Sunday, July 23, 2017

मुलाखात -- माहितीस्तवः---

मुलाखात -- माहितीस्तवः---

कविता रसिक मंडळी ( करमं ) तर्फे "आदाब अर्ज है-२" हा गजल मुशायर्‍यासहित अडीच तासाचा भरगच्च कार्यक्रम २२.०७. २०१७ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे आयोजित केला होता. कार्यक्रम खूपच रंगत गेला आणि प्रेक्षकांची उदंड दाद मिळाली. या कार्यक्रमात माझी मुलाखात प्रसिध्द कवयित्री आणि ज्येष्ठ साहित्यकार  श्रीमती स्वाती शामक यांनी घेतलीजी वेळेच्या बंधनामुळे २५ मिनिटे चालली. या कार्यक्रमास करमं या व्हाट्सअ‍ॅप समूहाच्या व्यतिरिक्त गझल क्षेत्रातले आदरणीय सर्वश्री  राम पंडीत , म.भा. चव्हाण, वैभव जोशी, अ‍ॅड प्रमोद आडकर, हास्यपंचमीकार श्री बंडा जोशी ई. पण उपस्थित होते. माझ्यासाठी हा अत्यंत बहुमोल आणि अविस्मरणीय  क्षण होता. या मुलाखातीवर दोन दिग्गज कवी तथा गझलकार श्री भूषण कटककर ( बेफिकीर ) आणि सारंग भणगे यांनी केलेले मतप्रदर्शन सर्वंच्या माहितीस्तव देत आहे.

१) भूषणजी कटककर--

"निशिकांत - स्वाती मुलाखत -

दोघेही ज्येष्ठ वयाचे सदस्य एकमेकांशेजारी शोभून दिसत होते. निशिकांत काकांच्या गझलेचा प्रवास आजवर पुरेसा उलगडला गेलेला नव्हता. मनुष्याला एखादा काव्यप्रकार कसकसा आकर्षित करतो ह्याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. स्वातीताईंनी मुलाखतीला योग्य वेळी योग्य वळणे दिली. निशिकांत काकांनी त्यांच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे सांगताना एकाचवेळी काही मौलिक मते तर काही खुसखुशीत वाक्यांची पेरणीही केलेली होती. मला वाटते की अशी मुलाखत हा 'आदाब अर्ज है' चा एक अविभाज्य भाग बनावा. खरे तर मुलाखतीला अधिक वेळ दिला जावा असे वाटत होते पण मुळातच भरगच्च कार्यक्रम असल्याने व एकंदरीत कार्यक्रम सुमारे २५ मिनिटे उशीरा सुरू झाल्याने आवरते घ्यावे लागले ह्याचा काहीसा खेद वाटला. "

"२) सारंग भणगे--

निशीदेंची मुलाखत केवळ रंजक नव्हती, तर बोध घेण्यासारखी सुद्धा होती. स्वातीताईंनी छान हाताळली आणि निशीदेंनी मनमोकळेपणाने आणि कुठलाही आव न आणता प्रामाणिकपणाने त्यांच्या भावना आणि काही विचार मांडले ते नीट विचार करता खूपच बोधक होते. ‘मलाही काही मर्यादा आहेत’ ही प्रामाणिक कबुली असो कि ‘कुणाच्या गझलांचा माझ्या गझलांवर प्रभाव पडला हे सांगून मी त्यांचा अपमान करू शकत नाही’ ही विनयशीलता असो, निशीदेंची मुलाखत खूप काही बोलून गेली!"

वयाचे अणि शायरीचे तसे कांही नाते नसते हे सर्वांना पटवून देण्यासाठी या प्रसंगी सखीवर मी लिहिलेले ३ सुटे शेर वाचून दाखवले ते असे:-

१) जशी चाळली डायरी जीवनाची, तुझ्या पावलाचेच दिसले ठसे
    समासातला कोपरा एक माझा तरी पान माझे म्हणावे कसे?

२) असे पैंजणांना नको वाजवू ना! शिकावेस चालावयाला हळू
    तुझ्या चाहुलीने उरी आस जागे, मनाला सखे आवरावे कसे?

३) तू गेल्यावर असे वाटले जीवनात ना राम राहिला
    आज कळाले आठवातही ऊर्जा असते जगावयावी

या वयात अशी शायरी? हे श्रोत्यांच्या मनात कदाचित आले असेल म्हणून शंकानिरसनार्थ पुन्हा दोन शेर वाचून समारोप केला मुलाखतीचा. ते शेर असे:--

१) वयस्क झाल्या कलमेमधुनी सळसळ झरते तरुणाई; पण
   सुरकुतलेला शायर बघुनी; चर्चा होते फक्त वयाची

२) मनी कसा "निशिकांत"नांदतो वसंत अजुनी?
    वार्धक्याचे कलंदराला नसते दडपण



निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३  

Monday, July 17, 2017

मी माझा उरलो नव्हतो

मी माझा उरलो नव्हतो--(असे म्हणतात की लग्नानंतर स्त्रीच्या जीवनात खूप मोठे बदल येतात. पण माझ्याही जीवनाच्या रंगात विवाहानंतर अमूलाग्र बदल झाले आहेत. आज पत्नीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृतार्थ भावनेने हे बदल नोंदवण्यासाठी लिहिलेली कविता).

मी माझे मीपण त्यजुनी
क्षणभरही जगलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

दुनिया माझी काळोखी
अन् रातकिड्यांची संगत
मी करी माझियासंगे
एकांती अंगत पंगत
ती मला भेटण्याआधी
क्षितिजावर फिरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

शिडकावा दवबिंदूंचा
ही पहाट ओली ओली
अन् गंध फुलांचा ताजा
व्यापतो मनाची खोली
एकटा विहंगम बघण्या
मी धुक्यात विरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

जीवनात जगण्याजोगे
शोधू या दोघे मिळुनी
घेऊ या ईंद्रधनुंच्या
रंगांना सार्‍या खलुनी
हातात हात आल्याने
मी उदास उरलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

तोडल्या चौकटी सार्‍या
आयुष्य जगायासाठी
उकलून पटापट गेल्या
ज्या काचत होत्या गाठी
एकटा कलंदर इतका!
जीवनास दिसलो नव्हतो
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो

घेतली डायरी लिहिण्या
स्थित्यंतर माझ्या मधले
कालचा आज मी नाही
हे पदोपदी जाणवले
ही किमया सर्व सखीची
लिहिण्यास कचरलो नाही
जाहल्या क्षणी ती माझी
मी माझा उरलो नव्हतो


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३