Sunday, October 21, 2012

ओझे झाले जीवन आता

ओझे झाले जीवन आता
अवघड बनले एकल जगणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

वळणा वळणावर जगताना
आठवणीचे बीज पेरले
रेतीवरती नाव कधी तर
ह्रदयाचेही चित्र कोरले
सुवर्णक्षण जे कधी भावले
भोगतोय त्यांचे भळभळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

हात तुझा सुटल्याच क्षणाला
उजेड सारा हरवुन गेला
खाचा, खळगे, सदैव ठेचा
दु:ख पोंचले ऊंच शिगेला
आठवणींनो जरा थांबवा
अंधाराचे रंग उधळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

शुष्क वृक्ष अन् विरान घरटे
नसे राबता इथे कुणाचा
उदास गाणे, उदास ताना
उत्सव सरला गोड सुरांचा
क्षितिज असे का काजळलेले?
विसरुन गेले रोज उजळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

आठवणींचा अंत जाहला
अग्नी देता चितेस माझ्या
निरव शांतता, कुणी न उरले
मला द्यावया जखमा ताज्या
सर्व निखारे थंड जाहले
अता संपली खदखद, जळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे

एकेकाळी चाहुल येता
तुझी, होतसे अधीर वेडा
करार माझ्याशी मी केला
बनावयाचा बधीर थोडा
स्थितप्रज्ञ जाहलो नि केले
बंद मला मी आता छळणे
तू नसताना कशी सखे मी
पार करावी हजार वळणे


निशिकांत देशपांडे मो. क्र९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment