आजपर्यंतच्या कोरड्या पावसामुळे सुचलेली कविता.
स्वप्नात हर्षलो बघुनी
पाऊस कधीचा पडतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो
कॅन्व्हास ढगांनी भरला
ही किमया रंगछटांची
कुंचल्यातून आवतरली
सर ओली अभासाची
मृगजळातल्या पाण्याला
प्यावयास भरभर पळतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो
कालही कोरडा गेला
ना आस आजची ओली
पाण्यात बुडवले देवा
नवसांची लाउन बोली
अंदाज हवामानाचा
वेडा मी ऐकत असतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो
मी कयास बांधत आहे
वचनांच्या पर्जन्याचा
अन् महापूर मदतीचा
इकडे तिकडे जिरण्याचा
का हाती बळिराजाच्या
फासाचा दोरच उरतो?
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो
कोरडा कधी तर ओला
दुष्काळ मोडतो कंबर
लावावी कितीक ठिगळे?
फाटलेच जर का अंबर
वारीत नाचता विठुच्या
क्षण एक मीत मी नसतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो
अन् सालाबाद प्रमाणे
कविता चारोळ्या लिहितो
पर्जन्य असूदे नसुदे
मी श्रावणात वावरतो
आशय माझ्या कवितांचा
दु:खातच खूप बहरतो
टाळीत वास्तवाला मी
आभासी जगात रमतो
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com