त्याचा बाबा विचित्र होता असेच त्याला वाटत होते
चार शब्द ना कधी बोलला, दु:ख मनाला काचत होते
सणासुदीला आनंदाने मिळून जेवण कधी न झाले
येई तो रात्री अपरात्री, थंड अन्नही त्याला चाले
सुर्योदय होण्याच्याआधी दिवाळीतही स्नान न केले
स्वर्ग पित्याला कसा मिळावा? मनात काहुर उठून गेले
अव्वल येता वर्गामध्ये घरी धावता सांगायाला
घरात नव्हता बाप, शेवटी डोळे मिटले झोपायाला
कधी नव्हे ते पिक्चर बघण्या आम्हासंगे बाबा आला
भ्रमणध्वनी वाजताच का तो अर्ध्यामधुनी उठून गेला?
चार घराच्या भिंतींनाही विचित्र वाटे जरी वागणे
सहनशीलता घरात इतकी! कुणी न पुसती तया कारणे
तणाव, दंगेधोपे होता, हटकुन बाबा घरात नसतो
उशीर होता परतायाला, जीव आईचा जिवात नसतो
दिवा लाउनी देवापुढती डोळे मिटुनी प्रार्थना करी
माय मागते देवाला "कर औक्षवंत नवर्यास श्रीहरी"
मूल विचारी नोकरीतही जीव असा ओलीस कशाला?
पित्यास नाही कधी वाटले झालो मी पोलीस कशाला?
पोलीस म्हणताच लोकांसमोर लाचखोर, उर्मट, लोकांना ठोकून काढणारा, गुन्हेगारांशी साटेलोटे असणारा खाकीतला नोकरवर्ग डोळ्यासमोर उभा राहतो. पोलीसांच्या जीवनाची आणि त्यांच्या कुटुंबियांची व्यथा सांगणारी आणि नाण्याची दुसरी बाजू मांडणारी रचना सादर करत आहे.
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment