपत्ती असतात. त्यांनी दिलेले उत्तर असे होते:-"एका खेड्यात एका पाटलाच्या १४ वर्षाच्या मुलीला कुष्ट रोग झाला. पाटलाचा अर्थातच गावातच नव्हे तर पंचक्रोशीत दबदबा होता. त्या कुटुंबाचा मानमरातब पण खूप होता. घरात कुणाला कुष्टरोग होणे ही अपमानास्पद बाब समजली जाई. म्हणून ही बातमी दडवण्यात आली. मुलीला पदोपदी घरातील लोक घालून पाडून बोलत. असेच २/३ वर्षे गेली आणि कुष्टरोग जास्तच वाढला. मुलीत नैराश्य आले. एकेदिवशी ती शेतात गेली आणि जीव देण्यासाठी विहिरीत उडी मारली. तिला वाचवण्यात आले. ही बातमी मला कळताच मी त्या गावाला गेलो आणि त्या पाटलांना भेटलो. त्यांना समजाऊन सांगितले की कुष्टरोग इलाज केल्यास बरा होऊ शकतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी त्यांना म्हणालो की तुमच्या मुलीला मी माझ्या आश्रमात घेऊन जातो आणि तेथे तिच्यावर उपचार करतो. घरची ब्याद जातेय या विचाराने त्यांनी लगेच होकार दिला; आणि मी मुलीला आश्रमात घेऊन आलो.मुलगी खूप भ्यालेली आणि बुजलेली होती सुरुवातीला. कुणात मिसळत पण नव्हती. मी मुद्दाम तिला अधीच दोन मुली असलेल्या खोलीत ठेवले जेणेकरून तिचे मन रमेल. तिच्यावर हलकी फुलकी कामेही सोपवली. कांही शेतातली, कांही स्वयंपाकघरातली. हळू हळू मुलगी आश्रमातल्या वातावरणात रमायला लागली. तिची वागणूक पण सामान्य मुलीसारखी झाली.एकदा आश्रमात मी फेरफटका मारत असता त्या मुलीच्या खोलीपासून जात होतो. सहज मी खिडकीतून तिच्या खोलीत डोकावलो आणि अक्षरशः आचंबितच झालो. ती मुलगी आरशासमोर उभी राहून लिपस्टिक लावत होती आपल्या ओठाला. दोन वर्षापूर्वी नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्त्येचा प्रयत्न करणारी मुलगी आज सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक लावत होती. जीवनाबद्दलचा दृष्टीकोन एकदम सकारात्मक झाला होता. जगण्याची दुर्दम्य आशा तिच्यात जागली होती. हा प्रसंग मला अत्त्युच्च आनंद देणारा आणि चिरकाल ध्यानात राहणारा आहे असे मला वाटते."बाबांना अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यापैकी एखादी घटना सांगितली असती तरीही चालले असते. पण त्यांचा खरा आनंद त्यांच्या कामात होता ना की पुरस्कारात. हे उत्तर ऐकून मी शहारलो होतो हे मला आजही आठवतय. असे लोक चालते बोलते देवच असतात. हा वरील प्रसंग लिहिताना मला खालील चार ओळी सुचल्या..भेटवार्ता ऐकताना काय किमया जाहली!कूळदैवत बदलले मी, तूच बाबा माउलीपाठ देवाने फिरवली त्या अभाग्यांना तुझीहे धरेच्या ईश्वरा! लाभो तुझी रे सावली
ता.क. कुष्ठरोगाबद्दलचे एक प्रसिध्द वाक्य--ज्यांचे अवयव बधीर होतात ते कुष्ठरोगी असतात आणि ज्यांची मने बधीर असतात ते महारोगी असतात.


निशिकांत देशपांडे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३


अशाश्वताच्या झोक्यावरती

 

अशाश्वताच्या झोक्यावरती

हिंदोळावे, हरकत नाही

आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही


बालपणीचा अखंड निर्झर

मनी आजही झुळझुळतो मी

आई, बाबा, नाव कागदी

पर्व संपले हळहळतो मी

जरी जाहलो मोठा! पण का

बाल्यावस्था विसरत नाही?

आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही


तरुणाईच्या काळी असते

सदैव मस्तीचीच त्सुनामी

सभोवताली हिरवळ, श्रावण

लवून देतो प्रभो सलामी

जीवन जगणे, म्हणून येथे 

कधी वाटली कसरत नाही

आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही


जन्मायाच्या वेळी देतो

तिकिट सोबती परतायाचे

पण त्या वरती तिथीच नसते

कधी नेमके निघावयाचे

उद्या काय? ठाऊक नसोनी

मनी जराही दहशत नाही

आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही


सायंकाळी आयुष्याच्या

प्लॅटफॉर्मवर बसलो आहे

केंव्हा येते गाडी बघण्या

अनेकदा मी उठलो आहे 

किती वेदना शेवटच्या या?

काळ सरकता सरकत नाही

 आपण सारे जीवन जगतो

मृत्यू जोवर फिरकत नाही



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३



Monday, September 6, 2021

  प्रेमगीत---( वीक एंड लिखाण )


मी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ठरवले की व्यस्ततेमुळे जे नोकरी करताना जमले नाही आयुष्यात,  ते सर्व आता करायचे. यामुळे मी आता भरपूर गाणे, संगीत ऐकून हा छंद जोपासायचे ठरवले. सौ.ला संगीताचा छंद आणि संगिताचे शिक्षण तिचे झाल्यामुळे,  तिचा माझ्या या नविन छंदाला विरोध तर नव्हताच पण तिचे प्रोत्साहन होते. दुसरा छंद म्हणजे कविता/गझल लेखनाचा. या दोन्ही छंदामुळे अजून तरी निवृत्त होवूनही जीवन मजेत आहेत.

कांही दिवसापूर्वी असाच सकाळी रेडियो ऐकत असता,  एका मराठी गाण्याने माझे लक्ष वेधून घेतले. सुंदर चाल, तेवढीच सुरेल गायकी, आणि काव्य यांनी माझे चांगलेच लक्ष वेधून घेतले. हे सिनेगीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले आहे. हे गीत लिहिले आहे १९८१ मधे बनलेल्या चित्रपट कैवारी साठी जगदीश खेबुडकर यांनी तर संगितकार श्री प्रभाकर जोग आहेत.  शब्द सुलभता आणि आशय गहनता ध्यानात यावी म्हणून या गाण्याच्या चार ओळी खाली देतोय.


मी कशी ओळखू प्रीती, हे हृदय म्हणू की लेणे?

प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे


का नकळत डोळे मिटती? स्पर्शात शहारे उठती

मी कशी भावना बोलू? हे शब्द म्हणू की गाणे?


या जबरदस्त रचनेने मला मोहवून टाकले . प्रेम ही भावना परमेश्वराने मानवास दिलेली मौल्यवान भेट  आहे .  विचार करा हे प्रेम जर नसते तर माणसाचे आयुष्य काय बनले असते? म्हणून तर एका गीतात कवि म्हणून गेलायः

प्रेमा काय  देवू तुला?

भाग्य दिले तू मला.


प्रत्येक भाषेमधे प्रेम या विषयावर भरपूर लिखाण झालेले आहे. मग ते कवितेच्या रुपाने असो वा कादंबरीच्या रुपाने. मी बरेच कवि असे पाहिले आहेत की ज्यांनी बालपणी पहिली कविता आईवर आणि तरुणपणी पहिली कविता प्रेमावर केलेली आहे. आई हे प्रेमाचे मूर्तीमंत रूप असते. प्रेम हे सांगावे लागत नाही. त्याची अनुभूती यावी लागते.

पण हल्ली बर्‍याच वेळा प्रेमाचे भ्रष्ट रूप बघायला मिळते जी अतिशय खेदाची बाब आहे. असाच एक प्रसंग एका बातमीत वाचून मी खूप वैतागून लिहिले होते ते असे:


 फ्यूजन होता परक्या स्त्रीशी

भावतात का ओंगळ गाणी?

स्त्रीलंपट चौकट राजाला

आवडते का बदाम राणी?


असा भावनांचा स्फोट होतो कधी कधी विमनस्कतेतून! पण वरील गाण्याने मला प्रेमाची हळूवार बाजू दाखवली आणि मला एक कविता याच विषयावर लिहायची तिव्र ईच्छा झाली. बरेच दिवस विचार मंथन करून लिहिलेली कविता खाली प्रस्तूत करतोय. बघा कशी वाटतेय ती.


मी गुणगुणतो


तुझिया वरती गीत लिहाया शब्द जुळवतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


तुझे हासणे, तुझे बोलणे, तुझे लाजणे

मला आवडे कधी तुझे ते रुसून बसणे

तुझ्या भोवती सदा सर्वदा मी रुणझुणतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


वसंत फुलला जेंव्हा भेटी झाल्या अपुल्या

आठवणीच्या शुभ्र तारका मनी कोंदल्या

बेमौसम का श्रावण तू येता रिमझिमतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


मिसळुन गेलो केंव्हा आपण पत्ता नाही

दोस्तीमध्ये गाजवलेली सत्ता नाही

आठव येता झर्‍याप्रमणे मी झुळझुळतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


सुखदु:खाची एकच व्याख्या अपुली आहे

सूर, ताल, लय आयुष्याची जपली आहे

केसामध्ये फुले तुझ्या, अन् मी दरवळतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


तू नसताना क्षितीज असते काजळलेले

चैन हरवुनी भाव मनाचे वादळलेले

तुला शोधण्या अंधःकारी मी मिणमिणतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


आम्रतरूवर मोहर नसता, कोकिळ ताना

सदा ऐकल्या मिठीत आपण मोहरताना

आम्राईतुन झुळूक होवुन मी सळसळतो

तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो


योगायोग म्हणजे एक हुरहुन्नरी तरुण संगीतकार श्री निखिल महामुनी यांच्या ही रचना वाचनात आली आणि त्यांना फार आवडली. त्यांनी या रचनेला संगीतबध्द  केले. अर्थात चाल आणि गायकी तरूण पिढीची आहे. खूपच सुरेख गायली आहे. आपण पण मजा घ्याल ऐकतांना. ही रचना ऐकण्यासाठी क्लिक करा---https://www.youtube.com/watch?v=ab-0ExszE2k



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३