Friday, January 17, 2014

पेलतो मी जीवनाचा भार आहे


काय होतो? आज का लाचार आहे?
पेलतो मी जीवनाचा भार आहे

गाठुनी ध्येयास जेंव्हा रिक्त झालो
काय पुढती? काळजीने ग्रस्त झालो
मोकळेपण काच अपरंपार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे

संपले चढते प्रहर अन सांज आली
सावली रेंगाळणारी लुप्त झाली
एकटेपण जाहला आजार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे

मी नकोसा का घराच्या कोपऱ्यांना?
जीव ज्यांना लावला त्या आपल्यांना
वेदना भाळी अता श्रंगार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे

हेच देवा का तुझे दातृत्व आहे?
का दिले शापात तू वृद्धत्व आहे?
प्राक्तनाचा भोगतो व्यभिचार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे

हक्क द्या स्वेच्छमरण कवटाळण्याचा
लक्तरांना शेवटी गुंडाळण्याचा
संपण्याचा संयमी निर्धार आहे
पेलतो मी जीवनाचा भार आहे


निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com










 

Monday, January 13, 2014

"विरह" या विषयावर एकाच यमकात पाच मुक्तके

"विरह" या विषयावर एकाच यमकात पाच मुक्तके.

१)
नको  पाश ते गळ्याभोवती करकचणारे
जगेन जीवन एकाकी मी गुदमरणारे
तोडलीस तू नवीन मैत्री नऊ दिवसाची
किती पुसावे डोळे आता ओघळणारे?

२)
प्रेम जे कधी आपुल्यातले दरवळणारे
पान जाहले इतिहासाचे फडफडणारे
भूतकाळ ना जगता येतो, गुदमर सारा
आठवणींच्या जळमटात मन भळभळणारे

३)
काव्य कशाला लिहू?  न कोणी गुणगुणणारे
कुठे हरवले सूर मैफिली रंगवणारे?
गजलांचाही पोत अताशा विरही असतो
कसे लपावे मनात वादळ वावरणारे?


४)
एकच होते सप्न पाहिले मोहरणारे
तू गेल्यावर फूल जाहले ते सुकणारे
वैफल्याच्या वळणावरती जसा पोंचलो
जीवन झाले शीड सागरी भरकटणारे

५)
सप्न रेशमी भाव जागले शिरशिरणारे
विरह सोसता  जीवन  झाले फरपटणारे
नजर शोधते व्यर्थ तिला का अजून आहे?
तूच बंद कर देवा डोळे भिरभिरणारे


निशिकांत देशपांडे. मो. क्र.९८९०७ ९९०२३
E Mail---  nishides1944@yahoo.com





 

Sunday, January 12, 2014

बालपण

बालपण

जर कुणी आठवणींच्या विश्वात राहण्याचा प्रयत्न केला तर त्याला बालपणातच जगावे लागेल. मी बालपणाबद्दल लिहायला बसलो आणि आठवांच्या लाटावर लाटा यायला लागल्या.

अक्षरशः मी कांही क्षण हरवूनच गेलो. कोणत्या आठवणी लिहाव्या याचा मला संभ्रम पडला.

माझ बालपण म्हणजे जवळ जवळ ४०/४५ वर्षापूर्वीचा काळ. बालपण लिहिण्यामागचा अजून एक उद्येश म्हणजे या निमित्ताने नवीन पिढीला त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचा अंदाज यावा. या दृष्टीकोनातून कांही घटना/प्रसंग निवडले

मला अवर्जून आठवतो म्हणजे मी शाळेत दाखल झालेला माझा पहिला दिवस ! वडिलांनी मला एके दिवशी शाळेत जायला सांगितले आणि मी निघालो एकटाच! शाळा घरापासून अर्धा किलोमिटर दूर होती. एक पाटी आणि पेन्सिल घेऊन निघालो. शाळेत शिक्षकांनी फॉर्म भरण्यास सुरुवात केली. ओघात मला माझी जन्मतारीख विचारली जी मला माहीत नव्हती. पळत पळत घरी गेलो आणि बाबांना विचारले. त्यांनाही माहीत नव्हाती. आता आईचा नंबर. तिला वर्ष आठवत होते पण तारीख नाही. तिने फक्त एवढेच सांगितले की माझा जन्म दसऱ्याच्या जवळपासचा आहे. गेल्यावर्षी दसरा १० ऑक्टोबरला होता म्हणून माझी जन्मतारीख १०-१० झाली. खरी जन्मतारीख देवाला ठावे. मोठ्या विभूतींसारखा माझ्याही जन्मतारखेचा घोटाळा आहे. पुन्हा ही तारीख घेऊन शाळेत गेलो. फॉर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा घरी जाऊन बाबांची सही आणि फीसचे दोन आणे (खाजगी शाळा असून ही) घेतले आणि माझी शाळा सुरू झाली

.

हे सर्व सांगायचे प्रयोजन म्हणजे शाळेत मुलांना तयार करून शाळेत पोहंचवणाऱ्या आया जन्मल्याही नव्हत्या. आंम्ही भाऊ बहिणी धरून सात भावंडाचे आमचे कुटुंब होते. आईबाबा कोणाकोणाकडे लक्ष देणार! मला अजून आठवतय की बाबांचे एखादे मित्र जर घरी आले आणि त्यांनी विचारले की तुमचा निशिकांत कोणत्या वर्गात शिकत आहे तर बाबा मला बोलावत असत आणि मी कोणत्या वर्गात आहे हे मलाच सांगायला लावत; कारण त्यांना हे माहीतच नसे.

आमचे एकत्र कुटुंब होते. माझे वडील, त्यंचे एक भाऊ आणि एक चुलत भाऊ अपापल्या जंबॉ कुटुंबासह एकत्र राहत असू. जेवायला पंगत बसली की ती ३०/३५ जणांची असे. पण वाद असे नगण्य होते. माझे वडील देवदेव खूप करायचे. त्यांना कमाई अशी काहींच नव्हती. न कमावणाऱ्या पुरुषाच्या बायकोस एकत्र कुटुंबात काय काय भोगावे लागते हे मी प्रत्यक्ष पहिलेले आहेत. तिचे अविरत कष्ट, पदोपदी होणारी अहेलना माझ्या बालमनावर कायम कोरले गेलेले आहेत. वडीलांनी कधी आमच्याकडे लक्ष दिले नाही. आई वेळोवेळी जिवाच्या

आकांताने सांगत असे निशिकांत लक्ष देवून अभ्यास केलास आणि चार पुस्तके शिकलास तरच मोठेपणी चार घास पोटाला खाशील; नसता बापाप्रमाणे नुसतेच लेकरं हळजत (मुलांना जन्माला घालत) एखाद्या कुत्र्याप्रमाणे जगशील. याचा मला तेव्हा कधीच अर्थ कळाला नाही. खूप अभ्यास करायला हवा एवढेच कळत होते. आज या वाक्यातील वडिलाच्या ना कमवण्याबद्दलची आईला असलेली चीड आणि तिची आगतिकता माझ्या ध्यानात येते.

मी मूळचा मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील रहिवासी. मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी औरंगाबादला गेलो. नोकरी पण लागली. पहिला पगार झाल्यानंतर गावी जाऊन आई-बाबांना पहिल्या पगारातून ४० रुपये दिले (पूर्ण पगार ८० रुपये प्रतिमाह). त्या वेळी आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रूरुपाने घळघळणारा आनंद मी केंव्हा विसरू शकणार नाही

खूप बघूनये ते बघितले आणि घडूनये ते घडले बालपणात. मी आई या नात्याच्या चार पिढ्या पाहिल्या आहेत . माझ्या वडिलांची आई, माझी आई, माझ्या मुलांची आई आणि माझ्या नातवंडाची आई. मला एक गोष्ट नक्की कळून आली आहे की आईच्या मुलांना वागवण्यात कितीही बदल झाले असले तरीही आईचे प्रेम अनादीकालापासून अगदी तेच आहे आणि म्हणूनच खडतर बालपणाकडे वळून बघताना दुःखाचा लवलेश पण नाही. फक्त आईमुळे वेदनांच्या वाळंवंटात प्रेमाच्या झुळझुळत्या झऱ्यांत केशरांचे मळे फ़ुलले.

अजून एक जीवनाचे सत्त्य आहे. बालपण चांगले गेले तर ठीकच. खडतर बालपण आठवतांना पण अपण या परिस्थितीतून आजच्या जागी पोहंचल्याचा आनंदच असतो . मला अजून कोणीही भेटला नाही जो वर्तमनावर खुश आहे; कारण अजून खूप कांही करायचे आहे याचा सल असतो. माझे असे स्पष्ट मत आहे की भूतकाळाच्या तुलनेत (जो आनंद देतो) वर्तमान हा नेहमीच दिवाळखोर असतो. आनंदाची गुरुकिल्ली आठणीतच असते. म्हणून बालपणाला अयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Tuesday, January 7, 2014

प्रणयगीत ती लिहू लाहली


नांदत असता वसंत दारी
तुझी पैंजणे जशी वाजली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

आयुष्याच्या कॅन्व्हासावर
अंधाराचा रंग सांडला
फक्त हारणे माझ्या पदरी
कसा जीवना! खेळ मांडला?
ती आल्याने नभात काळ्या
शुक्रतारका दिसू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

शब्द आपुले सूर आपुले
मैफिलीत या रंग भरावा
आळवताना सुरेल ताना
वेगळेपणा कुठे नुरावा
मिळून मिसळुन जगावयाची
आस नव्याने रुजू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

तुझ्या सोबती रिमझिम आली
कैक दिसांनी बरसुन गेली
गंधित गंधित ओली माती
मनास हळव्या स्पर्शुन गेली
असून काटे निवडुंगावर
फुले लालसर फुलू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

तू असताना वादळातही
मंद मंदशी ज्योत तेवते
अशक्य वाटे ते ते सारे
मनासारखे घडू लागते
वठलेल्या वृक्षास अचानक
पुन्हा पालवी फुटू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली

इतिहासाचे पान फाडुनी
निश्चय केला जगावयाचा
विश्वासाचे पंख लावुनी
यत्न करू या उडावयाचा
काळवंडल्या क्षितिजावरती
केशर लाली खुलू लागली
दु:ख वर्णिले ज्या कलमेने
प्रणयगीत ती लिहू लागली


निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com