Monday, May 31, 2021

कधी शक्य का होते?

 

जे झाले ते विसरुन जाणे

कधी शक्य का होते?

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


नाव कागदी सोडत होतो

पाउस पडल्यावरती

तिचे हासणे, टाळ्या पिटणे

आनंदाला भरती

बालपणाचा अंक संपला

पुन्हा न जगता येते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


तारुण्याच्या उंबरठ्यावर

उदंड होता दरवळ

जिकडे तिकडे सभोवताली

ओला श्रावण, हिरवळ

धुंद फुंद जे जगलो ते ते

अजून स्वप्नी दिसते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


अता लक्तरे दिसू लागली

भावी आयुष्याची

सांजवेळ जगण्यास पाहिजे

कृपाच परमेशाची

जे जगलो ते मस्त! शेवटी

म्हणत जायचे असते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?


आलेल्यांची गेल्यावरती

आठव सोबत करती

हाच दुवा तर सांधायाला

असतो अपुल्या हाती

गोड गोड तर कधी कडूही

जे झाले ते स्मरते

जळमटासही आठवणींच्या

कुठे काढता येते?



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

No comments:

Post a Comment