Wednesday, December 29, 2021

तीन अलक--( वीक एंड लिखाण )

१) कॅमेरा.--

महिला लैंगिक आत्याचार निर्मूलन समितीच्या अधिवेशनात एक मंत्री भाषण करत होते. प्रेक्षकात अर्थातच स्त्रिया होत्या. ते तावातावाने स्त्रियांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे सांगत होते. मी फोटोग्राफर म्हणून जबाबदारी पार पाडत होतो. त्यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी मला खुणाऊन बोलावले आणि कानात प्रश्न विचारला. या अधुनिक काळात तुझा एवढा मोठा कॅमेरा कसा काय? मी त्यांना सांगितले की हा भारी आणि अद्यावत कॅमेरा असून फोटो सोबत हा मनातील भाव पण टिपतो. हे ऐकताच त्या स्त्रीलंपट मंत्र्याची पाचावर धारण बसली आणि त्याला धाप लागली.

२) अडगळ--
एका पंचतारांकित हॉटेलमधे मी तीन चार मित्रांबरोबर  रात्री जेवायला गेलो. उशीरापर्यंत मद्यपान आणि जेवणे झाली. दुसरे दिवशी सकाळी अकरा वाजता त्या हॉटेलजवळून कांही कामानिमित्त जात असता बरेच उरलेले अन्न तेथे ठेवले होते रस्त्याच्या बाजूला. म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे लोक अजून आले नव्हते कचरा गोळा करायला. सगळीकडे त्या अन्नाची  दुर्गंधी सुटली होती. लोक नाकाला हातरुमाल लाऊन जात होते.
उगाच मनात विचार आला की काल आपण हेच अन्नपदार्थ खूप महागड्या भावाने घेतले होते आणि त्यांचा आस्वाद पण घेतला होता. असेही वाटून गेले की जगात कितीही चांगली वस्तू असो कधी ना कधी ओंगळवाणी अन अडगळ होणारच. जशी समाजासाठी वृध्द माणसे!
३) तीन अंध--
माझ्या शेजारी एक कुटुंब रहात होते. घरात नवरा, बायको आणि तीन मुली होत्या त्यांच्या. मुलगा व्हावा म्हणून खूप प्रयत्न करत होते ते जोडपे. त्या बाईने चौथ्या वेळेस पुन्हा मुलीलाच जन्म दिला आणि तोही एका अंध मुलीला. जन्मांध होती ती. माझी पत्नी भेटायला त्या घरी गेली असता प्रसूत झालेली बाई वैतागून म्हणाली की हत्या करण्याची सजा जेल आहे म्हणून मी मजबूर आहे नसता मी या पोरीच्या नरड्याला जन्मताच नख दिले असते.
हे सारे पत्नीने मला सांगितले  मनात विचार आला की ती नवजात मुलगी तर अंध आहेच पण तिचे आई आणि बाबा पण मुलगा व्हावा या ध्यासाने अंधच आहेत. म्हणजे एका घरात तीन अंध.


निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
टीप..मला अलकचे नियम माहीत नाहीत. मी गुगलवर शोध घेतला पण कांही मिळाले नाही. पण कथा लघुकथेपेक्षा लहान लिहायचा प्रयत्न केला आहे. कुणाला माहीत असतील तर मला सांगावेत कृपया. कांही आशय खुणावत होते म्हणून लिहिले.

Monday, December 20, 2021

भाव कागदावरी उतरले

 

व्यक्त कराया गूज मनीचे

शब्दफुलांना वेचवेचले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


चित्रित करण्या तुला जीवना

शब्द कुंचला जरी घेतला

मला हवा तो रंग आयुष्या

तुझ्यामुळे तर मला लाभला

विश्व असोनी काळोखाचे

कैक काजवे तू पाठवले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


कविता लिहिल्या, गझला लिहिल्या

बिंब तुझे दावण्या जीवना

कधी गिलावा नाही केला

जे दिसले ते दाखवताना

स्पष्ट शब्द अन् स्पष्ट अर्थ हे

काव्यासाठी ध्येय ठरवले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


शब्दप्रभू असतात कैकजण

शब्दांचा मी दास बनावे

स्वप्न आजचे कधी ना कधी

स्वप्न पहाटेचेच ठरावे

हेच दान मा सरस्वतीला

मागण्यास मी हात पसरले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


सुरईमधले शब्दरुपी मय

प्याल्यामध्ये रोज ओततो

दु:ख विसरुनी प्राक्तनातले

सुरेल गाण्यांमधे रंगतो

जगणे झाले उत्सव आणिक

नवे जीवनी रंग बहरले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले


रसिक माय अन् रसिक बापही

हीच भावना मनी नांदते

आशिर्वचने त्यांची मिळता

धन्य धन्य जाहलो वाटते

जे मी लिहिले, माझ्याकडुनी

रसिकजनांनी लिहुन घेतले

काव्य होउनी हृदयामधले

भाव कागदावरी उतरले



निशिकांत देशपांडे, पुणे.

मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Saturday, December 4, 2021

जसा बहरला कल्पतरू--( वीक एंड लिखाण )

 एखाद्या दिवसाचे पूर्ण जीवनात अतिशय महत्व असते. तसे सर्वच दिवशी कांही ना कांही घडत असते जे माणसाच्या आयुष्यात   नगण्य असते. म्हणून बहुतेक दिवस "नेमेची येतो मग पावसाळा" या सदरात मोडणारे असतात. पण घरात नवीन अपत्याचे अगमन, मेहनतीने बांधलेल्या घराची वास्तुशांती, एखादी विशेष घडलेली घटना या मनात नेहमीसाठी जपाव्या अशा असतात आणि त्या जपल्याही जातात. सारे जीवनच एका अर्थाने  आकारत असते. हे जीवनाच्या घाईगर्दीत ध्यानातही येत नाही. पण जेंव्हा शांतपणे मागे वळून बघतो किंवा सिंहावलोकन करतो तेंव्हा सारा जीवनपटच डोळ्यासमोरून तरळतो. अनेक सुखदु:खाचे पैलू दिसावयास लागतात आणि आपण कुठेतरी हरवून जातो. यालाच जीवन ऐसे नाव म्हणत असावेत.

मी आणि माझी पत्नी सौ. जयश्री दोघांनाही आवर्जून दरसाली आठवणारा आणि आमच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला दिवस म्हणजे चार डिसेंबर ज्या दिवशी आम्ही विवाहबध्द झालो. ५२ वर्षापूर्वी आमच्या सहजीवनाची सुरुवात झाली. खूप चढउतार पाहिले जीवनात. या बद्दल जास्त बोलणे म्हणजे स्वतःची टिमकी वाजवल्यासारखे होईल म्हणून हा मोह टाळतो. पण जीवनात जे कांही चांगले घडले ते उत्कृष्ट आप्त, मित्र मंडळी, कर्यालयीन सोबती यांच्या सहकारामुळेच घडले हे मात्र नक्कीच. आजच्या या लिखाणाचे प्रयोजन या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करणे हेच आहे. परमेश्वराचे ऋण तर वादातीत आहे. हे ऋण व्यक्त करण्यासाठी एकदा मी लिहिले होते ते असे:


हातामध्ये हात धरोनी वसंत आम्ही सवे पाहिला

जगून झाले यथार्थ जीवन, मोह न कुठला मनी राहिला


दयाघना तव छत्र कृपेचे असेच राहो उरल्यायुष्यी

म्हणून तुझिया चरणावरती कृतज्ञतेचा भाव वाहिला


एकदा आम्ही दोघे गत आयुष्याचा आढावा घेत होतो. गप्पा बर्‍याच रंगल्या ज्यात मुलेही सामील झाली होती. जवळ जवळ दोन तास हा कार्यक्रम चालू होता. अशा गप्पा झाल्यानंतर माझ्या मनात आले की आपण किती छान जीवन जगलो.! या एकमेव सकारात्मक विचारातून एक कविता आवतरली. या कवितेतून आम्हा दोघांचेही मनोगत व्यक्त होते. ही कविता आपणासमोर नम्रतेने पेश करतोय.


जसा बहरला कल्पतरू----


हिशोब करता आयुष्याचा

कांही आठवू, कांही विसरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


जीवनातले कडे कोपरे

साठे माणिक मोत्यांचे

जेथे रमलो हळूच विणले

जाळे नात्यागोत्यांचे

कठीण समयी कधी न पडला

प्रश्न पुढे मी काय करू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


कष्टाविन का खडबड झाले

हात आपुले आज असे?

स्वतःच लिहिल्या नशीब रेषा

भाग्य आम्हाला हवे तसे

हिंमत आहे आकाशाला

कवेत अपुल्या सहज धरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


खूप राहिलो सूर्य प्रकाशी

संध्या छाया दिसू लागल्या

आठवणींच्या लक्ष तारका

वेचू त्यातिल सर्व चांगल्या

सूर मारुनी खोल सागरी

मोत्यांच्या ओंजळी भरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


धवल यशाची जणू पताका

जीवन करण्या शुभ्र साजरे

धाग्यांनी सुखदु:खाच्या विणले

आयुष्याचे वस्त्र गोजिरे

या वस्त्रावर आपण दोघे

इंद्रधनूचे रंग भरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू


कांगारूचे जीवन जगलो

पोटी धरुनी दोन मुले

काबिज केले लिलया त्यांनी

क्षितिजापुढचे क्षेत्र नवे

पैलतीर तो दिसू लागला

डोळे मिटुनी ईश स्मरू

वळून बघता जीवन भासे

जसा बहरला कल्पतरू




निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Friday, December 3, 2021

वात्सल्य---( वीक एंड लिखाण )

आई हा किती प्रेमळ, सर्वांचा आवडता, जिव्हाळ्याचा विषय! आईने एका अर्थाने संपूर्ण विश्व व्यापून टाकलेलं आहे. हिंदू धर्मात तर पूजनीय व्यक्तीमधे मातृदेवोभव, पितृदेवोभव म्हणत आईला आद्य स्थान दिलेले आहे.

माझा स्वतःचा कांही कविंना बोलल्यानंतरचा अनुभव आहे की बहुतांश कवी आपल्या आयुष्यात पहिली रचना आपल्या आईवरच लिहितात. 

प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई ही माधव ज्युलियन यांची कविता आणि आई म्हणून कोणी आईस हाक मारी ही कवी यशवंत यांची कविता या दोन्ही आई या विषयावर असल्यामुळेच अजरामर झाल्या. आई या विषयावर असंख्य कविता आहेत आणि या नवयुगात अजूनही त्या आवडीने वाचल्या/लिहिल्या जातात. सर्वांच्या जडणघडणीत आईचा मोठा वाटा असतो हे निश्चित.

माझ्या मनाला जे विषय जवळ आहेत काव्यलिखाणासाठी, त्यात आईला उच्च स्थान आहे. मी बर्‍याच कविता, गझला आईवर लिहिलेल्या आहेत. ही आईचीच कृपा असावी की जेंव्हा जेंव्हा मी आईवरील कविता/गझला काव्य संमेलनात वाचतो, श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.  मी एकदा बाबावर कविता लिहायची ठरवले. पण सर्वव्यापी आई या कवितेतही डोकावली, आणि तीही चक्क कवितेच्या ध्रुवपदात! कसे ते खाली पहा.


अनेक वेळा धाकधपटशा

क्वचित प्रसंगी लाडीगोडी

माय दुधाची मऊ साय अन्

बाबांचे बोलणे पहाडी

 

आई या व्यक्तिमत्वाचे रसायनच वेगळे आहे. आई ही कुणाचीही असो, ती सोशीक आणि मायाळूच असते. वाघ आणि सिंह हे माणसांना भले क्रूर वाटत असोत, आपल्या पिल्लांसाठी वाघीण किंवा सिंहीण ही मायेचा झराच असते. कनवाळू, मायाळू अशीच तुमच्या आमच्या आईसारखीच.

मला मी औरंगाबादला असतानाचे दोन प्रसंग आठवतात. माझ्या घराच्या गॅलरीत बसल्यावर एक रस्ता दिसत होता. तिथे एक दहा फूट खोल नाला होता सांडपाणी वाहून नेण्यासाठी. मी एकदा गॅलरीत बसलो असता पाहिले की एक कुत्रे नाल्यात डोकावून बघत होते. नंतर ते पळत पळत नाल्याच्या कडेकडेने जाई आणि पुन्हा परत येवून नाल्यात एकटक बघत असे. हे जवळ जव्ळ अर्धा तास चालू होते. माझ्यातली उत्सुकता जागी झाली. मी खाली जाऊन पाहिले तेंव्हा ध्यानात आले की,एक पिल्लू नाल्यात पडले होते. तिच्या आईची तगमग चालू होती. दहा फूट खोल आईला उतरता येत नव्हते. तेथे एक कचर्‍यातील पिशव्या गोळा करणारा मुलगा आला. त्याला कांही पैसे देऊ केले आणि त्याच्याकडून ते पिल्लू वर काढून घेतले. त्या आईच्या चेहर्‍यावरील केविलवाणे भाव मला कित्येक दिवस डोळ्यासमोर दिसत होते. या घालमेलीतून एका आर्त कवितेचा जन्म झाला.

दुसरा प्रसंग माझ्या घरातीलच. एका खोलीच्या खिडकीत चिमणीने घरटे बांधले आहे हे माझ्या ध्यानात आले. दोन चिमण्या येऊन घरट्यात नवीन वाळलेले गवत आणायच्या. त्यांचे घरटे बांधणीचे काम बहुधा चालू होते. एखाद्या महिण्याने त्या घरट्यात एक अंडे पण दिसले. यथावकाश उबवले गेल्यानंतर पिलाचा जन्म झाला. आम्हा दोघांना येता जाता घरट्याचे निरिक्षण करायचा छंदच लागला होता! मग चिमणी बाहेर जाऊन पिलासाठी चारा आणायची. चिमणी येताच पिल्लू चोंच उघडायचे आणि आई दाणा भरवायची. हे बरेच दिवस चालले. नंतर पिल्लू खिडकीतल्या खिडकीत हळूहळू चालायला लागले. आई दुरून पिलाकडे लक्ष ठेवायची. नंतर पिलाला घरट्यात बसवून बाहेर जायची आणि छकुल्यासाठी चारा घेऊन यायची. सुदैवाने म्हणा  किंवा दुर्दैवाने आम्ही साक्षीदार होतो , एके दिवशी चिमणी चारा घेऊन आली आणि तिला घरट्यात पिल्लू दिसलेच नाही. ती भिरभिरत्या नजरेने उडत जाऊन शोध घ्यायची आणि परत घरट्याकडे यायची. हे असे चार पाच दिवस चालले. नंतर चिमणी गेली आणि इकडे फिरकलीच नाही. बहुधा तिला कळले असावे की आता शोध घेणे व्यर्थ आहे. कित्येक दिवस ते घरटे तसेच होते खिडकीत. मोकळे, विरान. ती स्मशान शांतता आम्हाला सुध्दा भयाण वाटत होती. या हृदय पिळवटणार्‍या प्रसंगातून उतरलेली कविता जिच्यात मातेची वात्सल्य भावना चित्रित केरण्याचा प्रयत्न केला आहे,  ती खाली पेश करतोय.


झाली संध्याकाळ


चोंच उघडुनी वाट पहाते

पक्षिणिचे ते बाळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


बाळा चारा खाऊ घाली

खूप खूप मायेने

पाठीवरुनी हात मखमली

फिरवी ती प्रेमाने

कुशीत निजता बाळ वाटते

येवू नये सकाळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


बाळाच्या खोड्या दंग्यांनी

घरटे गजबजलेले

तिला आवडे बाळ नेहमी

कानी कुजबुजलेले

कौतुक जेंव्हा बाळ खेळते

सोडुन सारा ताळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


पंख पसरुनी कसे उडावे

तिने शिकविले त्याला

आकाशाचे स्वप्न लागले

अता पडू बाळाला

उरात धडधड प्रश्न भयानक

तुटेल का ही नाळ?

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


एके दिवशी चारा घेउन

अशीच ती परतता

घरट्यामध्ये तिने पाहिली

खूप निरव शंतता

भिरभिरत्या नजरने शोधी,

मनी रक्तबंबाळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ


स्वतंत्र होउन बाळ उडाले

हीच जुनी ती कथा

आईच्या प्राक्तनात असते

कुरतडणारी व्यथा

एकलपणचे शल्य उरी अन्

मावळतीचा काळ

भूक लागली माय न आली

झाली संध्याकाळ




निशिकांत देशपांडे, पुणे. 

मो.क्र. ९८९०७ ९९०२३