तू आल्याने मलाच नाही
वसंतासही बरे वाटते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते
दिशाहीन वाटाही चुकती
जणू जाहला त्यांना चकवा
शोधशोधुनी तुझ्या घराचा
मार्ग, मनाला येतो थकवा
अंधाराच्या खाईमध्ये
फक्त निराशा मनी साठते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते
प्रेमभावना पाप नसोनी
शाप कसा हा ओघळण्याचा?
रोमांचांचा कमी, नेहमी
मोसम असतो भळभळण्याचा
पर्णझडीच्या अन् ग्रिष्नाच्या
ऋतुचक्राचे शल्य टोचते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते
पुन्हा पैंजणांची चाहुल का
पडता कानी मनात धडधड?
भास असावा, ध्यानी येता
केविलवाणी उगाच फडफड
धगधगणार्या मनी तुझ्याविन
अंतःकरणी दु:ख गोठते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते
जुनी डायरी आयुष्याची
वाचुन किंचित उदास आहे
तुझाच वावर पानोपानी
अन् मी कोरा समास आहे
प्रेमामधल्या समर्पणाला
विरहाचे का दु:ख भेटते?
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते
जगावयाचे जगून झाले
नकोच चर्चा नको समिक्षा
आयुष्याने सदा घेतली
उगाच माझी सत्वपरिक्षा
एकांतीचा प्रवास माझा
जरी चालता ठेच लागते
गेल्यावर तू किती उदासी !
क्षितिजावरती मळभ दाटते
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com